Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 July 2017
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
****
अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात
सात जण ठार तर १९ भाविक जखमी झाले
आहेत. अनंतनाग जिल्ह्यात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दोन पोलिस चौक्यांवर
गोळीबार करून पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांनी यात्रेकरूंच्या बसवर गोळीबार केला. यात पाच
पहिलांसह सात जण ठार झाले. मृत यात्रेकरूंमध्ये महाराष्ट्रातल्या पालघर आणि डहाणू इथल्या
दोन महिलांचा समावेश आहे. अमरनाथ दर्शनानंतर भाविकांना घेऊन, ही बस जम्मू कडे परतत
होती. सुरक्षा पुरवलेल्या वाहनांच्या ताफ्यात नसलेली ही बस, सायंकाळी सात वाजेनंतरही
रस्त्यावर उतरवून, बसचालकानं अमरनाथ यात्रेच्या नियमाचा भंग केल्याचं, पीटीआयच्या वृत्तात
म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या हल्ल्याचा तीव्र
शब्दात निषेध केला असून, अशा भ्याड हल्ल्यांसमोर भारत कधीही झुकणार नाही, असं म्हटलं
आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती
यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
****
कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या भेट वस्तूंसंदर्भात
सरकारनं वस्तू आणि सेवा कराचे निकष स्पष्ट केले आहेत. पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक
किमतीच्या भेटवस्तू करपात्र ठरणार असून, त्यापेक्षा कमी किंमतीच्या भेटवस्तू जीएसटीच्या
अंतर्गत येणार नाहीत, असं अर्थ मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
****
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी काल नवी दिल्लीत
आयकर दात्यांसाठी आयकर सेतु या नव्या ई सेवेचं लोकार्पण केलं, या ॲपच्या सुविधेमुळे
करदात्यांना आयकर भरता येईल, तसंच पॅनसाठी अर्ज करता येईल. त्याचबरोबर कर विषयक माहिती
मिळणं, अधिक सुलभ होईल, असं जेटली म्हणाले. आयकर सेतु मुळे आयकर विभागाचा करदात्यांशी
थेट संवाद होणार असून, कर दात्यांनी नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसच्या माध्यमातून
आवश्यक माहिती तसंच सूचना वेळोवेळी दिल्या जाणार आहेत.
****
केंद्र
आणि राज्यांतली महाविद्यालयं,
विद्यापीठ आणि शैक्षणिक संस्थांमधल्या
प्राध्यापकांच्या वेतनात २२ ते २८ टक्क्यांची वाढ होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळानं, विद्यापीठ वेतन आयोग समितीद्वारे प्राध्यापकांच्या
वेतनात वाढ करण्यास मंजुरी दिली असून अन्य भत्यांविषयीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार
असल्याचं, मनुष्य़बळ विकास मंत्रालयाच्या सूत्रांकडून सांगण्यात आलं. या निर्णयामुळे
आठ लाख प्राध्यापकांना वेतनवाढ मिळणार आहे. सहा हजार रुपये मूळवेतन असलेल्या सह प्राध्यापकांच्या
वेतनात १० हजार ३९६ रुपये वाढ होणार आहे. तर सहयोगी प्राध्यापकांच्या वेतनात २३ हजार ६६२ रुपयांपर्यंत
वाढ होणार आहे.
****
दर्जाहीन कृषी महाविद्यालयांवर तातडीनं
कारवाई करणं आवश्यक असल्याचं, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. काल राजभवनात
कृषी विद्यापीठांच्या विविध विषयांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत
होते. गुणात्मक कृषी शिक्षणासाठी विद्यापीठांनी संलग्न कृषी महाविद्यालयांच्या
दर्जावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे, जी
महाविद्यालयं आवश्यक निकषांनुसार काम
करत नसतील, त्यांची मान्यता काढण्याबाबत विचार करावा,
असंही राज्यपालांनी यावेळी स्पष्ट केलं.
कृषी महाविद्यालयं आणि विद्यापीठांमधली रिक्त पदं भरण्यासाठी विभागानं तातडीनं कारवाई करावी, असे निर्देशही राज्यपालांनी
दिले.
****
मुख्यमंत्री
पेयजल योजनेअंतर्गत पुढच्या चार वर्षात राज्यात एक हजार नळ पाणी पुरवठा प्रकल्प राबवणार
असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल
कार्यक्रम आणि जलस्वराज्य प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांत, पाणी पुरवठा विषयक विविध १७१ प्रकल्पांचं ई भूमिपूजन काल मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. सध्या बंद असलेल्या ८३ प्रादशिक पाणी पुरवठा योजना
पुनरुज्जीवित करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल, असं ते म्हणाले, भूमिपूजन झालेल्या या
१७१ प्रकल्पांमध्ये मराठवाड्यात जालना
जिल्ह्यातल्या पराडा तसंच नांदेड जिल्ह्यातल्या सगरोळी आणि अर्जापूर इथल्या पाणी पुरवठा
योजना, तसंच जिल्ह्यातल्या १७
गावात पाणी शुद्धीकरण संयंत्र, हिंगोली, लातूर, परभणी, जालना, इथल्या पाणी तपासणी प्रयोगशाळा, तसंच मंठा इथल्या जल वेधशाळेचा समावेश आहे.
