आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
०७ ऑगस्ट २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
तिसरा
राष्ट्रीय हातमाग दिन आज देशभरात साजरा केला जात आहे. सात ऑगस्ट या दिवसाला भारतीय
इतिहासात वेगळं महत्त्व असून १९०५ मध्ये याच दिवशी महात्मा गांधी यांनी स्वदेशी चळवळीला
प्रारंभ केला होता. विविध स्वदेशी वस्तुंची निर्मिती आणि प्रकल्पांना पुनर्जिवित करण्याच्या
उद्देशानं ही चळवळ सुरू झाली होती. या घटनेची आठवण म्हणून केंद्र सरकारनं २०१५ पासून
हा दिवस साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. देशातला मुख्य समारंभ गुवाहटी इथं होत आहे.
औरंगाबाद
जिल्ह्यातल्या पैठण इथंही राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात
आलं आहे.
****
रक्षाबंधनाचा
सण आज साजरा होत आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती हामिद अन्सारी आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपल्या
विविध मागण्यांसाठी मध्यरात्रीपासून संप पुकारला आहे. त्यामुळे मुंबईत आज वाहतुकीवर
परिणाम होण्याची शक्यता आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावं, यासह इतर मागण्यांसाठी
हा संप पुकारण्यात येत आहे.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी लागू झाल्यानंतर
अंदाजे एक डझन वस्तूंच्या रोजच्या किंमतीवर लक्ष ठेवलं जात असल्याचं केंद्रीय कर मंडळाच्या
अध्यक्षा वनजा सरना यांनी सांगितलं आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत
त्या बोलत होत्या. जीएसटी लागू झाल्यानंतरच्या परिस्थितीवर आपला विभाग लक्ष ठेवत असून,
येणाऱ्या अडचणी सोडवल्या जात असल्याचं त्या म्हणाल्या.
****
शेतकऱ्यांनी उत्पादित माल थेट बाजारपेठेत
न पाठवता त्याचं मूल्यवर्धन करुन निर्यातीसाठी प्रयत्न करावे, तसंच परदेशातली गरज लक्षात
घेऊन मालाचं उत्पादन करावं, असं आवाहन सहकार आणि पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं
आहे. पुणे इथं आयोजित खरेदीदार - विक्रेता संमेलनात ते बोलत होते.
****
No comments:
Post a Comment