Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 04 February 2020
Time 18.00 to 18.05
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ४ फेब्रुवारी २०२० सायंकाळी ६.००
****
सांगली जिल्ह्यातल्या हिवरे गावात २०१५ साली झालेल्या
तिहेरी हत्याकांड प्रकरणातल्या दोन आरोपींना सांगली जिल्हा सत्र न्यायालयानं आजन्म
कारावासाची शिक्षा आणि एक लाख रुपये दंड ठोठावला आहे. आरोपी सुधीर घोरपडे आणि रवींद्र कदम यांना सांगली जिल्हा सत्र
न्यायालयाचे न्यायाधीश डी. पी. सातवळेकर यांनी ही शिक्षा सुनावली. दोषींना मृत्यूदंड देण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली होती. जून
२०१५ मध्ये झालेल्या या हत्याकांडात दोषींनी एका महिलेसह तिची सून आणि मुलगी अशा तीन
महिलांची हत्या केली होती.
****
राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवासीवर्गाला प्रवास भाड्यात दिल्या जाणाऱ्या सवलतीची प्रतिपूर्ती राज्य शासनानं केली
आहे. त्यानुसार ऑगस्ट ते नोव्हेंबर
२०१९ या चार महिन्यांच्या कालावधीतल्या सवलत मूल्याच्या रकमेपैकी चारशे अठ्ठ्यातर कोटी
९५ लक्ष ७४ हजार रुपये देण्याचा
प्रस्ताव महामंडळाने राज्य शासनास सादर केला होता. त्यानुसार एसटी महामंडळास एकूण
रक्कमे पैकी २२० कोटी रुपये देण्यात
आले आहेत. महामंडऴाच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीनं ही
माहिती देण्यात आली.
****
कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते तसंच साखर डायरीचे संपादक, अजित नरदे यांचं
आज सकाळी निधन झालं. त्यांच्या
या अकाली निधनाने शेतकरी चळवळीमध्ये कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे असं मत
शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार
राजू शेट्टी यांनी व्यक्त केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या घुलेवाडी इथंल्या आदिवासी
वसतीगृहातल्या विद्यार्थांना ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे अन्न पुरविले जात असल्याच्या
कारणाने वसतिगृहातल्या जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांनी सोमवारपासून अन्नत्याग आंदोलन
पुकारलं आहे. आदिवासी
वसतिगृहात पूर्वीप्रमाणेच ठेकेदार विरहित जेवण देण्यात यावं अशी मागणी या विद्यार्थांनी
केली आहे.
****
मराठा सेवा संघाचं राष्ट्रीय
ग्रामीण अधिवेशन येत्या ८ आणि ९ फेब्रुवारी रोजी धुळे जिल्ह्यातल्या आदर्शगाव बोरकुंड
इथं आयोजित करण्यात आलं आहे. कॉम्रेड शरद पाटील नगरीत होणाऱ्या या अधिवेशनाच्या पहिल्या
दिवशी शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. आज धुऴे इथंल्या मराठा सेवा
संघाच्या कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
****
नांदेड-वाघाळा शहर महानगर पालिकेच्या वतीनं नांदेड
शहरातल्या इतवारा भागात अग्नीशमन दल उपकेंद्राच्या नियोजित इमारतीचं भूमिपूजन आज आमदार
मोहनराव हंबर्डे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी महापौर श्रीमंती दिक्षा धबाले, उपमहापौर सतिश देशमुख तरोडेकर
हे उपस्थित होते.
****
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड इथं दोन किराणा दुकानांवर
अन्न आणि औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी काल अचानक धाड टाकून दुकान आणि गोदामांची
झडती घेतली. या झाडाझडतीत जवळपास ७ लाख रुपयांचा गुटखा आणि पान मसाला आढळून आला आहे.
त्यानुसार दोन्ही दुकान मालक कोंडीराम गादेकर,
राजकुमार डवरे आणि रामकृष्णन मोटे यांच्यावर
अन्न सुरक्षा कायद्यानुसार गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाट इथं काल तरुणीला जिवंत
जाळण्याच्या प्रकरणावरुन आज विविध पक्ष आणि संघटनांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
सादर करून कठोर कारवाईची मागणी केली.
दरम्यान, वकील संघटनेनंही या
घटनेचा तीव्र निषेध केला आहे.
अल्पवयीन विद्यार्थिनींच्या
छेडछाड प्रकरणी नांदेड पोलिसांनी एका शिक्षकाला अटक केली आहे. स्वप्नील शृंगारे असं
या शिक्षकाचं नाव असून, प्राथमिक शाळेतल्या दहा वर्ष वयाच्या एका विद्यार्थिनीला अश्लील
चित्रफीत दाखवून शृंगारेने तिची छेड काढल्याची तक्रार या विद्यर्थिनीने केली, त्यावर
विद्यार्थिनीच्या पालकांनी शाळेत जाऊन शृंगारेला मारहाण केल्यावर हा प्रकार समोर आला.
शृंगारेने आणखी चार मुलींना अशाच प्रकारे त्रास दिल्याचंही चौकशीतून समोर आल्याचं,
पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नांदेड - औरंगाबाद नांदेड या विशेष गाडीची मुदत १
फेब्रुवारी ते ३१ मार्च- २०२० पर्यंत
वाढविण्याचा निर्णय घेतला असून उद्यापासून या गाडीला ३ डब्बे कायम स्वरूपी वाढवण्यात येणार आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय कार्यालयाचे व्यवस्थापक
उपिंदर सिंह यांनी ही माहिती दिली.
****
भारोत्तोलक मीराबाई चानू हिनं स्वत:च्या राष्ट्रीय
विक्रमात सुधारणा केली आहे. कोलकाता इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत मीराबाईनं स्नॅच
प्रकारात ८८ किलो तर क्लीन अँड जर्क प्रकारात ११५ किलो असं एकूण २०३ किलो वजन उचलून
स्वत:चाच २०१ किलोचा विक्रम मोडला. जागतिक मानांकनात मीराबाई आता चौथ्या क्रमांकावर
आहे
****
भारतीय क्रिकेट संघाच्या न्यूझीलंड दौऱ्यात उद्यापासून
सुरू होत असलेल्या एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठीच्या संघात रोहित शर्माच्या ऐवजी
मयांक अग्रवालचा समावेश करण्यात आला आहे. तर कसोटी संघात पृथ्वी शॉ ने पुनरागमन केलं
आहे.
*****
***
No comments:
Post a Comment