****
कर्ज मुक्तीचा लाभ मिळालेल्या ८९ लाख शेतकऱ्यांची यादी
बॅंकांकडून येत्या आठ दिवसात देण्यात यावी, अशी मागणी करत
शिवसेनेनं
काल राज्यभर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन केलं. पक्षाचे नेते तथा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी
काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन,
या आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली. कर्ज वसुलीसाठी बँक शेतकऱ्यांच्या घरासमोर ढोल वाजवून दबाव आणत असे, त्याच धर्तीवर
राज्यभरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसमोर ढोल वाजवा आंदोलन केल्याचं, कदम यांनी
सांगितलं. चिनी बनावटीच्या वस्तू, पाकिस्तानसोबत क्रिकेट या दोन्ही बाबींना विरोध करत,
कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या भूमिकेवरही टीका केली.
मराठवाड्यातही औरंगाबाद सह जालना, बीड, लातूर, नांदेड,
परभणी, हिंगोली आणि उस्मानाबाद, इथं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर तसंच
सर्व तालुक्यांमध्ये बँकेच्या शाखांसमोर ढोल वाजवून आंदोलन करण्यात आलं. या योजनेत लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं
मोठ नुकसान झाल्याचा आरोप करुन शिवसनेनं कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांना तातडीनं १०
हजार रुपये कर्ज वाटप करावं, यासह विविध मागण्या केल्या. उस्मानाबाद इथं आंदोलनानंतर
आपल्या मागण्यांचं निवेदन पक्षाच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य
कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं.
****
आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार
असल्याचं वृत्त चुकीचं असून, पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे सांभाळत असल्याचं, विधानसभेचे
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल शिर्डी इथं वार्ताहरांशी
बोलत होते.
****
देशातल्या एचआयव्ही - एड्स बाधितांसाठीच्या पहिल्या खाजगी
हॉस्पिटलचे संस्थापक डॉ. प्रदीप उगीले यांचं काल मुंबई इथं प्रदीर्घ आजारानं निधन झालं,
ते ५० वर्षांचे होते. पित्ताशयाच्या आजारासाठी त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते.
त्यांच्या पार्थिव देहावर आज लातूर
इथं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
वैद्यकीय
व्यावसायिकांच्या ‘कट प्रॅक्टिस’विरुद्धच्या कायद्याचा मसुदा तयार झाला असून, लवकर
त्याला अंतिम स्वरूप दिलं जाणार आहे. या संदर्भात स्थापन करण्यात आलेल्या समितीचे सदस्य
तथा वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ प्रवीण शिनगारे यांनी ही माहिती दिली. या मसुद्यात दोषी
असलेल्या डॉक्टरांना तीन वर्षापर्यंत सक्तमजुरीच्या शिक्षेसह डॉक्टरांची सनद रद्द करण्याची
तरतूद असल्याचं त्यांनी सांगितलं. या मसुद्यात जनतेच्या सूचनांचा अंतर्भाव करून, तो
न्याय विभागाकडून योग्य त्या दुरुस्त्यांसह मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या
बारावीच्या फेर परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. २८ जुलैपर्यंत ही परीक्षा चालणार
आहे. मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले दहा हजार ८९८ विद्यार्थी ही परीक्षा
देणार आहेत. या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना सप्टेंबरपासून शैक्षणिक
सत्रात प्रवेश देण्याची सुविधा आहे. त्यामुळे अनुत्तीर्ण झाल्यानंतरही विद्यार्थ्यांचे
वर्ष वाया जात नाही. याशिवाय गुणवत्ता वाढवण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांनाही
ही परीक्षा देता येते.
***
परभणी शहर आणि परिसरात काल अनेक दिवसांच्या
उघडिपीनंतर पावसानं हजेरी लावली. रात्री उशीरा झालेल्या या पावसामुळे
खरीप पिकांना जीवदान मिळणार आहे. जालना, तसंच
औरंगाबाद इथंही काल सायंकाळच्या सुमारास पावसानं हजेरी लावली.
****
पनवेल महानगरपालिकेच्या पहिल्या महापौरपदी भाजपच्या डॉ. कविता
चौतमल यांची तर उपमहापौरपदी माजी नगराध्यक्षा चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड झाली.
शेतकरी कामगार पक्ष आघाडीच्या उमेदवारांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्यानं ही निवड बिनविरोध
झाली.
****
****
लातूर
जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा येत्या डिसेंबर पर्यंत डिजिटल करण्यात येणार असून या साठी
लायन्स क्लब परिवारानं सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी केलं आहे. ते काल लातूर इथं लायन्स क्लबच्या पदग्रहण
सोहळ्यात बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्यातल्या दोन कृषी सेवा केंद्रांचा परवाना
रद्द करण्यात आला आहे. किनवट तालुक्यातल्या इस्लापूर इथल्या धनेश कृषी भांडार मध्ये
बनावट बियाणं आढळल्यानं, तसंच मुखेड तालुक्यातल्या बाऱ्हाळी इथल्या कैलास कृषी सेवा
केंद्रातून जादा दरानं खताची विक्री होत असल्यानं ही कारवाई करण्यात आली.
****
No comments:
Post a Comment