Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 04 April 2026
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०४ एप्रिल २०२६ सकाळी ७.१० मि.
****
·
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा
केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं पर्व असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन
·
छत्रपती संभाजीनगर इथं एलपीजी चोरीचं रॅकेट उध्वस्त-सव्वा
कोटींचा मुद्देमाल जप्त;दोघांना अटक
·
नाशिक जिल्ह्यात दिंडोरी इथे चारचाकी वाहन विहीरीत पडून
९ जणांचा मृत्यू
·
येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात चुनखडी सोहळा
पारंपरिक पद्धतीने साजरा
·
'इंडिया स्किल्स स्पर्धेत महाराष्ट्र संघाची ४ सुवर्णपदकांसह लक्षणीय
कामगिरी
आणि
·
हवामान विभागाकडून मराठवाड्याच्या अनेक भागात पावसाचा
इशारा
****
भारतरत्न
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती सोहळा हा केवळ उत्सव नसून विचारांचा प्रसार करणारं
पर्व असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. येत्या १४ एप्रिलच्या
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त पूर्वतयारीच्या अनुषंगाने काल
झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. समाजाला मिळणाऱ्या संधी, हक्क आणि
प्रगती यामागे कोणाचं योगदान आहे, हे नव्या पिढीला समजणं आवश्यक
असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.
१४ एप्रिल
रोजी होणाऱ्या जयंती उत्सवासाठी देशभरातून लाखो अनुयायी नागरिक चैत्यभूमीवर येतात.
त्यांच्यासाठी आवश्यक सोयीसुविधांची सर्वंकष व्यवस्था करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी
या बैठकीत दिल्या.
****
राज्य शासनाने
महसुल विभागासाठी ३५ हजार ६०० पदांचा आकृतीबंध मंजूर केला आहे. महसूल मंत्री तथा नागपूरचे
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. ते काल नागपुरात प्रसार माध्यमांशी
बोलत होते. या निर्णयामुळे राज्यात ११ नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयं, आठ नवीन एसडीओ
कार्यालयं, दोन नवीन तहसीलदार कार्यालयं, तर ६९ अप्पर तहसीलदार कार्यालय तयार होतील, असं बावनकुळे
यांनी सांगितलं.
****
राज्यातील
सर्व राजकीय पक्षांनी आपल्या नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी भोंदू
बाबा-बुवांबाबत स्पष्ट आणि कडक आचारसंहिता जाहीर करावी, असा ठराव
नाशिक इथे पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या संघर्ष परिषदेत काल
करण्यात आला. परिषदेचं उद्घाटन ज्येष्ठ कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांच्या हस्ते
झालं. अशोक खरातकडे जाणारे आमदार तसंच मंत्र्यांना पदावर राहण्याचा
अधिकार नसून, संबंधित अधिकाऱ्यांचेही राजीनामे घ्यावेत,
अशी मागणी कराड यांनी केली. तर अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे
यांनी खरात प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा केला जाईल, आणि आगामी
काळात बुवाबाजीविरोधातील लढा अधिक तीव्र केला जाईल, असं स्पष्ट
केलं.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात एलपीजी गॅस चोरीचं रॅकेट उध्वस्त करण्यात आलं असून, दोघांना अटक
करण्यात आली आहे. शिधावाटप नियंत्रक आणि राज्यस्तरीय दक्षता पथकानं गंगापूर तालुक्यातील
खोजेवाडी शिवारात ही कारवाई केली. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीच्या एलपीजी टँकरचं सील
तोडून अत्यंत धोकादायक पद्धतीनं गॅसची चोरी सुरू असताना पथकानं धाड टाकली, या कारवाईत एकूण ३५ हजार २२० किलो एलपीजी असलेले दोन टँकर तसंच व्यावसायिक
आणि घरगुती वापराचे एकूण २६ सिलिंडर्स असा सुमारे एक कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल
जप्त करण्यात आला. सुमारे अडीच हजार कुटुंबांना किमान महिनाभर पुरेल, एवढ्या गॅसचा काळाबाजार या ठिकाणी सुरू असल्याचं, याबाबतच्या
वृत्तात म्हटलं आहे.
****
केंद्र
सरकारनं एलपीजी गॅस आणि इतर पेट्रोलियम उत्पादनांची साठेबाजी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी
राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. पेट्रोलियम
आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव डॉ. नीरज मित्तल यांनी यासंदर्भात राज्यांना पत्र
पाठवलं आहे.
दरम्यान, पश्चिम आशियातील
संघर्षाच्या परिस्थितीत देखील भारतातल्या घरगुती ग्राहकांना इंडियन ऑइल कंपनी दररोज
२८ लाख एलपीजी सिलिंडर्सचा पुरवठा करत आहे, हे प्रमाण युद्धपूर्व
काळातल्या गॅस पुरवठ्याच्या जवळपास पोहोल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
****
आयएनएस
तारागिरी ही अत्याधुनिक युद्धनौका काल नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. संरक्षणमंत्री
राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत विशाखापट्टणम इथल्या नौदलाच्या गोदीत हा समारंभ पार
पडला. अभेद्यतेची अनेक प्रगत वैशिष्ट्यं आणि आधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज अशी ही युद्धनौका, माझगाव डॉक
शिपबिल्डर्स कंपनीने बांधली आहे.
****
गुडफ्रायडे
निमित्त काल देशभरातल्या चर्चेसमधे विशेष प्रार्थना सभा पार पडल्या. प्रभू येशूच्या
पुनरुत्थानाचा सण ईस्टर संडे उद्या साजरा होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणच्या
चर्चेसमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात आलं.
केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशातून आदरांजली अर्पण
केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही छत्रपती
शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन केलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातील
दिंडोरी इथे काल चारचाकी विहीरीत पडून ९ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये ५ विद्यार्थ्यांचा
समावेश आहे. खासगी शिकवणी वर्गाचं स्नेहसंमेलन आटोपून परतत असताना, सदर चारचाकी
शेतातील एका विहिरीत कोसळली. रात्री उशिरापर्यंत बचावकार्य राबवत सर्व मृतदेह बाहेर
काढण्यात आले.
****
परभणी तालुक्यातील
समसापूर शिवारात सुरू असलेल्या अवैध फटाके निर्मिती अड्ड्यावर पोलिसांनी काल कारवाई
केली. या कारवाईत फटाके तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे स्फोटकं, रसायनं आणि
इतर साहित्य असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, या प्रकरणी संजय सदाशिव शिंदे आणि सुदर्शन सदाशिव शिंदे या दोघांविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे.
****
धाराशिव
जिल्ह्यात येरमाळा इथल्या येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा उत्सवात काल चुनखडी वेचण्याच्या
सोहळा पारंपरिक पद्धतीने पार पडला. डोंगरावरून निघालेली देवीची पालखी दुपारी आमराईमध्ये
दाखल होताच, जमलेल्या हजारो भाविकांनी चुनखडी वेचून पालखीवर उधळण केली,
यावेळी पालखीवर हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी करण्यात आली.
दरम्यान, श्री क्षेत्र
तुळजापूर इथे श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात श्री चैत्र पौर्णिमा उत्सवातील प्रमुख
आकर्षण असलेला छबिना काल रात्री काढण्यात आला. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह शेजारील
कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणातील भाविक
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापुरात मोठ्या संख्येने दाखल झाले.
****
वर्ल्ड
स्किल्स' स्पर्धेसाठी रंगीत तालीम मानल्या जाणाऱ्या 'इंडिया स्किल्स २०२५-२६' स्पर्धेत महाराष्ट्रातील स्पर्धकांनी
४ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कांस्यपदक अशी एकूण १७ पदकं पटकावली
आहेत. उत्तर प्रदेश मधल्या ग्रेटर नोएडा मध्ये ही स्पर्धा पार पडली. या यशाबद्दल कौशल्य,
रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात
लोढा यांनी संपूर्ण चमूचं आणि विजेत्याचं अभिनंदन
केलं आहे.
चीनमधील
शांघाय इथं सप्टेंबर मध्ये होणाऱ्या 'वर्ल्ड स्किल्स' स्पर्धेसाठी आता या विजेत्यांच्या प्रशिक्षणाची पुढील फेरी लवकरच सुरू होणार
आहे.
****
दैनंदिन
कामाचा ताण-तणाव हलका होण्यासाठी प्रत्येकाने खेळ अवश्य खेळावा, असं आवाहन
परभणीच्या पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केलं आहे. विभागीय महसूल क्रीडा
सांस्कृतिक स्पर्धेत सहभागी स्पर्धकांना काल त्या संबोधित करत होत्या. परभणी इथं कृषी
विद्यापीठाच्या अश्वमेध मैदानावर तीन दिवस चालणाऱ्या या सोहळयात विविध स्पर्धा होत
आहेत.
****
बीड शहरासाठी
२०१७ मध्ये मंजूर झालेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा, आमदार विजयसिंह
पंडित यांनी जीवन प्राधिकरणच्या मुख्य अभियंत्यांकडून आढावा घेतला. अनियमितता आणि कामातील
दिरंगाई प्रकरणी त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे निर्देश दिले.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी काल पदभार स्वीकारला.
शिक्षण, आरोग्य, पर्यटन विकास यासह जिल्ह्याच्या
सर्वांगिण विकासासाठी आपण काम करु असं गौडा यांनी म्हटलं आहे.
****
लातूर शहराचा
पाणीपुरवठा कालपासून सुरळीत करण्यात आला. शहराला
धनेगाव धरणातून पाणी पुरवठा होतो. मात्र वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे विद्युत
पुरवठा बंद पडल्यानं, पाणी पुरवठा विस्कळीत झाला होता.
****
छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यातल्या जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणी परिसरात काल मधमाशांनी
पर्यटकांवर हल्ला केला. या घटनेत सुमारे ८२ पर्यटक जखमी झाले. गेल्या दोन महिन्यांतली
ही सहावी घटना आहे.
****
धाराशिव
शहर आणि परिसरात काल सायंकाळी पाऊस झाला. या पावसामुळे येरमाळा इथल्या येडाई देवीच्या
यात्रेसाठी जमलेल्या तसंच तुळजापूर इथल्या तुळजाभवानी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्त
जमलेल्या यात्रेकरूंची तारांबळ उडाली.
बीड जिल्ह्यात
अनेक भागात काल जोरदार वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे अनेक घरांवरचे पत्रे उडून
गेले, तसंच गहू, ज्वारी, मक्यासह अनेक पिकांचं आणि फळबागांचं नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही
काल पाऊस झाल्याचं वृत्त आहे. जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासून मेघगर्जनेसह मध्यम
स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाली आहे.
दरम्यान
मराठवाड्यासह राज्यात आज तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
****