आकाशवाणी औरंगाबादची बातमीपत्र AIR CHHATRAPATI SAMBHAJINAGAR NEWS
Monday, 15 December 2025
Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 15.12.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date
– 15 December 2025
Time
7.10 AM to 7.20 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ डिसेंबर २०२५ सकाळी ७.१० मि.
****
·
नागपूर अधिवेशनाचा समारोप,१६ विधेयकं
मंजूर,२३ फेब्रुवारीपासून मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन
·
राज्याची अर्थव्यवस्था सक्षम आणि स्थिर, मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन- मराठवाडा ‘ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित होत असल्याची माहिती
·
अधिवेशनातून विदर्भ आणि राज्याच्या वाट्याला काहीही आलं
नाही, विरोधकांची टीका
·
परभणी शहर आणि ग्रामीण तहसील कार्यालयाचा प्रस्ताव, तर जालना
जिल्ह्यातल्या ७८ तांड्यांना स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा-महसूल विभागाची माहिती
आणि
·
राज्याच्या बहुतांश भागात पारा घसरला, पुढील दोन
दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता
****
विधीमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. या अधिवेशनादरम्यान विधानसभेच्या सात बैठकांमध्ये
एकंदर ७२ तास ३५ मिनिटं काम झाल्याची माहिती विधानसभेचे राहुल नार्वेकर यांनी दिली.
तर विधानपरिषदेच्या सात बैठकांमध्ये ४८ तास १६ मिनिटं कामकाज झालं, असं विधानपरिषदेचे
सभापती राम शिंदे यांनी सांगितलं. या कालावधीत विधानसभेत एकंदर १८ विधेयकं पुनर्स्थापित
करण्यात आली आणि त्यातली १६ मंजूर झाली, तर विधानपरिषदेत ४ विधेयकं
संमत झाली. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ पासून मुंबईत होणार
आहे.
****
महाराष्ट्राची
अर्थव्यवस्था आजही देशातली सर्वाधिक सक्षम आणि स्थिर असून, सर्व आर्थिक
निकषांवर राज्य पात्र ठरत असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी म्हटलं आहे. विधानसभेत काल अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना
ते बोलत होते. कर्ज, राजकोषीय तूट, गुंतवणूक,
रोजगारनिर्मिती, सिंचन, वीज,
दळणवळण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात राज्याने भरीव काम
केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्याची अमृत महोत्सवाकडे वाटचाल सुरू असताना
पुढचा काळ महाराष्ट्रासाठी अत्यंत निर्णायक असल्याचं त्यांनी नमूद केलं. सभागृहातल्या
सर्व नेत्यांनी एकत्र येऊन रचनात्मक कार्यातून राज्याला वेगाने पुढे नेण्याचं आवाहन
मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं.
नवीन सरकार
स्थापन झाल्यानंतर आलेल्या विविध आव्हानांना सामोरं जात निर्णयक्षम आणि समन्वयातून
कारभार केल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रासाठी तयार करण्यात आलेल्या
व्हिजन डॉक्युमेंटचा उल्लेख करताना ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री – व्हिजन डॉक्यूमेंट
मराठवाड्याच्या
विकासाबाबत बोलताना मुख्यमंत्र्यांनी, मराठवाडा ‘ईव्ही कॅपिटल’ म्हणून विकसित
होत असल्याचं सांगितलं. विभागात टोयोटा, स्कोडा, एथर यांसारख्या मोठ्या ब्रँड्सची गुंतवणूक झाली असून, यातून एक लाख २७ हजार लोकांना रोजगार प्राप्त झाला असल्याचं ते म्हणाले. मराठवाडा
विभाग लवकरच दुष्काळमुक्त करण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांची मुख्यमंत्र्यांनी
माहिती दिली. ते म्हणाले,
बाईट – मुख्यमंत्री – मराठवाडा
****
विधानपरिषदेत
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं.
****
या अधिवेशनातून
शेतकऱ्यांना आणि विदर्भातल्या जनतेला काहीही मिळालं नाही, अशी टीका
विरोधी पक्षांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली.
