आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१३ जून २०१९
सकाळी ११.०० वाजता
****
देशभरात असलेल्या वक्फ
बोर्डांच्या संपत्तीचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी व्हावा याकरता केंद्र सरकार एक योजना
राबवणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी
दिली आहे. नक्वी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं झालेल्या केंद्रीय वक्फ परिषदेच्या
बैठकीत काल ते बोलत होते. देशभरातल्या वक्फ बोर्डांच्या पाच लाख ७७ हजार रुपयांहून
अधिक संपत्तीची युद्धपातळीवर गणना केली जात असल्याचं नक्वी यांनी सांगितलं.
****
अन्न आणि नागरी पुरवठा विभागात माहिती तंत्रज्ञानाच्या झालेल्या
वापरामुळं भ्रष्टाचाराला मोठा आळा बसला असून शिधावाटप दुकानांचं
कामकाजही `ऑनलाईन` करण्यात येणार
असल्याची माहिती अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री जयकुमार रावल यांनी दिली आहे. अन्नधान्य वितरण व्यवस्थेचं संगणकीकरण करण्याच्या तसंच आधार क्रमांकाशी शिधापत्रिका
जोडण्याच्या प्रक्रीयेत कोणीही पात्र लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित राहणार नाही
याची दक्षता घेण्यात यावी, असं त्यांनी काल मंत्रालयात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना
सांगितलं.
****
राज्य
शासन आणि इशा फाउंडेशन यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार यवतमाळ जिल्ह्यातल्या
वाघाडी नदीचं पुनरूज्जीवन करण्यासाठी “रॅली ऑफ रिव्हर” हा प्रकल्प राबवण्यात येणार
आहे. यात यवतमाळ आणि घाटंजी तालुक्यातल्या ४० गावांमध्ये ६० लाख झाडं लावण्याचं उद्दीष्ट
ठरवण्यात आलं आहे. इशा फाउंडेशनचे प्रतिनिधी कृष्णन् सीतारामन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पात यवतमाळ तालुक्यातील २१ गावं आणि घाटंजी
तालुक्यातल्या १९ गावांचा समावेश असून एक आदर्श गावाचा समावेश आहे.
****
लातूर शहर महानगर पालिकेतल्या सफाई कर्मचाऱ्यांसहित
सर्वच कर्मचाऱ्यांचं गेल्या तीन महिन्यांपासूनचं वेतन थकलं आहे. या कर्मचाऱ्यांचे पगार
येत्या १५ जून पर्यंत केले नाहीत तर कार्यालयीन वेळेत उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला
देण्यात आला आहे. स्वीकृत नगरसेवक प्रकाश पाठक यांनी आयुक्त एम डी सिंह यांना पत्राद्वारे
कर्मचाऱ्यांना पगाराअभावी उद्भवलेल्या अडचणी कळवल्या असून आंदोलनाचा इशारा दिला असल्याचं
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment