आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
५ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
अमरनाथ यात्रेसाठी
भाविकांची सातवी तुकडी आज सकाळी जम्मूहून रवाना झाली. कडक सुरक्षा व्यवस्थेत या तुकडीतले
तीन हजार तीनशे एकोणनव्वद यात्रेकरू अरमनाथच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले.
****
पंतप्रधान नरेंद्र
मोदी आपल्या तीन दिवसांच्या भेटीसाठी काल संध्याकाळी इस्ञाईलला पोहचले. तेल अव्हीव्ह
इथे त्यांचं शानदार स्वागत करण्यात आलं . आर्थिक समृध्दी आणि उच्च तंत्रज्ञान यासाठी
भारत आणि इस्त्राईल एकमेकांना सहकार्य करू शकतात, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं
आहे.
****
केंद्रीय पर्यावरणमंत्री
डॉक्टर हर्षवर्धन यांनी आज वन महोत्सव अभियानाची सुरुवात केली. दरवर्षी जुलै महिन्याच्या
पहिल्या आठवड्यात हे अभियान राबवण्यात येतं. स्थानिक लोकांचा वृक्षारोपणामध्ये सहभाग
असावा आणि पर्यावरण विषयक जागृती व्हावी, या हेतूनं हे अभियान राबवण्यात येतं.
****
वस्तू आणि सेवा
कर लागू झाल्यापासून वस्तूंच्या किमती आणि पुरवठ्याच्या स्थितीवर सरकार देखरेख ठेवत
आहे या कायद्याच्या अंमलबजावणी नंतर वस्तूची किंमत वाढली असेल,तर उत्पादकानं त्या वस्तूच्या
पाकिटावर जुनी आणि सुधारित अशा दोन्ही किंमती छापणं आणि हा बदल किमान दोन वृत्तपत्रांमधून
प्रसिद्ध करणं आवश्यक आहे, असं ग्राहक कार्य सचिव अविनाश श्रीवास्तव यांनी कळवलं आहे.
वस्तुची किंमत कमी झाली असल्यास, उत्पादकानं फक्त पाकिटावर दोन्ही किमती छापणं पुरेसं
आहे.
****
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी अबू सालेम याला
जन्मठेपेची शिक्षा देण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाने केली आहे. सालेमच्या शिक्षेवर
मुंबईतील टाडा न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सालेमला फाशी देण्याची मागणी बॉम्बस्फोटात
ठार झालेल्यांच्या कुटुंबियांनी केली आहे. मात्र, सालेमला पोर्तुगालमधून प्रत्यार्पण
करून भारतात आणलं असल्यानं, त्याला फाशीची शिक्षा देता येणार नसल्याचं, अन्वेषण विभागाचं
म्हणणं आहे.
****
No comments:
Post a Comment