आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१५ फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
लहान आणि अल्पभूधारक
शेतकऱ्यांना कोणत्याही आपत्तीची झळ सर्वात जास्त बसत असल्यानं, त्यांच्या कल्याणाला
सर्वोच्च प्राधान्य द्यावं आणि त्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी वैज्ञानिक समुदायानं
प्रयत्न करावेत, असं आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे. ते काल
नवी दिल्ली इथं भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या 58व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
1950- 51 मध्ये 50 पूर्णांक 82 शतांश दशलक्ष टन असलेलं अन्नधान्याचं उत्पादन
2018-19 मध्ये 283 दशलक्ष टनांच्या पुढे गेल्याबद्दल उपराष्ट्रपतींनी यावेळी प्रशंसा
केली आहे.
****
नांदेड जिल्ह्यात गुणवत्ता विकास कार्यक्रमाअंतर्गत
कॉपीमुक्त परीक्षा अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण
डोंगरे, पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक
काकडे यांनी काल पालक आणि शिक्षकांशी संवाद साधून मार्गदर्शन केलं.
****
परभणी इथल्या तूर खरेदी केंद्राला विभागीय उपायुक्त
विजयकुमार फड यांनी काल भेट देऊन पाहणी केली. जिल्ह्यात पूर्णा आणि पालम इथंही हमी
भावानं शासनामार्फत तूर खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. पूर्णा इथं नाफेड मार्फत
तूर खरेदी तसंच देऊळगांव दुधाटे आणि गोळेगांव इथल्या पांदण रस्त्याच्या कामाचा शुभारंभ
तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या उपस्थितीत काल झाला.
****
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नांदेड शाखेच्या अध्यक्षपदी
अपर्णा नेरलकर यांची निवड करण्यात आली आहे. नाट्य परिषदेच्या काल नांदेड इथं झालेल्या
बैठकीत ही निवड झाली.
****
मनिला इथं सुरु असलेल्या
आशियाई सांघिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.
भारताचा उपांत्य फेरीतील सामना आज इंडोनेशियाविरुद्ध होणार आहे. भारतानं उपउपांत्य
फेरीत थायलंडचा ३ - २ असा पराभव केला.
****
परभणीचे
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी विकास माळी यांचं आज पहाटे निधन झालं. काल रात्री अन्नातून विषबाधा झाल्यानं अस्वस्थ वाटू लागल्याची
तक्रार त्यांनी केली होती. पहाटे साडे चार वाजेच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल
करण्यात येत असताना गाडीतच उलट्या झाल्या आणि हृदय विकाराचा झटका आल्या, त्यातच विकास
माळी यांचं निधन झालं.
*****
***
No comments:
Post a Comment