आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१४ मे २०१८ सकाळी ११.०० वाजता
****
उत्तरप्रदेश, पश्चिम
बंगाल, आंध्रप्रदेश आणि नवी दिल्लीत काल संध्याकाळी झालेल्या वादळ
आणि मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसानं जवळजवळ ४२ जणांचा
मृत्यू झाला, तर ५९
जण जखमी झाले. नवी
दिल्लीत ताशी १०९ किलोमीटर वेगानं आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका विमान, रेल्वे
आणि मेट्रो सेवेला बसला. या वादळामुळे काहीकाळ विमान सेवा बंद ठेवण्यात आली. उत्तर
प्रदेशातल्या पूर्वेकडच्या जिल्ह्यांत येत्या २४ तासात
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
दरम्यान,
या वादळात मृत्यूमुखी पडलेल्यांप्रती राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. वादळाचा
फटका बसलेल्या भागांना सर्वतोपरी आणि तातडीची मदत करण्याचे निर्देश पंतप्रधानांनी संबंधित यंत्रणेला दिले.
****
भाजपाचे
राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं पक्षाच्या
पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. २०१९ च्या
लोकसभा निवडणुकीसह इतर अनेक महत्वाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा तसंच
राजकीय घडामोडींचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. येत्या
१७ तारखेला होणाऱ्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या
परिषदेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे. या
परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित
करणार असून, सरकारच्या शेवटच्या वर्षातली रुपरेखा या परिषदेत निश्चित
केली जाणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
औरंगाबाद शहरात तीन दिवसांपूर्वी झालेल्या दंगलीच्या
पार्श्वभूमीवर बंद मोबाईल इंटरनेट सेवा आज दुपारनंतर सुरु होण्याची शक्यता पोलिस यंत्रणेनं
व्यक्त केली आहे. शहरातली परिस्थिती आता सुरळीत आहे.
****
वाढत्या तापमानामुळे जालना जिल्ह्याच्या ग्रामीण
भागात जलसाठ्यात झपाट्यानं घट होत असल्यानं अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली
आहे. टंचाई निवारणासाठी प्रशासनाकडून जिल्ह्याच्या ५४ गावांमध्ये ६२ टँकरद्वारे पाणीपुरवठा
केला जात आहे. तसंच पाणीपुरवठ्यासाठी २०५ विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे.
*****
***
No comments:
Post a Comment