आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०८ जून २०१९ सकाळी
११.०० वाजता
****
नैऋत्य मौसमी
पाऊस येत्या चोवीस तासात केरळमध्ये दाखल होईल, अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली
आहे. राज्यातही वळवाच्या पावसाचं क्षेत्र विस्तारलं असून, राज्याच्या विविध भागात काल
वळवाचा पाऊस झाला. मराठवाड्याच्या बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्याच्या
काही भागात, तसंच बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यांत काल वादळी वाऱ्यासह वळवाचा
पाऊस झाला. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या गंगामसला या गावामध्ये वादळी वाऱ्यानं
मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असून घर पडल्यानं चार जण गंभीर जखमी झाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे.
विदर्भात तुरळक
ठिकाणी वळवाच्या सरी कोसळल्या असल्या तरी तिथे उष्णतेची लाट कायम असून, विदर्भातल्या
सर्व जिल्ह्यात काल तापमान पंचेचाळीस अंश सेल्सियसच्या वर होतं.
****
चारा छावण्या
बंद करू नयेत आणि टँकर्सद्वारे होणारा पाणीपुरवठा वाढवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अजित पवार यांच्यासह काल मुख्यमंत्र्यांची
भेट घेऊन दुष्काळाबाबत चर्चा केली.
****
राज्यातल्या नऊ
जिल्ह्यांतल्या चारा छावण्यांमधून राहावे लागत असलेल्या शेतकऱ्यांना अन्नधान्य पुरवण्याचा
निर्णय शिवसेनेनं घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ राबवण्यात येणाऱ्या
या उपक्रमाचा शुभारंभ उद्या जालना जिल्ह्यातल्या सालेगाव इथे शिवसेना प्रमुख उद्धव
ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यातल्या
चामोर्शी तालुक्यातल्या चिचडोह धरणाचे सगळे अडोतीस दरवाजे येत्या १५ तारखेलाला उघडण्यात
येणार असून, लगतच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा लघुपाटबंधारे विभागाच्यावतीनं
देण्यात आला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या
भंडारदरा परिसरातला काजवा महोत्सव पाहून संगमनेरकडे परतणाऱ्या पर्यटकांची गाडी भंडारदऱ्याजवळ
दरीत कोसळल्यानं एक जण मृत्युमुखी पडला तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींतील एकाची प्रकृती
गंभीर आहे. काल मध्यरात्रीच्या सुमाराला हा अपघात झाला. जखमींनी नाशिकच्या रुग्णालयात
दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
No comments:
Post a Comment