Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 18 June 2017
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ जून २०१७ दुपारी १.००वा.
****
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज देशातल्या नोकरी आणि रोजगारांविषयीच्या स्थितीचा आढावा
घेणार आहेत. यासंदर्भातली संपूर्ण माहिती संकलित झाल्यानंतरच नोकरी आणि रोजगार निर्मितीसंबंधीचं
नवं धोरण ठरवता येईल, असं मत नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी नुकतंच व्यक्त
केलं होतं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंचवीस तारखेला ‘मन की बात’
या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. या दिवशी सकाळी अकरा वाजता आकाशवाणीवरून
हा कार्यक्रम प्रसारित होईल. नागरिकांनी आपले विचार आणि सूचना नरेंद्र मोदी ॲपवर किंवा
माय जीओव्ही ओपन फोरम वर पाठवाव्यात, असं पंतप्रधानांनी एका ट्वीटद्वारे सांगितलं आहे.
****
वस्तू
आणि सेवा कर परिषदेची १७ वी बैठक नवी दिल्ली
इथे आता सुरू झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री
अरूण जेटली यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला सर्व राज्यांचे,
तसंच केंद्रशासित
प्रदेशांचे अर्थमंत्री उपस्थित राहत आहेत. येत्या एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा
कर कायदा लागू होणार असून, या कायद्याच्या अंमलबजावणीसंदर्भात या बैठकीत चर्चा होणार
आहे. लॉटरीचे दर, ई-वे बिल यासह नफेखोरीला आळा घालण्याचे उपाय यासंदर्भातल्या नियमांना
या बैठकीत अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे.
****
काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या बिजबेहरा या भागात भारतीय
सैन्याच्या काफिल्यावर अतिरेकी हल्ला झाल्याचं वृत्त आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलांनी
या भागाला वेढा घातला आहे.
****
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या
विद्यार्थ्यांना वन्यजीवांविषयी माहिती देण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. याशिवाय
विद्यार्थ्यांना यासंबंधी ज्ञान मिळवण्यासाठी चालना मिळावी, यासाठी मंडळ राष्ट्रीय
पातळीवर वन्यजीवनावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धाही आयोजित करणार आहे. येणाऱ्या पिढीला
वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जागृत आणि प्रोत्साहित करावं, यासाठी हा निर्णय घेतल्याचं
मंडळानं सांगितलं आहे.
****
१८५७
च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातल्या
एक अग्रणी सेनानी
झाशीच्या राणी लक्ष्मीबाई, यांचा आज
स्मृतीदिन आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी राणी लक्ष्मीबाई यांना आदरांजली वाहिली आहे.
****
भारतीय
जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव
ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रावसाहेब दानवे हेसुद्धा
उपस्थित होते. ठाकरे आणि शहा यांच्यात राष्ट्रपतीपदाची निवडणूक, शेतकरी संप आणि कर्जमाफी
यासह इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली.
****
गडचिरोली
पोलिसांनी काल दुपारी महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर एका नक्षलवाद्याला अटक केली. सोमा
वेलाडी नावाचा हा नक्षलवादी, महाराष्ट्र, ओडिशा आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये गेल्या
वीस वर्षात घडलेल्या अनेक हिंसक नक्षलवादी कारवायांमध्ये सहभागी होता. या नक्षलवाद्याला
पकडणाऱ्यांना सोळा लाख रूपयांचं बक्षीस जाहीर झालेलं होतं.
****
दिल्ली-मुंबई
औद्योगिक मार्गिकेमधल्या औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटी, अर्थात ऑरिक सिटीच्या बिडकीन परिसरातल्या
कामाला येत्या तीन महिन्यात सुरूवात होणार आहे. यामध्ये सुमारे अडीच हजार एकर परिसरात
पायाभूत सुविधा उभारण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ऑरिक सिटीच्या
पायाभूत सुविधांसाठी मंजूर केलेल्या सुमारे सहा हजार आठशे अट्ठ्यांऐशी कोटी रूपयांच्या
निधीतून, तीन टप्प्यांमध्ये हे काम पूर्ण केलं जाणार आहे.
****
नांदेड
वाघाळा शहराच्या हरित क्षेत्र विकास प्रकल्पाला राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. केंद्र
शासनाच्या अमृत अभियानांतर्गत ही मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी दीड कोटी रूपयांचा
निधी मंजूर झाला असून, यातून वनक्षेत्र वाढवण्यासाठी
वृक्षलागवड करण्यात येणार आहे. तसंच लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी
कुंपणं आणि जाळ्या उभारणे यासह इतर सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत.
****
ऐतिहासिक औरंगाबाद शहराची जडणघडण आणि ऐतिहासिक ठेवा याबाबतची
माहिती सर्वांना असावी, या उद्देशानं इतिहासप्रेमींनी सुरु केलेला हेरिटेज वॉक आज सकाळी
हिमायत बागेत घेण्यात आला. इतिहास अभ्यासक डॉक्टर दुलारी आणि रफत कुरेशी यांनी इतिहास
प्रेमी नागरिकांना या परिसरातील चांदनी चबुतरा, शक्कर बावडी, बारादारी, समर पॅलेस या
वास्तू आणि वैशिष्ट्यांची माहिती दिली. यावेळी विद्यार्थी, इतिहास संशोधक आणि नागरिक
मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
औरंगाबाद शहराचं वैयक्तिक शौचालयं बांधण्याचं लक्ष्य पूर्ण
व्हावं, या उद्देशानं शासकीय अनुदानात पालिकेच्या निधीतून तीन हजार रुपयांची भर घालण्याची
तयारी महापालिकेच्या प्रशासनानं केली आहे. शासकीय अनुदानातून मिळणाऱ्या १२ हजार रुपयांत
शौचालयाचं बांधकाम आणि सेफ्टिक टँक बांधणं शक्य नसल्याची बाब अनेक लाभार्थिंनी पालिका
प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर पालिकेनं हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या
योजनेसाठी लाभार्थ्यांना १५ हजार रुपये मिळणार आहेत. स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत
राज्य शासनानं औरंगाबाद शहराला सात हजार वैयक्तिक शौचालयं बांधायचं लक्ष्य ठरवून दिलं
आहे.हे लक्ष्य पूर्ण व्हावं, यासाठी बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदारांची मदतही घेतली
जाणार आहे.
//*******//
No comments:
Post a Comment