Wednesday, 7 May 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 07.05.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date - 07 May 2025

Time 01.00 to 01.05 PM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०७ मे २०२ दुपारी १.०० वा.

****

भारतानं मध्यरात्री पाकिस्तानमधील नऊ अतिरेकी ठिकाणांवर हल्ला करीत पहलगाममधील अतिरेकी हल्ल्याचा बदला घेतला. या मोहिमेत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमध्ये असलेले अतिरेक्यांचे महत्त्वाचे नऊ तळ भारतीय लष्कराने उद्ध्वस्त केले आहेत. मध्यरात्री दीडच्या सुमारास हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये ९० अतिरेकी ठार झाल्याचं वृत्त आहे.

****

विदेश मंत्रालयानं आज सकाळी पत्रकार परिषदेत या कारवाईसंदर्भात सविस्तर माहिती दिली. यावेळी विंग कमांडर कर्नल सोफिया कुरेशी यांनी सांगितलं की, मध्यरात्री १ वाजून पाच मिनिट ते एक वाजून तीस मिनिटांपर्यंत ही कारवाई करण्यात आली. त्या म्हणाल्या

बाईट - विंग कमांडर कर्नल सोफिया कुरेशी

****

भारतानं केलेल्या या कारवाईत कुठेही पाकिस्तान लष्करी तळ अथवा सामान्य नागरिकांना लक्ष्य करण्यात आलेलं नाही. भारतात झालेल्या अतिरेकी हल्ल्यात सहभागी असलेल्या अतिरेकी संघटनांच्या ठिकाणांनाच या कारवाईत लक्ष्य करण्यात आलं आहे.

****

ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आलेल्या या मोहिमेत पाकिस्तानमधील अतिरेकी संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिदीन यासह इतर दहशतवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त केले. बहावलपूर, चक आमरू, भिंबेर, मुरीदके, मुझफ्फराबाद, कोटली, सियालकोट, गुलपूर आणि बाघ या पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील अतिरेकी तळांवर भारतानं मध्यरात्री क्षेपणास्त्र डागले. हल्ल्यादरम्यान भारतानं पाकिस्तानात काही ठिकाणी १०० किलोमीटर असलेल्या अतिरेकी तळांना लक्ष्य केलं. दरम्यान, पाकिस्ताननेही या हल्ल्याला दुजोरा दिला आहे.

****

हवाई हल्ल्यानंतर भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोबाल यांनी अमेरिकी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली आणि भारताने केलेल्या कारवाईची माहिती दिली. त्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया देत भारताला अशी कारवाई करण्याचा अधिकार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायलच्या राजदुतांनीही भारताने केलेल्या या कारवाईचे समर्थन केलं आहे. भारतानं केलेल्या कारवाईची माहिती वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्यांनी अनेक देशांमधील त्यांच्या समकक्ष अधिकाऱ्यांना दिली आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि रशिया यांचा समावेश आहे.

****

भारताच्या कारवाईनंतर मध्यरात्री पाकिस्तानी सैन्याने जम्मू-काश्मीरजवळील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील चौक्यांवरून अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. भारतीय सैन्यानेही पाकिस्तानला चोख प्रत्यूत्तर दिलं आहे. भारतीय हवाई दलानं श्रीनगर विमानतळ बंद केल्याची पुष्टी केली आहे. यामुळे आज सर्व नागरी उड्डाणे पूर्णपणे रद्द करण्यात आली आहेत. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, कुपवाडा आणि गुरेझमध्ये आज शाळा आणि महाविद्यालयांसह शैक्षणिक संस्था बंद राहतील. काश्मीर विद्यापीठाने आज होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

****

ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक देशांतर्गत उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोटला जाणारी आणि जाणारी विमाने या महिन्याच्या १० तारखेपर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.दरम्यान, इंडिगोने आज श्रीनगर, जम्मू, अमृतसर, लेह, चंदीगड, धर्मशाळा, बिकानेर आणि जोधपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या विमान सेवा रद्द केल्या आहेत. विमानतळावर जाण्यापूर्वी सर्व प्रवाशांना त्यांच्या विमानांची स्थिती तपासण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

****

पाकिस्तानमधील कर्तारपूर इथल्या गुरुद्वारा दरबार साहिबच्या यात्रेसाठी उघडलेला कर्तारपूर कॉरिडॉर आज बंद करण्यात आला असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. पुढील सूचना मिळेपर्यंत कॉरिडर बंद राहाणार असल्याचंही सूत्रांनी सांगितलं. कर्तारपूर कॉरिडॉर हा भारत आणि पाकिस्तानला जोडणारा व्हिसा-मुक्त तीर्थयात्रा मार्ग आहे. शीख धर्माचे संस्थापक श्री गुरु नानक देव जी यांच्या ५५० व्या जयंतीनिमित्त २०१९ मध्ये या कॉरिडॉरची स्थापना करण्यात आली होती.

****

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक माधव वझे यांचं आज सकाळी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. प्र. के. अत्रे दिग्दर्शित श्यामची आई या चित्रपटातील माधव वझे यांनी साकारलेली श्यामची प्रमुख भूमिका खूप गाजली होती. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पहिला सुवर्ण कमळ हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाला होता. डिअर जिंदगी, थ्री इडियट्स या हिंदी चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका स्मरणीय आहेत. अभिनयासोबतच त्यांनी विपूल लेखन केलं होतं. त्यांच्या प्रायोगिक रंगभूमी - तीन अंक या ग्रंथाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता.

****

या बरोबरच हे बातमीपत्र संपलं, आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी.

No comments: