Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 18 March 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१८ मार्च
२०१८ सकाळी
६.५०
मि.
*****
Ø केंद्र
सरकारच्या विरोधातल्या अविश्वास ठरावाला पाठिंबा नसल्याचं शिवसेनेकडून स्पष्ट
Ø विद्यापीठ अनुदान
आयोगानं कौशल्य विकास विद्यापीठासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वं निश्चित करावीत,
- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
Ø पुण्यातून तीन
बांग्लादेशी नागरिकांना अटक
Ø गुढीपाडवा आणि
नववर्षानिमित्तानं आज सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
Ø औरंगाबाद इथं आयोजित भारतीय
संविधान परिचय अभ्यासक्रमाचा समारोप
*****
केंद्र
सरकारच्या विरोधात तेलगु देसम पक्षानं आणलेल्या अविश्वास ठरावाला शिवसेनेचा पाठिंबा
नाही, असं शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना, राऊत यांनी,
ही अपरिपक्व राजकीय खेळी असून हा ठराव टिकाव धरणार नाही असं नमूद केलं. राष्ट्रीय लोकशाही
आघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला. भक्कम
विरोधी पक्ष असणं हे देशाच्या लोकशाहीसाठी सुचिन्ह असल्याचंही सांगतानाच, काही राजकीय
पक्ष एकत्र आले तर देशात वेगळा निकाल लागू शकतो, हे लोकसभेच्या पोटनिवडणुकीनं दाखवून
दिलं आहे असं ते म्हणाले.
****
विद्यापीठ अनुदान आयोग - युजीसीने
कौशल्य विकास विद्यापीठासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वं निश्चित करावीत, त्यासाठी
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयानं पुढाकार घ्यावा, असं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार
यांनी म्हटलं आहे. चंद्रपूर इथं कौशल्य विकास विद्यापीठाच्या विकास कामाचा आढावा घेतल्यानंतर,
ते बोलत होते.
कौशल्य विकास विद्यापीठांची रचना आणि त्यांच्या गरजा
या सर्वसाधारण विद्यापीठांपेक्षा वेगळ्या असल्यानं, सर्वसाधारण विद्यापीठांसाठीची मार्गदर्शक
तत्त्वं कौशल्य विकास विद्यापीठांना लागू करता येणार नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कौशल्य विकास विभागानं मार्गदर्शक तत्वांचा कच्चा
मसूदा तयार करावा, पंतप्रधान आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांसमोर, येत्या पंधरा
दिवसात त्याचं सादरीकरण केलं जाईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं.
****
राज्यात आजपासून प्लास्टिक आणि
थर्माकोलच्या वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात येणार आहे. प्लास्टिक आणि थर्माकोल
बंदीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर जास्तीत जास्त २५ हजार रुपयांपर्यंत दंड आणि
३ महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे
****
बहुजन चळवळीतले विचारवंत
आणि ज्येष्ठ पत्रकार जैमिनी
कडू यांचं काल नागपुरात निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. गेल्या पाच तारखेला दुचाकीच्या अपघातात त्यांना गंभीर दुखापत
झाली होती, उपचारादरम्यान काल त्यांचं निधन झालं.
****
दहशतवाद प्रतिबंधक पथकानं पुण्यात
निगडी, वानवडी परिसरातून काल तीन बांग्लादेशी नागरिकांना अटक केली. हे तिघं, बांग्लादेशानं
बंदी घातलेल्या अन्सार उल्ला बांगला या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचं, वृत्त
आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून बांग्लादेशी पारपत्रंही जप्त केली आहेत.
****
छत्रपती संभाजी महाराजांच्या ३२९ व्या
बलिदान दिनानिमित्त काल पुणे जिल्ह्यात वढू इथं काल त्यांच्या समाधीस्थळावर त्यांना
आदरांजली वाहण्यात आली. शिक्षणमंत्री विनोद तावडे, अभिनेता अमोल कोल्हे यांच्यासह सर्वसामान्य
नागरिक मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते. शासकीय मानवंदना देऊन, संभाजीराजांना
अभिवादन करण्यात आलं.
*****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
*****
चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा
आज साजरा होत आहे. हिंदू कालगणनेनुसार शालिवाहन शक १९४० या नववर्षाला आजपासून प्रारंभ
होत आहे. यानिमित्त राज्यपाल सी विद्यासागर राव, तसंच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हे नूतन वर्ष सर्वांकरता सुख, शांती, समाधान आणि संपन्नता घेऊन येवो, असं राज्यपालांनी म्हटलं आहे, तर मुख्यमंत्र्यांनी, आपल्या शुभेच्छा
संदेशात, मराठी भाषा, साहित्य आणि सांस्कृतिकतेला प्रोत्साहन
देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं, म्हटलं आहे.
दरम्यान, नववर्षारंभानिमित्तानं आज सर्वत्र
विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सम्राट शालिवाहनाची राजधानी असलेल्या पैठण
शहरात आज सकाळी शोभायात्रा काढण्यात येणार आहे. औरंगाबाद इथंही दुपारी तीन वाजता, शहराचं
ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीपासून शोभायात्रा काढण्यात येणार आहे
****
औरंगाबाद
इथं आयोजित भारतीय संविधान परिचय अभ्यासक्रमाचा काल समारोप झाला. बापू सुधा काळदाते
प्रतिष्ठान आणि माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित
या कार्यक्रमात, मार्गदर्शन करताना, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विधीज्ञ भगवानराव देशपांडे
यांनी, राज्यघटनेशी बांधिलकी म्हणजे राष्ट्रनिष्ठा आणि परिवर्तनाशी बांधिलकी असल्याचं
म्हटलं, ते म्हणाले....
राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या चळवळीच्या नेत्यांनी
सर्व समावेशक अश्या प्रकारची राष्ट्रीय चळवळ सुरू केली. जात, पात, धर्म, वंश, लिंग
यांच्या मर्यादा वोलाडून सर्व एक होउुन एक राष्ट्र म्हणून उभ रहायचं. इग्रजीच्या विरूध्द
लढायचं. ह्या राष्ट्रीय वादाचे प्रतिबिंब आपल्या राज्य घटनेत आहे.
ज्येष्ठ साहित्यिक रा.रं. बोराडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
होते. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र
देऊन गौरवण्यात आलं.
****
औरंगाबाद जिल्हा सामान्य रूग्णालयाचे
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जी. एम गायकवाड यांना निलंबित करण्यात आलं आहे. शिस्तभंग प्रकरणी
ही कारवाई करण्यात आल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
उस्मानाद जिल्ह्यात एका बोगस डॉक्टरविरोधात गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. भूम तालुक्यातल्या अंबी इथं वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या दिलीपकुमार
रॉय यांचं वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र बनावट आढळून आलं आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
जालना तालुक्यात ६३ गावातल्या संभाव्य पाणी टंचाईचा
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी काल आढावा घेतला. पाणीटंचाई भासणाऱ्या गावांमध्ये विहीर
अधिग्रहण, नळ योजना दुरुस्ती, टँकरद्वारे पाणी पुरवठा आदी उपाययोजना तातडीनं राबवण्याचे
निर्देश खोतकर यांनी दिले.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातल्या मेंढला
नदीचं खोलीकरण आणि रुंदीकरणाचं काम कालपासून सुरू करण्यात आलं. नाम फाउंडेशनच्या वतीनं
होत असलेल्या या कामाचं उदघाटन उपविभागीय अधिकारी प्रदीप कुलकर्णी यांच्या हस्ते झालं.
****
औरंगाबाद शहरात काल स्वच्छता अभियान राबवण्यात आलं.
मुकुंदवाडी चौकात विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या उपस्थितीत या अभियानाला
सुरुवात झाली. विविध पक्ष संघटना, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी, तसंच राष्ट्रीय
सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी या अभियानात सहभागी होत परिसर स्वच्छ केला.
****
तिहेरी तलाक विधेयकाच्या विरोधात काल उस्मानाबाद
इथं मुस्लीम महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मूकमोर्चा काढला. महिलांच्या शिष्टमंडळानं
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं.
****
बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई इथं कालपासून तीन दिवसीय
‘जिल्हा कृषी महोत्सवाला प्रारंभ झाला. कृषी महाविद्यालय परिसरात
आयोजित या महोत्सवाचं, पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उदघाटन झालं. या महोत्सवात
आधुनिक कृषी तंत्रज्ञान, प्रयोगशील शेतकऱ्यांचं मार्गदर्शन तसंच पिक लागवडीपासून बाजारपेठेपर्यंतची
माहिती मिळणार आहे.
*****
***
No comments:
Post a Comment