धानाला
आणि सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली मात्र सरकारने
कार्यवाही केली नाही, तसचं अंमली पदार्थासंदर्भातही कारवाईची
ठोस भूमिका घेतली नाही, अशी टीका काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते
विजय वडेट्टीवार यांनी केली. ते म्हणाले,
बाईट – विजय वडेट्टीवार
विधान परिषदेचे
गटनेते सतेज पाटील यांनी कापूस खरेदीचे केंद्र वाढवण्याच्या केलेल्या मागणीवर निर्णय
झाला नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. बेरोजगारीचा प्रश्न सुटलेला नाही, विरोधी पक्षाने
राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले त्यावरही ठोस उत्तर मिळालं नाही,
त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी टीका, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केली.
****
परभणी शहर
आणि ग्रामीण भागासाठी स्वतंत्र तहसील कार्यालय स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे
सादर करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. परभणी
तहसील कार्यालयावर परभणी शहर आणि ग्रामीण भागातल्या जवळपास १०० हून अधिक गावांचा कार्यभार
अस प्रशासन आणि नागरिकांना होत असलेल्या त्रासामुळे दोन स्वंतत्र तहसील कार्यालयं स्थापन
करण्यात यावेत, अशी मागणी, आमदार राजेश विटेकर यांनी केली
होती.
****
जालना जिल्ह्यातल्या
७८ तांड्यांना आता स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देण्याचा निर्णयही बावनकुळे यांनी
घेतला आहे. या निर्णयामुळे तांड्यावरील रहिवाशांना आता हक्काचं गाव आणि स्वतंत्र ओळख
मिळणार आहे. काल नागपूर इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
****
भारतीय
जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नितीन नबीन यांची नेमणूक झाली आहे.
भाजपाच्या संसदीय मंडळानं ही नियुक्ती केल्याचं पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग
यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. नितीन नबीन सध्या बिहार मंत्रिमंडळात
मंत्री असून, ते जे पी नड्डा यांच्याकडून अध्यक्षपदाचा कार्यभार घेतील.
****
राज्यातल्या
१३ वर्षांखालच्या फुटबॉल खेळाडूंना जागतिक दर्जाचं प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती मिळण्यासाठी
राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट महादेवा’ या योजनेचा प्रारंभ काल मुंबईत वानखेडे
मैदानावर लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सी याच्या हस्ते झाला. मेस्सी हा गोट इंडिया
दौऱ्याच्या निमित्ताने काल मुंबई दौऱ्यावर आला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, क्रिकेटपटू
सचिन तेंडुलकर, अभिनेता टायगर श्रॉफ, अजय
देवगण यांच्यासह अन्य मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते.
‘प्रोजेक्ट महादेवा’ अंतर्गत निवडलेल्या ६० खेळाडुंना पाच वर्षांची संपूर्ण निवासी
शिष्यवृत्ती मिळणार असून, अव्वल खेळाडू नक्कीच फिफा विश्वचषक मध्ये खेळतील अशी आशा मुख्यमंत्र्यांनी
यावेळी व्यक्त केली.
****
स्क्वॅश
विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात काल भारताने हाँगकाँगचा तीन – शून्य असा पराभव
करत पहिल्यांदाच या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. चेन्नई इथं झालेल्या या स्पर्धेत जोशना
चिनप्पा, अभय सिंग आणि अनाहत सिंगने आपापल्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत
हा विजय मिळवून दिला.
****
१९ वर्षांखालच्या
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल दुबई इथं झालेल्या अ गटातल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानला
९० धावांनी पराभूत केलं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने ४६ षटकं आणि एका चेंडूत
२४० धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ ४१ षटकं आणि २ चेंडूत
१५० धावात सर्वबाद झाला.
****
दक्षिण
आफ्रिकेविरुद्ध धर्मशाला इथं झालेल्या तिसर्या टी–ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताने
सात गडी राखून विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने प्रथम फलंदाजी करत ११७ धावा
केल्या. भारतीय संघानं हे लक्ष्य १६व्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केलं. या विजयासोबतच
भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत दोन – एक अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला चौथा सामना
परवा बुधवारी लखनौ इथं होणार आहे.
****
जालना इथं
मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि जालना एज्युकेशन
सोसायटीतर्फे आयोजित वारकरी संत साहित्य संमेलनाचा काल समारोप झाला. समारोप सत्रात
बोलताना, अध्यक्ष डॉ. रामकृष्ण महाराज लहवितकर यांनी,
संत साहित्याची वैज्ञानिकदृष्ट्या चिकित्सा व्हावी, महाराष्ट्रात संतपीठ कार्यान्वित व्हावेत, अशी अपेक्षा
व्यक्त केली. यावेळी नाना महाराज पोखरीकर, सोनुने गुरूजी,
डॉ.अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात
आला.
****
छत्रपती
संभाजीनगर शहरात हनुमान टेकडी परिसरातली सद्गुरू श्री निपट निरंजन महाराज यांच्या
पुण्यतिथीनिमित्त आज यात्रा होत आहे. यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही कुस्तीचा
आखाडा रंगणार आहे.
****
छत्रपती
संभाजीनगर इथं मराठवाडा युवक विकास मंडळातर्फे आयोजित प्रल्हादजी अभ्यंकर स्मृती व्याख्यानमाला
कालपासून सुरु झाली. ज्येष्ठ कादंबरीकार विश्वास पाटील यांनी काल पहिलं पुष्प गुंफलं.
मी आणि माझे साहित्य या विषयावर बोलताना त्यांनी, शिवाजी महाराजांचा
अतुलनीय पराक्रम प्रत्येकाने वाचला पाहिजे, असं मत व्यक्त केलं.
****
राज्यात
विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर कोकण आणि
मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात काल सर्वात
कमी आठ अंश सेल्सिअस तापमान अहिल्यानगर इथं नोंदवलं गेलं. पुणे आणि नाशिक इथइ सरासरी
नऊ, तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि
परभणी इथं सरासरी ११ अंश सेल्सिअस तापामानाची नोंद झाली.
येत्या
दोन दिवसात राज्यात सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
****
Sunday, 14 December 2025
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.12.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 December
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ डिसेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
·
राज्याची अर्थव्यवस्था २०३०
पर्यंत एक ट्रिलियन डॉलर पर्यंत जाईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
·
महायुती सरकार विदर्भाला
गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
·
अधिवेशनातून शेतकऱ्यांना
काहीही मिळाले नाही- विरोधी पक्षांची टीका
आणि
·
भारत आणि दक्षिण
आफ्रिकेदरम्यानचा तिसरा टी-ट्वेंटी सामना आज
****
देशातल्या मोठ्या राज्यांचा विचार करता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था
आजही सर्व निकषांवर पात्र ठरणारी आहे. २०२९-३० पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक
ट्रिलियन डॉलरपर्यंत जाईल,
असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज शेवटच्या दिवशी विधानसभेत अंतिम आठवडा
प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर देताना नमूद केलं.
ते म्हणाले -
बाईट
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
रिझर्व्ह बँकेनं घालून दिलेल्य़ा मर्यादेच्या आतच राज्य सरकारनं
कर्ज घेतलं असून राजकोषीय तूट तीन टक्क्यांच्या आत ठेवण्यात यश आलं असल्याचं
त्यांनी सांगितलं. चालू आर्थिक वर्षातही राजकोषीय तूट तीन टक्क्याच्या आत ठेवण्यात
यश येईल असा विश्वास व्यक्त करत, राज्य दिवाळखोरीकडे जात नसल्याचं
त्यांनी स्पष्ट केलं.
लाडकी बहीण सारख्या कल्याणकारी योजना यापुढंही सुरूच राहतील, असं
ते म्हणाले. गेल्या पाच वर्षांत कोरोनासारखी अनेक संकंटं राज्याच्या
अर्थव्यवस्थेवर आली,
मात्र रचनात्मक कार्यातून राज्याचा विकास साधायचा आहे, यासाठी
सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी मिळून प्रयत्न करायला हवेत, अशी
अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
वीजनिर्मिती, खनिजसंपत्ती, कृषी, वनसंपत्ती, पर्यटन, वाहतूक
आणि लॉजिस्टिक ही विदर्भाची सात मुख्य बलस्थानं असून महायुती सरकार विदर्भाला
गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वचनबद्ध आहे, असं उपमुख्यमंत्री एकनाथ
शिंदे म्हणाले. महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या
शेवटच्या दिवशी अंतिम आठवडा प्रस्तावावरल्या चर्चेला उत्तर देताना ते विधानपरिषदेत
बोलत होते. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी तब्बल ५ लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार
केवळ विदर्भासाठी करण्यात आले असून, यामुळे मोठ्या प्रमाणात
रोजगार निर्मिती होत आहे,
असं शिंदे यांनी सांगितलं.
****
प्रश्नोत्तराच्या तासात, राज्यात विजेची स्मार्ट
मीटर बसवण्याचा निर्णय केंद्र शासनाच्या योजनेंतर्गत घेण्यात आला आहे. सामान्य
घरगुती ग्राहकांना प्रीपेड मीटर लावले जाणार नाहीत, असं मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. विधानसभा सदस्य भास्कर जाधव आणि रईस शेख यांच्या
प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
****
या अधिवेशनातून, शेतकऱ्यांना आणि विदर्भातील
जनतेला काही मिळालं नाही. त्यामुळे, हे अधिवेशन वांझोटे ठरले
अशी टीका विरोधी पक्षांतर्फे पत्रकार परिषदेत करण्यात आली. सरकारकडून ज्या काही
घोषणा झाल्या त्या मुंबई,
ठाणे, नवी मुंबई यासाठी झाल्या पण, विदर्भासाठी
एकही घोषणा करण्यात आली नाही अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे
गटनेते भास्कर जाधव यांनी यावेळी केली. विदर्भातील धान, सोयाबीन
आणि कापूस उत्पादक शेतकरी या अधिवेशनाकडे डोळे लावून बसला होता. धानाला आणि
सोयाबीनला बोनस मिळावा म्हणून आम्ही मागणी केली पण सरकारनं कारवाई केली नाही तसंच राज्यातील तरुणांना ड्रगचा विळखा आहे. पण, त्यावरही
कारवाईची ठोस भूमिका सरकारची नाही, अशी टीका काँग्रेस पक्षाचे
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. विधान परिषदेचे गटनेते सतेज पाटील
यांनी कापूस खरेदीचे केंद्र वाढवण्याच्या केलेल्या मागणीवर निर्णय झाला नाही. तसंच, बेरोजगारीचा
प्रश्न सुटलेला नाही अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील
यांनी केली. विरोधी पक्षाने राज्यातील कायदा सुव्यवस्था बाबत प्रश्न उपस्थित केले
त्यावर ठोस उत्तर मिळाले नाही त्यामुळे सात दिवसात जनतेच्या पदरी निराशाच आली अशी
टीका जयंत पाटील यांनी केली.
****
विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी २०२६ पासून
मुंबईतल्या विधानभवनात होईल, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल
नार्वेकर यांनी दिली.
****
ऊर्जेची बचत करणं हाच ऊर्जेचा सर्वात पर्यावरणस्नेही आणि
विश्वसनीय स्रोत आहे,
असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज
राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिनी केलं. या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना
राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण पुरस्कारानं राष्ट्रपतींनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या
कार्यक्रमात सन्मानित केलं,
त्यावेळी त्या बोलत होत्या. जगातल्या सर्वाधिक वेगानं
वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी भारत एक असून विकासाच्या या यात्रेत ऊर्जेची गरजही
वेगाने वाढत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं आणि ऊर्जा बचतीचं महत्त्व अधोरेखित
केलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्षपदी
नितीन नबीन यांच्या निवडीची घोषणा आज पक्षातर्फे करण्यात आली. ते बिहार सरकारमध्ये
मंत्री म्हणून कार्यरत आहेत. भाजपच्या संससदीय मंडळानं ही नियुक्ती केली आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी क्रिकेट
मालिकेतला तिसरा सामना आज धरमशाला इथं होणार आहे. संध्याकाळी ७ वाजता सामना सुरू
होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला आहे.
****
गोंदिया इथं काल ३ माओवाद्यांनी जिल्हा पोलीसांपुढं आत्मसमर्पण
केलं. दरेकसा एरिया कमिटीचा कमांडर रोशन, आणि सहाय्यक कमांडर सुभाष
आणि रतन या तिघांनी शस्त्रं पोलिसांच्या हवाली केली.
****
आयआयटी बॉम्बे अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई इथं
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं केंद्रीय सामाजिक
न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आलं. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी संसदेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारा कायदा मंजूर केला असून
मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारनं अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचं रामदास
आठवले यांनी यावेळी सांगितलं.
****
भारतानं विश्वचषक स्क्वॅश स्पर्धेच्या अंतिम लढतीत
हाँगकाँकविरुद्ध पहिल्या सामन्यात सात – एक अशी आघाडी घेतली आहे. चेन्नई इथं सुरू
या स्पर्धेतील विजेतेपदाच्या पहिल्या लढतीत अभय सिंगनं ॲलेक्स लाऊविरुद्ध प्रारंभी सरशी मिळवली आहे.
****
१९ वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये, भारताने
दिलेल्या २४१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, दुबईत शेवटच्या
वृत्तापर्यंत पाकिस्तानच्या ४० षटकांत नऊ बाद १४३ धावा झाल्या आहेत. पावसामुळे हा सामना ४९
षटकांचा करण्यात आला. भारताचा संघ ४६.१ षटकांत २४० धावांवर सर्वबाद झाला.
भारताकडून ॲरॉन जॉर्जने ८५ धावा केल्या, कनिष्क चौहानने ४६ धावांचे
योगदान दिले,
तर कर्णधार आयुष म्हात्रेने ३८ धावा केल्या. पाकिस्तानने या
सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
****
खगोलप्रेमींना आज रात्री आकाशात उल्कावर्षावाचं अद्भुत
दृष्य पाहायला मिळणार आहे. हा या वर्षातला सर्वात मोठा उल्कावर्षाव असून, रात्री
सुमारे ९ वाजल्यापासून पहाटेपर्यंत दर तासाला १०० हून अधिक उल्का पडताना दिसू
शकतात. हा उल्कावर्षाव मिथुन या तारकासमूहात होणार असल्यानं त्याला मिथुन
उल्कावर्षाव असं नाव देण्यात आलं आहे. शहरातल्या कृत्रिम उजेडापासून दूर, निरभ्र
आकाशात वायव्य दिशेला हा उल्कावर्षाव साध्या डोळ्यांनी पाहता येईल.
****
पंढरपूरची वारी ही अहंभाव विसरून, समभाव
निर्माण करणारी असून,
वारीतून जातमुक्त अभियान राबवलं जात असल्याचा सूर जालना
इथल्या जेईएस महाविद्यालयात, आज वारकरी संत साहित्य संमेलनातील चर्चा
सत्रात व्यक्त झाला. ‘रिंगण’चे संपादक सचिन
परब,
छायाचित्रकार संदेश भंडारे, प्रयोगशील
नाट्यकलावंत ऋचिका खोत यांनी या चर्चासत्रात भाग घेतला. यावेळी बोलतांना सचिन परब
यांनी पंढरपूरच्या वारीतील रिंगण सोहळा आणि वारीतील वारकरी मंडळीची भावना लक्षात
घेऊन आपण ‘रिंगण’
या नियतकालिकाची निर्मिती केली.
रिंगण सोहळा हा वारीतील मुख्य सोहळा असतो, हा रिंगण सोहळा
शब्दबद्ध करण्याचा आपला प्रयत्न करत आहोत असं सांगितलं.
पंढरपूर वारीचं महत्त्व हे आध्यात्मिक, सामाजिक आणि आरोग्यदायी आहे; ती
विठ्ठल भक्तीचा एक महासोहळा असून, संतांच्या शिकवणीनुसार जाती-धर्माच्या
पलीकडे जाऊन एकतेचा संदेश देते. यात वारकरी पायी चालत जाऊन मन-शरीर शुद्ध करतात, अहंभाव
विसरून समभाव वाढवतात आणि नामस्मरण आणि भक्तीनं मोक्षप्राप्तीची कामना करतात, असे
मानले जाते,
असंही परब म्हणाले.
