Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date – 18 February 2020
Time 1.00 to
1.05pm
Language
Marathi
आकाशवाणी
औरंगाबाद
प्रादेशिक
बातम्या
दिनांक
– १८ फेब्रुवारी २०२० दुपारी
१.०० वा.
****
पुण्यात झालेली एल्गार परिषद
आणि कोरेगाव भीमा इथली घटना यांचा परस्पर संबंध नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. एल्गार परिषदेत
जे लोक सहभागी नव्हते, त्यांच्याविरोधातही या प्रकरणी गुन्हे दाखल झाल्याचं पवार म्हणाले.
मागच्या सरकारनं यासंदर्भात अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप करत, या प्रकरणी पुणे
पोलिसांसह तत्कालिन सरकारमधल्या लोकांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी पवार यांनी केली.
****
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव
ठाकरे यांनी, आज सिंधुदुर्ग इथं पत्रकार परिषदेत बोलताना, हा मुद्दा अधिक स्पष्ट केला.
भीमा कोरेगाव आणि आणि एल्गार परिषद हे दोन्ही वेगवेगळे विषय आहेत. फक्त एल्गार परिषदेचा
तपास राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए कडे देण्यात आलेला आहे. भीमा कोरेगाव हा विषय केंद्रीय
तपास संस्थेकडे दिलेला नाही आणि देणारही नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. भीमा
कोरेगाव प्रकरणी अनुसूचित जातीच्या नागरिकांवर अन्याय होणार नाही असं ही त्यांनी सांगितलं.
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या २ जिल्ह्यांमध्ये सिंधु-रत्न समृद्ध विकास योजना अंमलात
येणार असल्यानं मुख्यमंत्री म्हणाले. एल ई डी मासेमारी विरोधात कडक कायदा करणार असून
समुदकिनाऱ्यांवर कोस्टगार्ड आणि पोलीस यांची एकत्र गस्त असेल अशी माहिती मुख्यमंत्री
ठाकरे यांनी यावेळी दिली.
****
नव्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला
तोंड देण्यासाठी सुरु असलेल्या सरसकट उपाययोजनांबाबत जागतिक आरोग्य संघटनेनं इशारा
दिला आहे. चीनबाहेर या आजाराचा प्रादुर्भाव अत्यल्प असून, सार्स किंवा मेर्स यासारख्या
इतर कोरोना विषाणूजन्य आजारांच्या तुलनेत कोविड-१९ हा आजार कमी घातक आहे, असं संघटनेनं
म्हटलं आहे. जपानप्रमाणे आणखी काही नव्या भागांमधे या आजाराचा प्रादुर्भाव होऊ नये
यासाठी सर्व जहाज वाहतूक थांबवण्याची सूचना जागतिक आरोग्य संघटनेनं फेटाळून लावली आहे.
विमान आणि जहाज वाहतूकीवर घातलेल्या निर्बंधांमुळे कोरोनाबाधित क्षेत्रात कारखानदारी
आणि पर्यटन उद्योग रोडावला आहे.
****
फसवणुकीच्या गुह्यात आरोपी
न करण्यासाठी ४ लाख रुपये लाच घेतल्या प्रकरणी सातारा लाच लुचपत विभागानं आज सकाळी
फलटण शहर पोलीस ठाण्यातल्या उप निरिक्षकाला अटक केली. आरोपी म्हणून नोंद न करण्यासाठी
या उपनिरीक्षकानं २० लाख रुपयांची लाच मागितली होती.
****
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक
शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरूवात झाली. औरंगाबाद विभागात ४०६
परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होत आहे. १८ मार्चपर्यंत चालणाऱ्या या परीक्षेसाठी औरंगाबाद,
जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातून एक लाख ७१ हजार नऊशे एकोणसाठ परीक्षार्थी
परीक्षा देत आहेत. या परीक्षेत काही गैरप्रकार आणि कॉपी होऊ नये यासाठी भरारी पथक नेमण्यात
आल्याची माहिती बोर्डाच्या सचिव सुगत्ता पुन्ने यांनी दिली आहे.
या परीक्षेसाठी नांदेड जिल्ह्यात
८२ परीक्षा केंद्रं स्थापन करण्यात आली आहेत. जिल्हाभरातून कला, विज्ञान आणि वाणिज्य
शाखेचे एकूण ३८ हजार ७११ विध्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या
जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नाशिक इथं १३० किलो वजनाच्या भवानी तलवारीची १३ फूट लांब
आणि ९ इंच रुंद आकाराची भव्य प्रतिकृती साकारण्यात आली असून, या तलवारीची नोंद वंडर
बुक ऑफ रेकॉर्ड लंडनमध्येही करण्यात आली आहे. शहरात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक इथं
छत्रपती सेनेतर्फे काल या भवानी तलवारीच्या प्रतिकृतीचं अनावरण करण्यात आलं. तलवारीच्या या प्रतिकृतीच्या
मुठीवर कृत्रिम खडे-मोती वापरण्यात आले असून, ९० किलो स्टील आणि ३० किलो पितळेच्या
तलवारीच्या म्यानाचं वजन तब्बल १३० किलो आहे. उद्या शिवजयंतीला भवानी तलवारीच्या प्रतिकृतीची
पारंपरीक ढोलपथकाच्या गजरात शाही मिरवणूक काढण्यात येणार आहे.
****
कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात
अतिवृष्टी आणि महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची तीनशे कोटी रुपयाची
रक्कम कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्हा उपनिबंधकांच्या खात्यावर शासनानं वर्ग केली
आहे. यामध्ये सर्वाधिक १९५ कोटी रुपयांची रक्कम कोल्हापूर जिल्ह्याला मिळणार आहे.
****
No comments:
Post a Comment