आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
९ एप्रिल
२०१८ सकाळी ११.०० वाजता
****
दहशतवादाला
संपवण्यासाठी जागतिक स्तरावर व्यापक धोरण तयार करणं गरजेचं असल्याचं राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांनी म्हटलं आहे. राष्ट्रपती आफ्रिकी देशांच्या दौर्यावर असून, इक्वेटोरियल
गिनी इथल्या संसदेत ते बोलत होते. दहशतवाद आणि त्यासोबत अंमली पदार्थांची तस्करी आणि
काळ्या पैशाचं वाढतं प्रमाण चिंतेची बाब असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रपतींना यावेळी
गिनीच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज दुपारनंतर ते स्वाजीलँडला
रवाना होणार आहेत.
****
देशात शांतता आणि सलोखा कायम राखण्यासाठी काँग्रेस
पक्षातर्फे आज राज्यातल्या सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण
केलं जाणार आहे. या उपोषणात काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचं
प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितलं.
****
अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड केल्याप्रकरणी
भारतीय जनता पक्षाचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांना अटक करण्यात आली आहे. शहरातल्या
केडगाव हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे संग्राम जगताप यांना पोलिसांनी सोडावं या मागणीसाठी
पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन तोडफोड करणाऱ्या ३० जणांवर भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हे
दाखल करण्यात आले होते, त्यामध्ये कर्डीले यांचा समावेश होता.
****
चित्रपट उद्योगात मोठ्या प्रमाणात
तंत्रज्ञान विकसित झालं, तरीही थिएटर - रंगभूमीला कोणीही समाप्त करू शकणार नाही, असं
प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुंबई इथं राष्ट्रीय
नाट्य विद्यालयाच्या वतीनं आयोजित आठव्या थिएटर ऑलिम्पिक्सच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. थिएटर ऑलिम्पिक्सच्या माध्यमातून भारतीय संस्कृती देशाच्या कानाकोपऱ्यात
पोहोचली असल्याचं केंद्रीय सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री
महेश शर्मा यावेळी म्हणाले.
****
देशाला आज पुन्हा क्रांतीची गरज वाटत असल्याचं महात्मा
गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं काल मार्क्स, गांधी, आंबेडकर
विचारमंथन संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी त्यांनी मूलतत्ववादी
विचारधारेवर जोरदारी टीका करत आंबेडकर-महात्मा गांधी यांच्याविषयी गैरसमज पसरवणाऱ्या
बद्दल खंत व्यक्त केली.
*****
***
No comments:
Post a Comment