Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 13
June 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जून
२०१९ दुपारी १.०० वा.
****
वायू या चक्रीवादळानं दिशा बदलली असून, ते गुजरातला
धडकण्याची शक्यता मावळली असल्याची माहिती भूविज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. राजीवन यांनी
दिली आहे. मात्र, या वादळाच्या प्रभावामुळे गुजरातच्या अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस
पडणार असल्याचं त्यांनी सांगितलं. खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारनं किनारपट्टीलगतच्या
जिल्ह्यांमध्ये सखल भागात राहणाऱ्या तीन लाखांहून जास्त लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
आहे. हे वादळ समुद्रात राहील आणि गुजरातच्या किनारपट्टीला समांतर वाटचाल करत राहील,
असं भारतीय हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक देवेंद्र प्रधान यांनी सांगितलं.
****
भाजप अध्यक्ष अमित शहा आज राज्य पक्षाध्यक्ष आणि
पक्ष सचीवांची बैठक घेत आहेत. महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड येथे होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची
रणनिती ठरवण्यासाठी ही बैठक होत आहे. या बैठकीत पक्षाच्या विभागांमधे संस्थात्मक निवडणूकांचं
वेळापत्रक ठरवणं, सभासद नोंदणी आणि पक्षाशी संबधीत मुद्यावरंही चर्चा होणार असून भाजपचे
राष्ट्रीय पदाधिकारीही या बैठकीत सहभागी होणार आहेत.
****
शासनामध्ये युवकांना सहभागी करुन घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून
`मुख्यमंत्री फेलोशिप` हा कार्यक्रम राबवण्यात येत असून, या मध्ये उद्या पर्यंत सहभागी
होता येणार आहे. योजनेत निवड झालेल्या युवकांचा उत्साह, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन आणि
तंत्रज्ञानातली त्यांची गती यांचा प्रशासनाला उपयोग व्हावा आणि त्या सोबतच युवकांनाही
शासनासोबत काम करण्याचा अनुभव मिळावा, हे या कार्यक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या
कार्यक्रमाच्या माध्यमातून उद्याचा महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनासोबत या, असं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी युवकांना केलं आहे. २१ ते
२६ वयोगटातला, प्रथम वर्ग पदवीधर आणि पूर्णवेळ कामाचा एक वर्षाचा अनुभव असलेल्यांना
या फेलोशिपसाठी `महादेस डॉट महाराष्ट्र ॲट द रेट जीओव्ही डॉट इन` या संकेत स्थळावर
अर्ज करता येणार आहे.
****
राज्य सरकारनं पुणे जिल्ह्यातील बारामतीला वळवलं
जाणारं पाणी थांबवून ते दुष्काळग्रस्त भागाकडे वळवण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील
निरा देवघर धरणाचं पाणी बारामती लोकसभा मतदार संघातील भागाला वळवण्यात येत होतं. त्यामुळं
सोलापूर आणि सातारा जिल्ह्याला पुरेसं पिण्याचं पाणी मिळत नसल्याची तक्रार होती. भाजपचे
नवनिर्वाचित खासदार रंजित नाईक निंबाळकर यांनी या संदर्भात पाठपुरावा केल्यानंतर हा
निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
सर्वोच्च न्यायालय विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते
धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध अनधिकृत जमीन खरेदीच्या आरोपांप्रकरणी गुन्हा नोंदवण्याच्या
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रकरणी उद्या सुनावणी घेणार आहे. बीड जिल्ह्यातील
अंबाजोगाई तालुक्यातील पुस इथं जमीन खरेदी केल्याप्रकरणी त्यांच्या विरुद्ध गुन्हा
नोंदवण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर उद्या सुनावणी घेऊ, असं न्यायमूर्ती
इंद्र बॅनर्जी आणि अजय रस्तोगी यांच्या सुटीच्या पीठानं म्हटलं आहे. मुंडे यांनी या
निर्देशांविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. संबंधित जागा सरकारच्या मालकीची
असून तिची खरेदी करून मुंडे यांनी ती बीड मधील मठाला दान केल्याप्रकरणी राजाभाऊ फड
यांनी दाखल केलेल्या याचिके प्रकरणी पोलिसांनी मुंडेंविरुद्ध गुन्हा नोंदवावा, असे
निर्देश उच्च न्यायालयाच्या पीठानं दिले होते.
****
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला नाशिक जिल्ह्यातल्या
मनमाडचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपयांची करंजवन
पाणीपुरवठा योजना राज्य शासनानं तत्वतः मंजूर केली आहे. काल मंत्रालयात मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा
निर्णय घेण्यात आला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं यावर तातडीनं अहवाल सादर करावा असे
आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. या योजनेसाठी मनमाड नगरपालिकेला लोकवर्गणीतून
पंचेचाळीस कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
****
नोटीस बजावल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं
नियमानुसार अग्निशामक यंत्रणा न लावणाऱ्या अमरावती जिल्ह्यातल्या अकरा खाजगी शिकवणी
वर्गांना महानगरपालिकेनं आज टाळं ठोकलं. सहाय्यक उपायुक्त योगेश पीठे यांच्या नेतृत्वात
ही कारवाई करण्यात आली. सुरत इथं खाजगी शिकवणी ला लागलेल्या भीषण आगीच्या दुर्घटनेनंतर
पालकांनी या बाबीकडे लक्ष वेधलं होतं.
*****
***
No comments:
Post a Comment