आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१० फेब्रुवारी २०२० सकाळी ११.०० वाजता
****
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बत्तीस राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशात नऊ हजार चारशे जणांना तपासणी तसंच देखरेखीखाली ठेवलं असल्याचं आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आतापर्यंत एकवीस विमानतळांवर एक हजार आठशे अठरा विमानं तसंच एक लाख सत्त्याण्णव हजारांहून अधिक प्रवाशांची या विषाणू संसर्गासंबंधी तपासणी झाली आहे. सर्व राज्यं तसंच केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक ती सर्व मदत केली जात असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
देशातल्या विविधतेतली एकता तसंच राष्ट्रीय एकात्मतेला चालना देण्यासाठी देशभरात आजपासून `एक भारत श्रेष्ठ भारत` या अभियानाला सुरुवात होत आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं या अभियानाचं आयोजन केलं आहे. येत्या २८ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान सुरू राहील. भारतातल्या विविध भागांना सांस्कृतिकदृष्ट्या एकमेकांशी जोडण्याच्या उद्देशानं, हे अभियान सुरू करावं, अशी कल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१५ साली मांडली होती.
****
काश्मीर खोऱ्यातल्या सव्वाशे नवे बंकर बांधायला प्रशासनानं मंजूरी दिली आहे. पाकिस्तानाकडून वेळी अवेळी होत असलेल्या गोळीबारामुळे, तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेच्या हेतुनं, त्यांना आसरा मिळावा यासाठी हे बंकर बांधले जात आहेत.
****
वर्धा जिल्ह्यात हिंगणघाट इथं रस्त्यात अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेल्या पीडितेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली आहे. आज सकाळी सात वाजेच्या सुमाराला तिनं अखेरचा श्वास घेतला. तिच्यावर गेल्या आठवड्यापासून नागपूरमध्ये उपचार सुरु होते.
****
थोर विचारवंत साहित्यिक नरहर कुरुंदकर यांच्या ३८ व्या पूण्यतिथी निमित्त आज नांदेड इथं त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करूण अभिवादन करण्य़ात आलं. यावेळी भारतीय भाषांचे अभ्यासक डॉ. गणेश देवी, कुरूंदकर यांच्या कन्या शामल पत्की, साहित्यिक डॉ शेषेराव मोरे उपस्थित होते.
****
पाचोऱ्याहुन धुळ्याकडे जात असलेली मोटार आणि बस दरम्यान झालेल्या भीषण अपघातात तीन जण मृत्यूमुखी पडले असून चौघं जखमी झाले आहेत.
****
No comments:
Post a Comment