****
लोकप्रिय फूटबॉलपटू लिओनेल मेस्सीचा गोट इंडिया दौऱ्याचा
कार्यक्रम काल हैद्राबाद इथं झाला.
****
राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीचा कडाका वाढला आहे.
राज्यात काल सर्वात कमी सात अंश सेल्सियस तापमान जळगाव इथं नोंदवलं गेलं. त्या
खालोखाल अहिल्यानगर इथं साडे सात अंश, पुणे तसंच नाशिक इथं साडे
आठ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक सात
दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 14.12.2025 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 14
December 2025
Time 01.00 to 01.05
PM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ डिसेंबर २०२५ दुपारी १.०० वा.
****
२०३५ सालचा अमृत महोत्सवी महाराष्ट्र घडवण्याचं राज्य
शासनाचं उद्दीष्ट असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत
अंतिम आठवडा प्रस्तावाच्या चर्चेला उत्तर देताना दिली आहे.
****
उर्जा सुरक्षा ही एक आवश्यक बाब असून प्रत्येकानं उर्जा
सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्यावं आणि आपल्या आयुष्याचा महत्वपूर्ण घटक म्हणून समावेश
करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत उर्जा सुरक्षा
पुरस्कार सोहळ्यात आज त्या बोलत होत्या. दरवर्षी १४ डिसेंबर हा दिवस उर्जा संरक्षण
म्हणून साजरा केला जातो, यानिमित्त आज राष्ट्रपती मुर्मू यांच्या हस्ते उर्जा संरक्षण
पुरस्कार देण्यात येत आहेत.
****
इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या महाज्योती
मार्फत स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षण योजना राबवण्यात येते. आता ही योजना ऑनलाइन
राबवण्यात येणार आहे. जी संस्था हे काम करणार ती राजस्थानची आहे, त्याऐवजी हे प्रशिक्षण ऑफलाईन देण्याची मागणी काँग्रेस
विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर इथं हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत
केली. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात वडेट्टीवार यांनी ओबीसी विद्यार्थ्यांचा प्रश्न
मांडला. विद्यार्थ्यांना प्रशिक्षण ऑनलाइन देण्यात येणार असल्यामुळे त्यांचं विद्यावेतन मिळालेलं नाही आणि या विद्यार्थ्यांनी
काल आंदोलनही केलं असल्याचं त्यांनी सांगितलं लोकसंख्येच्या हिशोबाने महाज्योतीला अधिकचा
निधी द्यावा अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.
यावर उत्तर देताना मंत्री अतुल सावे यांनी ऑफलाईन प्रशिक्षणाची
मागणी असेल तर ते ऑफलाईनही देण्यात येईल हे स्पष्ट केले. निधी कमी दिला यावर उत्तर
देताना मुख्यमंत्री म्हणाले ज्या विभागाला कमी निधी देण्यात आला आहे याबाबत अर्थमंत्री
अजित पवार यांच्या बरोबर बैठक झाली आहे, मार्च मधील पुरवणी मागण्या आणि अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात
येईल असे आश्वासन दिले. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनीही या प्रशिक्षणार्थींना नवीन
योजनेत सामावून घेतलं जाईल आणि, याबाबत नवीन धोरण आखण्यात येईल, असं आश्वासन आज सभागृहात दिलं. नागपूर इथं सुरू विधीमंडळाच्या
हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.
****
राज्यात एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य
योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंतर्गत महत्वपूर्ण सुधारणा करण्यात
आल्या आहेत. यामुळं आरोग्यव्यवस्थेतील कार्यक्षमता, पारदर्शकता आणि सेवा गुणवत्तेत मोठी वाढ होत असल्याची माहिती
राज्य आरोग्य हमी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी दिली आहे.
जानेवारी २०२५ पासून उपचारांची संख्या एक हजार ३५६ वरून २ हजार ३९९ पर्यंत वाढवण्यात
आली आहे. रुग्णालयांना दर्जेदार सेवा देण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं असून, मानकं पूर्ण करणाऱ्या रुग्णालयांना १० ते १५ टक्के अतिरिक्त
प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं ते म्हणाले. नागरिकांच्या सोयीसाठी
२४ तास नि:शुल्क मदतवाहिनी क्रमांक उपलब्ध आहेत.
****
तीन नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर काल आत्मसमर्पण
केलं.
दर्रेकसा एरिया कमिटीचा कथित कमांडर कुख्यात रोशन याचा
यात समावेश आहे.
***
एकोणीस वर्षांखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत दुबईतील
मैदानावर पाकिस्तानविरुद्ध खेळताना, शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं १८व्या षटकांत तीन बाद
१०७ धावा केल्या आहेत. याआधी पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली. पावसामुळे
नाणेफेक उशिरा झाल्यानं सामना प्रत्येकी ४९ षटकांचा करण्यात आला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले ज्येष्ठ उद्योगपती माधव भोगले
यांचं आज सकाळी दहा वाजता प्रदीर्घ आजारामुळे निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाला
इथं खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत
आहेत. सामना संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.
****
स्क्वॅश विश्वचषक स्पर्धेतील विजेतेपदाच्या लढतीमध्ये
आज भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. काल रात्री झालेल्या उपांत्य फेरीच्या
सामन्यात भारतानं इजिप्तचा ३-० असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या वेलावन
सेंथिल कुमारनं इजिप्तच्या इब्राहिम एलकब्बानी यांचा पराभव केला, तर अनाहत सिंग यानं इजिप्तच्या नूर हेइकल गरासवर मात केली.
अभय सिंग यानं इजिप्तच्या आदम हवालचा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या दुसऱ्या उपांत्य
सामन्यात हाँगकाँगनं जपानवर २-० अशी मात करीत अंतिम फेरीत स्थान मिळवलं.
****
Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 14.12.2025 रोजीचे सकाळी 11.00 वाजेचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 14 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
१४ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
नागपूर इथं सुरू विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर
काल चर्चा सुरु झाली. राज्यातील विविध गंभीर समस्यांवरून सत्ताधारी पक्षावर विरोधकांनी जोरदार टीका केली. शेतकरी आत्महत्या, कृषी क्षेत्रातील निधीचा
अपव्यय, ढासळलेली कायदा आणि सुव्यवस्था, तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवरून
काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी अंतिम आठवड्याच्या प्रस्तावावर बोलताना टिका
केली. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या
हस्ते आज उर्जा पुरस्कार प्रदाण करण्यात येणार आहेत. नवी दिल्ली इथं उर्जा संवर्धन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये या पुरस्कारांचं
वितरण केलं जाणार आहे.
****
वंदे भारत रेल्वेगाड्यांमध्ये स्थानिक
खाद्यपदार्थ उपलब्ध होतील अशी व्यवस्था करण्याचे निर्देश केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी
वैष्णव यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत काल ते बोलत
होते. प्रवाशांना त्या विशिष्ट प्रदेशांची संस्कृती आणि स्वाद प्रतिबिंबित होईल, असे अन्नपदार्थ उपलब्ध करून द्यावेत, असा या मागचा उद्देश आहे. भविष्यात
हळूहळू इतर सर्व रेल्वेगाड्यांमध्ये सुद्धा ही सोय उपलब्ध करून दिली जाईल. बनावट ओळखपत्रांचा
वापर करून रेल्वे तिकिटे आरक्षित करणाऱ्यांविरुद्ध भारतीय रेल्वेने
केलेल्या कारवाईचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत, असेही केंद्रीय मंत्र्यांनी नमूद केलं आहे. वापरकर्त्यांची ओळख पडताळण्यासाठी आणि बनावट ओळखपत्रे
शोधून काढणारी काटेकोर व्यवस्था लागू केल्यानंतर, आता आयआरसीटीसी संकेतस्थळावर दररोज सुमारे ५ हजार नवीन
वापरकर्ता आयडी जोडले जात आहेत. तिकीट प्रणालीमध्ये सर्व प्रवासी खऱ्या ओळखपत्राच्या आधारे सहजपणे तिकिटे आरक्षित करू शकतील, अशा पातळीवर सुधारणा करण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना देण्यात
आले आहेत.
****
"आपले नाशिक - हरित नाशिक" या
संकल्पनेवर आधारित "हरित नाशिक" मोहिमेचा उद्या १५ तारखेला शुभारंभ
करण्यात येणार आहे. मखमलाबाद परिसरातील
कॅनॉल लगतच्या नाशिक महानगरपालिकेच्या हरित पट्ट्यातील सुमारे अडीच एकर जागेवर तसेच
गोदावरीच्या किनारी सुयोजित प्रकल्पालगत एकत्रितपणे सुमारे १ हजार विविध देशी प्रजातींच्या झाडांची लागवड करण्यात
येणार आहे.
कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन तसेच
विविध मान्यवरांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती महापालिका
प्रशासनाद्वारे देण्यात आली. मंत्री महाजन यांच्या पुढाकारातून टप्प्याटप्प्यातून एकूण
१५ हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार
असून २५ पेक्षा अधिक रोपट्यांची एखाद्या संस्था किंवा व्यक्तीमार्फत त्यांच्या उपलब्ध
जागेनुसार मागणी करण्यात आल्यास त्यांना प्रशासनामार्फत ती उपलब्ध करून देण्यात येणार
आहेत.
****
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीनं
आयोजित पुस्तक महोत्सवाचं उद्घाटन काल पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर
करण्यात आलं. यावेळी केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील
उपस्थित होते. हा महोत्सव येत्या 21 तारखेपर्यंत सुरु राहणार
आहे. या महोत्सवात पुस्तक प्रकाशकांनी आठशे दालनं स्थापन केली आहेत.
****
बीड मुख्यालयात काल आयोजित लोकअदालतमध्ये
बीड न्यायालयातील प्रलंबीत प्रकरणांपैकी ५४३ प्रकरणं निकालात काढण्यात आली. या लोकादालत
मध्ये एकूण ८ हजार २६५ प्रकरणं ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी, फौजदारी, मोटार अपघात, भुसंपादनाची प्रकरणे आदी प्रकरणांचा
समावेश होता. या व्यतिरिक्त दाखलपुर्व प्रकरणांमध्ये एकूण ३३ हजार २२१ प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी १ हजार २६१
प्रकरणं निकाली निघाली, त्यामुळे एकूण १ हजार
९०३ प्रकरणं काल बीड लोकअदालतीत निकाली निघाली आहेत.
****
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि लातूर
शहर महानगरपालिकेच्या राष्ट्रीय लोक अदालतीला थकबाकीदार मालमत्ताधारकांचा काल उत्स्फूर्त
प्रतिसाद मिळाला. यात ३००० थकबाकीदार मालमत्ता धारकाना नोटीस बजावण्यात आली होती त्यापैकी
८०० थकबाकीदार यांनी कर भरला आहे. लातूर महापालिकेनं जाहीर केलेल्या सात टक्के शास्ती
माफी योजनेस एक दिवसाची म्हणजे आज १४ तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या
टी-२० क्रिकेट मालिकेतील तिसरा सामना आज धर्मशाला इथं खेळवला जाणार आहे. पाच सामन्यांच्या
या मालिकेत दोन्ही संघ १-१ सामना जिंकून बरोबरीत आहेत.
****
स्क्वॅश विश्वचषक स्पर्धेमध्ये आज
भारताचा सामना हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. चेन्नई इथं ही स्पर्धा सुरू आहे.
****
राज्याच्या अनेक भागांमध्ये थंडीची
हुडहुडी भरलेली आहे. राज्यात काल सर्वात कमी सात अंश सेल्सियस तापमान जळगाव इथं नोंदवलं
गेलं. त्या खालोखाल अहिल्यानगर इथं साडे सात, पुणे तसंच नाशिक इथं साडे आठ अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर इथं ११ पूर्णांक
सात दशांश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. आज हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहण्याचा
अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 29 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवा...
-
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 27 April 2025 Time: 7.10 to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाज...