आकाशवाणी औरंगाबाद.
संक्षिप्त बातमीपत्र
१७ जुलै २०१७ सकाळी १०.००
वाजता
****
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे माजी राज्यपाल
रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीनं लोकसभेच्या माजी
अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे.
****
संसदेचं पावसाळी
अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत १८ विधेयकं मांडण्यात
येणार आहेत.
वस्तू आणि सेवा
कर - जीएसटीच्या यशस्वीतेमुळे हे अधिवेशन नव्या उमेदीचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र
मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलत होते. या अधिवेशनात सर्व
पक्ष सकारात्मक चर्चा करुन देशहीताचे निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान,लोकसभा
अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनीही अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपण चालू देण्याचं आवाहन सर्व
पक्षांना केलं आहे.
****
दुर्गम आदिवासी
भागातल्या आश्रम शाळांमधले इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग बंद करणार असल्याचं,
राज्य शासनानं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आहे. आश्रम शाळांमधल्या विद्यार्थी मृत्यू
प्रकरणी दाखल एका याचिकेच्या सुनावणी दरम्यान सरकारनं, शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना
तीन किलोमीटरच्या परिघात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा उपलब्ध झाल्या असल्यानं, हा
निर्णय घेत असल्याचं सांगितलं.
****
शेतकरी असल्याचं
भासवून राज्यातल्या तूर खरेदी केंद्रांवर तूर विकण्यासाठी आणणार्या सुमारे चार हजार
व्यक्तींवर राज्य सरकार लक्ष ठेऊन आहे. अशा सर्व संशयित व्यक्तीची माहिती त्वरीत देण्याचे
आदेश राज्याच्या कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव बिजय कुमार यांनी संबंधित जिल्हाधिकार्यांना
दिले आहेत.
****
येत्या
२२ ऑगस्टला बॅंक उद्योगातल्या नऊ संघटना कामकाज बंद आंदोलन पुकारणार आहेत. महाराष्ट्र
स्टेट बॅंक कर्मचारी महासंघाचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी काल लातूर इथं पत्रकार
परिषेदत ही माहिती दिली.
****
No comments:
Post a Comment