Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 09 September 2018
Time 6.50 AM to 7.00 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९
सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि.
****
Ø सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासाठी
राज्यात रस्त्यांचं जाळं निर्माण करण्याचं काम सुरू- मुख्यमंत्री
Ø
स्वच्छता अभियानाअंतर्गत ६० लाख शौचालयं बांधणारं महाराष्ट्र
देशात पहिल्या क्रमांकाचं राज्य
Ø
आंतरराष्ट्रीय निशाणेबाजी विश्वकप स्पर्धेत भारताच्या अंकुर
मित्तलला डबल
ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक
आणि
Ø
इंग्लंडविरूद्धच्या अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली;
पहिल्या डावात ६ बाद १७४ धावा
****
राज्यात सुरक्षित आणि सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण
करण्यासाठी दहा हजार किलो मीटरचे विविध कॉरीडोर, तीन हजार किलोमीटरचे औद्योगिक रस्ते,
शहरी भागात तीन हजार किलो मीटर सायकल ट्रॅक
आणि एक हजार किलोमीटरचे राज्यातंर्गत रस्ते निर्माणाचे कार्य सुरू असल्याची
माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्लीत दिली. नीती आयोगानं ‘मुव्ह
: ग्लोबल मोबिलीटी समीट’ या विषयावर घेतलेल्या परिसंवादात ‘गतिशीलतेसाठी सातत्य, सहभाग, संलग्नता विषयक धोरण
: राज्यांचा दृष्टीकोण’ या विषयावर ते बोलत होते.
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी
ही व्यवस्था सुगम आणि सुलभ करण्याची आवश्यकता आहे. या दिशेनं, राज्य शासन पाऊलं टाकत
असून प्रत्येक नागरीकाला तीनशे मीटरच्या आत एकापेक्षा जास्त वाहतुकीची साधनं उपलब्ध
व्हावी, यासाठी ‘सिंगल मोबीलीटी कार्ड’ उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी
सांगितले.
****
लोकशाहीच्या
परिघात परस्परांच्या अधिकारांविषयी सजग राहिलं पाहिजे, असं प्रतिपादन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी केलं आहे. भारती विद्यापीठाचे
संस्थापक - कुलगुरू डॉ. पतंगराव कदम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काल पुण्यात आयोजित डॉ.
पतंगराव कदम स्मृती प्रबोधन व्याख्यानमालेत “रुल ऑफ जस्टीस” या विषयावर
ते बोलत होते. "न्यायाचे राज्य" या संकल्पनेनं आपली
लोकशाही संरक्षित आहे. ही संकल्पना कोसळली तर "कायद्याचे राज्य" कोसळेल,
याकडेही सरन्यायाधीश मिश्रा यांनी लक्ष वेधलं.
मुख्यमंत्री
फडणवीस यांनी यावेळी केलेल्या भाषणात, गुणवंतांना शिक्षण, बेघरांना घरं, बेरोजगारांना
रोजगार, भूमिहिनांना जमिनी आणि उद्योजकांना सवलती हे धोरण अंगिकारल्यामुळे, महाराष्ट्र
हे राज्य देशात अग्रेसर असल्याचं नमूद केलं.
****
आगामी लोकसभा निवडणुकीत २०१४च्या
निवडणुकीपेक्षाही मोठा विजय मिळवू, असा विश्वास, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष
खासदार अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. भाजप राष्ट्रीय कार्यकरिणीच्या बैठकीला काल
नवी दिल्लीत सुरुवात झाली, त्यावेळी ते बोलत होते. शहा यांच्या अध्यक्षतेखाली, पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होत असलेल्या या बैठकीत, लोकसभा तसंच काही राज्य विधानसभांच्या
आगामी निवडणुकांसदर्भात चर्चा होणार असल्याचं पक्ष प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी सांगितलं.
****
धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात
तसंच सोलापूर विद्यापीठ नामांतरण मागणीसाठी झालेल्या आंदोलनातल्या आंदोलकांवरचे गुन्हे
मागे घेण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचं राज्याचे मंत्री राम शिंदे
यांनी म्हटलं आहे. काल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त, अहमदनगर
जिल्ह्यातल्या चौंडी इथं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धनगर समाज आरक्षणासंबंधी टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचा
अहवाल आला असून, कायदेशीर आणि राज्य शासन स्तरावर अपेक्षित कार्यवाही केली जाईल, असं
आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
स्वच्छता अभियानाअंतर्गत
चार हजार ४७२ कोटी रूपये निधीतून ६० लाख शौचालयं बांधणारं महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या
क्रमांकाचं राज्य ठरलं असल्याची माहिती पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर
यांनी दिली. राज्य शासनाचे संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम राज्यस्तरीय पुरस्कार काल
औरंगाबाद इथं, लोणीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. अहमदनगर
जिल्ह्यातल्या हिवरेबाजार या गावाला पहिला पुरस्कार, सातारा जिल्ह्यातल्या मन्याचीवाडी
आणि नांदेड जिल्ह्यातल्या शेळगाव गौरी या ग्रामपंचायतींना दुसरा पुरस्कार विभागून तर
तिसरा पुरस्कार रायगड जिल्ह्यातल्या धाटाव, आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजगड ग्रामपंचायतीला
विभागून प्रदान करण्यात आला. औरंगाबाद तालुक्यातल्या लाडसावंगी गावात ‘स्वच्छता आणि
आरोग्य विषयक जनजागृती’ केल्याबद्दल, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांचा,
लोणीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
****
इंधन दरवाढीविरोधात
शिवसेनेच्या वतीनं काल औरंगाबाद शहरातल्या विविध पेट्रोल पंपावर वाढत्या इंधन दराचा
आलेख असलेले ‘हेच का अच्छे दिन’ असे फलक लावून आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसेना
पदाधिकाऱ्यांनी औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर ९१ रूपये लिटर तर डिझेलचा दर ७८ रूपये आणि
गॅसचा दर ८५० रूपये असल्याचं सांगून, या दरवाढीमुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन
कोलमडले असून हे दर कमी करण्याची मागणी केली.
पेट्रोल आणि डिझेलवाढी विरोधात
उद्या काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी भारत बंदचं आवाहन केलं आहे. पेट्रोल आणि डिझेलसह
घरगुती वापराच्या गॅसची दरवाढ तसंच महागाई विरोधात हा बंद पुकारला असल्याचं,
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी काल मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत
सांगितलं. शिवसेना आणि महाराष्ट्र नव निर्माण सेना पक्षांनीही या बंदमध्ये सहभागी
व्हावं असं आवाहन निरुपम यांनी केलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष
अशोक चव्हाण यांची या पक्षातल्या नेत्यांशी चर्चा सुरु असल्याची माहिती निरुपम
यांनी यावेळी दिली.
उस्मानबाद शहर काँग्रेस समितीच्या वतीनं
यासंदर्भात जारी केलेल्या पत्रकात उद्या सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत बंद पाळला
जाणार असल्याचं म्हटलं आहे.
****
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री
उज्ज्वला योजनेमुळे ग्रामीण भागातल्या घरांपर्यत गॅस सिलिंडर पोहचलं आहे. हिंगोली जिल्ह्यातल्या
कळमनुरी तालुक्यातल्या जरोडा गावच्या लाभार्थी ज्योती बहात्तरे यांनी गॅस जोडणी मिळाल्यामुळे
धुरापासून सुटका झाली, त्यामुळे डोळ्यांवर
आणि शरीरावर होणारा दुष्परिणाम नाहीसा झाल्याचं सांगितलं….
ज्योती
गौतम बहात्तरे. राहणार जरोडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. उज्ज्वला गॅस मिळालेला
आहे. धुरापासून आम्ही मुक्त झालेलो आहो. या गॅसमुळे आमचं सर्व कुंटूब सुखी आणि धुरापासून
आणि सर्व प्रदूषणापासून मुक्त झालेल आहे.
****
लातूर शहरात महापालिकेच्यावतीनं
अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येत आहे. शहरातली वाहतुकीची कोंडी सोडवण्यासाठी ही मोहीम
राबवण्यात येत असून, या दरम्यान ज्यांच्या जागांचे वाद न्यायालयात आहेत त्यांचे निकाल
लागल्यानंतर त्यांना कायद्यानुसार नुकसान भरपाई
देण्यात येणार असल्याचं आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं काल एका रस्ता
अपघातात एकाचा मृत्यू झाला. औंढा जिंतूर रस्त्यावर काल पहाटेच्या सुमारास हा अपघात
झाला.
****
दक्षिण
कोरियाच्या चाँगवान इथं सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय निशाणेबाजी क्रीडा संघटनेच्या
विश्वकप स्पर्धेत भारताच्या अंकुर मित्तलनं डबल ट्रॅप प्रकारात सुवर्णपदक जिंकलं आहे.
आतापर्यंतचा आपला सर्वात मोठा विजय मिळवताना अंकुरनं १५० पैकी १४० गुण मिळवले. तसंच
सांघिक खेळात त्यानं शार्दुल विहान आणि मोहम्मद असाद सोबत कांस्यपदक जिंकलं.
****
पाचव्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट
सामन्यात काल दुसऱ्या दिवशी भारताची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. दिवसअखेर भारतानं ६ बाद
१७४ धावा केल्या. तत्पूर्वी इंग्लंडचा पहिला डाव ३३२ धावांवार संपुष्टात आला. भारत
अजून १५८ धावांनी मागे आहे. सध्या हनुमा बिहारी २५ धावांवर तर रविंद्र जडेजा ८ धावांवर
खेळत आहे. पाच सामन्यांची ही मालिका इंग्लंडनं ३-१ ने यापूर्वीच जिंकली आहे.
****
पुण्याच्या नागरी विकास संघातर्फे दिला
जाणारा मराठवाडा भूषण पुरस्कार हिंगोलीचे विधान परीषदेचे आमदार रामराव वडकुते यांना
जाहीर झाला आहे. राजकीय क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. येत्या १७ सप्टेंबरला मराठवाडा
मुक्तिसंग्राम दिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल.
****
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला, बैलपोळ्याचा सण आज सर्वत्र साजरा होत आहे. काल ठिकठिकाणच्या
जलाशयांमध्ये शेतकऱ्यांनी आपल्या बैलजोड्या धुवून खांदेमळणीचा दिवस साजरा केला. पोळा
सण साजरा करण्यासाठी, आवश्यक साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांची बाजारपेठेत गर्दी दिसून येत आहे. आज पोळ्यानिमित्त, बैलजोड्या सजवून मिरवण्याचा आणि बैलांना पुरणपोळी खाऊ घालण्याचा
प्रघात आहे.
*****
***
No comments:
Post a Comment