Thursday, 27 December 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 27.12.2018 11.00AM


आकाशवाणी औरंगाबाद

संक्षिप्त बातमीपत्र

२७ डिसेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता

****



नाताळच्या सुटीनंतर संसदेच्या कामकाजाला आजपासून पुन्हा प्रारंभ होत आहे.

मुस्लीम महिला वैवाहिक अधिकार संरक्षण विधेयक २०१८ वर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. मंत्री रविशंकर प्रसाद हे सुधारित विधेयक सदनात सादर करतील. या विधेयकावर लोकसभेत होणाऱ्या चर्चेत काँग्रेस सहभागी होणार असल्याचं या पक्षानं आधीच जाहीर केलं आहे. भारतीय जनता पक्षानं, आपल्या सदस्यांना या विधेयकावरील चर्चेकरता लोकसभेत उपस्थित राहण्याबाबत व्हीप जारी केलं आहे.

*****



 निती आयोग आज महत्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमाची दुसरी मानांकन यादी जाहीर करणार आहे. आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत हे मानांकन जाहीर करतील. त्यात १ जून ते ३१ ऑक्टोबर या काळात जिल्ह्यांनी केलेल्या प्रगतीचं मूल्यांकन असेल. आरोग्य आणि पोषण, शिक्षण, कौशल्य विकास, आणि पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रातल्या कामगिरीच्या निकषावर जिल्ह्यांचं मानांकन ठरणार आहे.

****



भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तज्ञ  सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी माजी गर्व्हनर बिमल जालान यांची नियुक्ती झाली आहे. ही समिती रिझर्व्ह बँकेतल्या ठेवींचं आकारमान आणि सरकारला दिल्या जाणाऱ्या लाभांशाबाबत निर्णय घेईल. रिझर्व्ह बँकेनं काल जारी केलेल्या पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर या संदर्भात सुरु असलेल्या योजनांचा अभ्यास करायला या समितीला सांगितलं आहे.

****



 सांसद आदर्श ग्राम योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्याच्या वैजापूर तालुक्यातल्या पालखेड इथं बँक शाखा, गॅस एजन्सी, पाणी पुरवठा योजना, रस्ते यासह १३८ कामांपैकी ८५ कामं पूर्ण झाल्याची माहिती खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. पालखेड इथं भारतीय स्टेट बँकेच्या शाखेचं उद्घाटन खासदार खैरे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. उर्वरीत कामांसाठी लवकरच निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही खैरे यांनी यावेळी दिलं.

****



 भारत ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेट मालिकेत, मेलबोर्न इथं सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी भारतानं पाच बाद ३८४ धावा केल्या आहेत.



 अखेरचं वृत्त हाती आलं तेंव्हा रोहित शर्मा ३८ आणि ऋषभ पंत तीन धावांवर खेळत आहेत. भारतानं आज दोन बाद २१५ धावांवरून पुढं खेळण्यास सुरुवात केल्यानंतर चेतेश्र्वर पुजारानं आकर्षक १०६ धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ८२ तर अंजिक्य रहाणे ३४ धावांवर बाद झाला. चार सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आहेत.

*****

***

No comments: