आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
५ सप्टेंबर २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
माजी राष्ट्रपती शिक्षणतज्ज्ञ डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन्
यांचा जन्मदिवस - शिक्षकदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा
होत आहे. आज नवी दिल्ली इथं विज्ञान भवनात आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते
राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान
केले जात आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिक्षक दिनाबद्दल
देशातल्या शिक्षकांना शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु-शिष्य परंपरा हे भारतीय संस्कृतीचं
वैशिष्ट्यं असल्याचं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
भारत हा आर्थिक क्षेत्रासोबतच क्रीडा क्षेत्रातही
प्रगती करत असल्याचं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. काल नवी दिल्लीत
सिंह यांच्या हस्ते आशियाई क्रीडा स्पर्धेतल्या पदक विजेत्या खेळाडुंचा सत्कार झाला,
त्यावेळी ते बोलत होते. पदक विजेत्या खेळाडूंच्या कामगिरीनं देशवासी अत्यंत आनंदित
झाल्याचं, ते म्हणाले.
****
नाशिक शहरातली ७२ बेकायदा धार्मिक स्थळं
हटवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे
धार्मिक स्थळांचा वर्गीकृत अहवाल तयार करण्यात आला नाही, तसंच नागरिकांच्या हरकती आणि
सूचना मागवण्यात आल्या नाहीत, त्या आधारे न्यायालयानं पुढच्या सुनावणीपर्यंत कारवाईस
स्थगिती दिली.
****
ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचं आज पहाटे निधन
झालं. त्या ७२ वर्षांच्या होत्या. ‘आभाळमाया’, ‘काहे दिया परदेस’ ‘कुंकू, टिकली आणि
टॅटू’ आदी दूरचित्रवाणी मालिकांमधून त्यांनी साकारलेल्या आजीच्या भूमिका प्रेक्षकांच्या
स्मरणात आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या बोलठाण इथला पोलिस पाटील
जब्बार सत्तार पठाण याला २० हजार रूपये लाच घेतांना काल लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं
सापळा रचून अटक केली. आत्महत्येच्या एका प्रकरणात, मयताच्या पत्नीवर आत्महत्येस प्रवृत्त
केल्याचा गुन्हा दाखल न करता प्रकरण मिटवण्यासाठी
त्यानं ही लाच मागितली होती.
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यात अपसिंगा
इथं कार्यरत वन मजूर शाहू सोनवणे याला काल एक हजार रुपये लाच घेतांना अटक करण्यात आली.
चराई परवाना देण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
*****
***
No comments:
Post a Comment