Tuesday, 31 January 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 31 January 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

२०१६-१७ मध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा दर ७ पूर्णांक एक दशांश राहण्याचा अंदाज यंदाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात वर्तवण्यात आला आहे. संसदेच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यानंतर, २०१७ साठीचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला. येत्या आर्थिक वर्षात विकास दर पावणे सात ते साडे सात टक्क्यांच्या दरम्यान असेल, असं या अहवालात म्हटलं आहे. दरम्यान, हा अहवाल सादर झाल्यानंतर लोकसभेचं कामकाज उद्या सकाळपर्यंत स्थगित झालं. उद्या २०१७-१८ चा अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे.

****

रोजगार निर्मितीमध्ये सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं असल्याचं, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. संसद परिसरात ते वार्ताहरांशी बोलत होते. तरूणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणं हा सध्या देशाला भेडसावणारा सर्वात मोठा प्रश्न असल्याचं सांगत, राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आज पहिल्या दिवशी राष्ट्रपतींनी केलेल्या अभिभाषणात फक्त सरकारनं राबवलेल्या विविध योजना, धोरणांचा आढावा घेतला, असंही ते म्हणाले.

****

'एच-वन बी' व्हिसावर नियंत्रण आणणारं विधेयक अमेरिकी प्रतिनिधींच्या सभागृहात सादर करण्यात आलं असून हे विधेयक मंजूर झाल्यास माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागू शकतो. या विधेयकातल्या तरतुदींनुसार माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांना 'एच-वन बी' व्हिसाधारकांचा पगार दुपटीनं वाढवून १ लाख ३० हजार डॉलर्स करावा लागेल. अमेरिकी नागरिकांपेक्षा स्वस्त दरात माहिती तंत्रज्ञांनांना नियुक्त करणाऱ्या अमेरिकी कंपन्यांसाठी हा बदल तोट्याचा ठरू शकतो, भारतातल्या माहिती तंत्रज्ञ कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता याबाबतच्या वृत्तात वर्तवण्यात आली आहे.

****

राष्ट्रीय आपत्ती निवारण दल-एनडीआरएफचा आज बारावा वर्धापन दिन. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. एनडीआरएफनं आपत्तीच्या वेळेस केलेलं काम अतिशय स्तुत्य असल्याचं त्यांनी ट्विटरवरच्या संदेशात म्हटलं आहे.

****

महाराष्ट्रातली किमान दोन विद्यापीठं ही जगातील सर्वोत्कृष्ट १०० विद्यापीठांच्या यादीत येण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्नरत आहोत, असं राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी म्हटलं आहे. राज्यपालांच्या गेल्या दोन वर्षांच्या कारकिर्दीचा मागोवा घेणाऱ्याइन द सर्व्हिस ऑफ पीपलया कॉफीटेबल पुस्तकाचं प्रकाशन माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते आज मुंबईत राजभवनात झालं, त्यावेळी ते बोलत होते.

राज्यपालांनी विशेषाधिकारांचा प्रभावी वापर करुन राज्याच्या विकासात विशेषत: आदिवासींच्या हितासाठी मोठं योगदान दिलं, असं पाटील यावेळी म्हणाल्या.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते

****

स्वाध्याय परिवाराचे प्रणेते दिवंगत पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या पत्नी निर्मला आठवले यांचं काल सोमवारी सायंकाळी ठाणे इथं तत्त्वज्ञान विद्यापीठातील राहत्या घरी निधन झालं. त्या ९वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या सायंकाळी ४ वाजता अंत्यसंस्कार होणार आहेत. निर्मला आठवले यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

****

गणेशजयंती उत्सव आज सर्वत्र साजरा होत आहे. या निमित्तानं ठिकठिकाणच्या गणेशमंदिरांमध्ये गणेशयाग, अथर्वशीर्ष पठणासह विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. औरंगाबादसह अनेक ठिकाणच्या गणेशमंदिरांमध्ये भाविकांनी आज सकाळपासून दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.

****

मराठा आरक्षणासह इतर मागण्यांसाठी आज मराठा समाजाच्या वतीनं राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे राज्यभरात मुख्य मार्गांवरची वाहतूक काही अंशी विस्कळीत झाली.

औरंगाबाद इथं शहरातल्या सर्व प्रमुख चौकांसह जिल्ह्यातही आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्यबळाचा वापर करावा लागला. लातूर इथं शहरात प्रवेश करणाऱ्या चार मार्गासह शहरातल्या प्रमुख चौकांमध्ये आंदोलन करण्यात आलं. परभणी इथं आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. 

नांदेड इथं एसटी बससह काही वाहनांवर दगडफेक करण्यात आली, तर एक दुचाकी पेटवून दिल्याचं वृत्त आहे.

****

नांदेड इथून सुटणारी नांदेड अमृतसर सचखंड एक्सप्रेस उद्या रद्द करण्यात आली आहे. उत्तर भारतात पसरलेल्या धुक्यामुळे अमृतसरहून नांदेडला येणारी गाडी नियमित वेळेपेक्षा खूप उशीरा धावत असल्यामुळे उद्या ही गाडी नांदेडहून सुटणार नाही.

दरम्यान, परळीमार्गे जाणारी नांदेड ते पुणे त्रिसाप्ताहिक रेल्वे उद्यापासून पनवेलपर्यंत धावणार आहे.

****

आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ जानेवारी २०१७ सकाळी ६.५० मि.


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 31 January 2017

Time 6.50 AM to 7.00 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३१ जानेवारी २०१७ सकाळी ६.५० मि.

****

·      संसदेच्या अर्थसंल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ

·      चालू बॅँक खात्यातून पैसे काढण्यावरचे निर्बध भारतीय रिझर्व्ह बँकेनं हटवले

·      आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन

·      लातूरच्या किर्ती ऑईल मिलमध्ये टाकाऊ पदार्थांच्या हौदात विषारी वायुमुळे गुदमरून नऊ कामगारांचा मृत्यू

आणि

·      म्मू काश्मीरमधल्या हिमस्खलनात बचावलेल्या पाच जवानांचा उपचारा दरम्यान मृत्यू;  मृतांत परभणी जिल्ह्यातल्या ताडकळसच्या जवानाचा समावेश 

****

संसदेच्या अर्थसंल्पीय अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. दोन सत्रात चालणाऱ्या या अधिवेशनात अर्थसंकल्पासह ३४ विधेयकं सादर होणार आहेत. उद्या केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून नोटाबंदीनंतरच्या या अर्थसंकल्पाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, निवडणूक काळात काही मुद्यांवर मतभेद असले तरी संसद ही सर्वपक्षीय पंचायत असून संसदेच कामकाज सुरळीत चाललं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थसंल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काल नवी दिल्लीत घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कामकाज सुरळीत चालवण्याचं आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं.

****

भारतीय रिझर्व्ह बँकेनं चालू बॅँक खात्यातून पैसे काढण्यावरचे निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत. यामुळे चालू खात्यातून खातेदारांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पैसे काढता येणार आहेत. बचत खात्यातूनही एकाचवेळी २४ हजार रूपये काढण्यास बँकेनं परवानगी दिली आहे. ए टी एम मधून खातेदारांना ही रक्कम काढता येईल. मात्र एका आठवड्यात २४ हजार रुपये काढण्याची मर्यादा अद्याप कायम आहे.

****

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी युतीचा कोणाचाही प्रस्ताव आला नसून, ही निवडणूक स्वबळावरचं लढणार असल्याचं शिवसेन पक्ष प्रमुख द्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. मुंबईत काल वार्ताहरांशी बोलताना त्यांनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत युती न करण्याचे संकेत दिले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगांवकर, यांनी युतीचा प्रस्ताव शिवसेनेला दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी हा खुलासा केला. आपण पूर्ण सामर्थ्यानिशी मैदानात उतरलो असून, मुंबई महानगरपालिका जिंकल्याशिवाय राहणार नाही, असा दावाही द्धठाकरे यांनी केला.

****

आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाच्यावतीनं आज राज्यव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आज सकाळी अकरा वाजता या आंदोलनाला सुरूवात होणार असून ते दुपारी एक वाजेपर्यंत चालेल. या आंदोलनाला विविध संस्था संघटनांनी पाठिंबा दिला असल्याचं संयोजकांच्यावतीनं सांगण्यात आलं.

मराठा क्रांती मोर्चानं आपल्या मागण्यांसाठी यापूर्वी राज्यभर शांततेच्या मार्गानं मोर्चे काढूनही, सरकारनं आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचं संयोजकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, रास्ता रोको नियमात बसत नसल्यामुळे चक्का जाम आंदोलन शांततेत करावं, आंदोलन कर्त्यांनी वाहतुकीस अडथळा आणल्यास, कडक कारवाईचा इशारा, औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित बैठकीत ते काल बोलत होते.

****

केंद्र शासनानं परिवहन कार्यालयाच्या विविध शुल्कांमध्ये केलेल्या वाढीच्या निषेधार्थ, आज रिक्षा आणि वाहतूक दारांनीही राज्यव्यापी चक्का जाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून आज औरंगाबाद इथंही आंदोलनाचा इशारा लाल बावटा रिक्षा युनियननं दिला आहे.

****

लातूर इथं औद्योगिक परीसरातल्या हरंगुळ रोडवरच्या किर्ती ॲग्रोवेट प्रायव्हेट लिमिटेड या ऑईल मिलमध्ये टाकाऊ पदार्थांचा हौद साफ करताना विषारी वायुमुळे गुदमरून नऊ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्घटना काल रात्री घडली. खाजगी कंत्राटदारांमार्फत हे काम केलं जात होतं. २० फूट खोल आणि ६०० चौरस फूट लांबी -रूंदीच्या या हौदात साफसफाईसाठी हे कामगार आतमध्ये उतरले होते. प्रारंभी केवळ तीनच कामगार आतमध्ये उतरले. काही वेळानं कंत्राटदार कामाच्या ठिकाणी आला, त्याला आतून कामगार काहीच प्रतिसाद देत नसल्याचं लक्षात आल्यानंतर तो पाहणी करत असताना हौदात पडला. यात त्याचाही मृत्यू झाला. कंत्राटदार आणि त्याचे कामगार आतमध्ये पडल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीचे पाच कामगार त्यांना शोधण्यासाठी हौदात उतरले, असता त्यांचाही या विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला. एका कामगाराला दोरखंडाच्या मदतीनं हौदात उतरवत असताना गुदमरल्याची जाणीव झाल्यानं त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर हा हौद फोडून विषारी वायु बाहेर काढण्यात आला. रात्री दीड वाजेच्या सुमारास हौदातल्या नऊ कामगारांचे मृतदेह बाहेर काढण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

या बातम्या आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केल्या जात आहे. आमचं  हे बातमीपत्र न्यूज ऑन ए.आय.आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधी स्थळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुष्पचक्र अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

****

म्मू काश्मीरमधल्या च्छिल भागात झालेल्या हिमस्खलनातून बचावलेल्या पाच जवानांचा काल उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यात राज्यातल्या तीन जवानांचा समावेश आहे. यामध्ये परभणी जिल्ह्यातल्या ताडकळस इथला बालाजी अंबोरे, सातारा जिल्ह्यातला गणेश ढवळे, आणि सांगली जिल्ह्यातला रामचंद्र माने या जवानांचा समावेश आहे. अंबोरे यांचं पार्थीव उद्या नांदेडला आणलं जाणार असून, त्यानंतर ते त्याच्या गावी पाठवलं जाईल.

****

जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणात उमेदवारी अर्ज दाखल होण्यास प्रारंभ झाला असून औरंगाबाद जिल्ह्यातल्या  कन्नड पंचायत समितीच्या आठ गणांत अकरा उमेदवारांचे तेरा अर्ज तर जिल्हा परिषदेच्या चार गटात पाच उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. पैठण तालुक्यातील पंचायत समितीच्या पाच गणांतून सहा उमेदवारांनी तर जिल्हा परिषदेच्या आपेगाव गटातून एका उमेदवारानी अर्ज दाखल केला. खुलताबाद जिल्हा परिषद गटात दोन उमेदवारांचे तीन तर पंचायत समिती गणात दोन उमेदवारांचे अर्ज दाखल झालेत. वैजापुर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी चार उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. सिल्लोड तालुक्यात आतापर्यंत अंधारी इथल्या गटात केवळ १ उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या ६० गट आणि पंचायत समितीच्या १२० गणांसाठी एकूण ९७ अर्ज काल दाखल झाले. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ३४ तर पंचायत समितीसाठी २५ अर्ज दाखल झाले असल्याचं, तर नांदेड जिल्ह्यच्या नायगाव तालुक्यातील चार जिल्हा परिषद गट आणि आठ पंचायत समिती गणांसाठी काल काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.

लातूर तालुक्यातल्या एकुरगा जिल्हा परिषद गटातून कॉंग्रेस - राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून धिरज विलासराव देशमुख यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत जिल्हा परिषदेसाठी ३४ तर पंचायत समितीसाठी २५ अर्ज दाखल झाले असल्याचं, उपजिल्हाधिकारी डॉ अनंत गव्हाणे यांनी सांगितलं. ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात उमेदवारांना अडचणी येत असल्याचं त्यांनी सांगितलं.

****

गोदावरी खोरे समन्यायी पाणी वाटप लोकसमिती स्थापन करण्याची मागणी, प्रसिध्द जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी केली आहे. औरंगाबाद इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित, जायकवाडीची कहाणी या विशेष व्याख्यानात ते काल बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाआधारे जल व्यवस्थापन शक्य आहे, असा पर्याय विकसित करणं ही काळाची गरज असल्याचं पुरंदरे यावेळी म्हणाले.

****

शौचालय असूनही केवळ अनुदान लाटण्यासाठी खोटे प्रस्ताव दाखल करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा लातूर महानगरपालिका आयुक्त रमेश पवार यांनी दिला आहे. शहर स्वच्छ अभियान अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारण्यासाठी आलेल्या अनुदान प्रस्तावांच्या छाननीनंतर अडीच हजार जणांकडे शौचालय असूनही प्रस्ताव दाखल झाल्याचं निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी फौजदारी कारवाईचा इशारा दिला आहे.

****

नांदेड इथं काल राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शालेय विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते, फेरीचा समारोप एका पथनाट्याच्या सादरीकरणानं झाला. 

//********//

Monday, 30 January 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

एटीएममधून पैसे काढण्याची मर्यादा शिथील करण्यात आली आहे. एक फेब्रुवारीपासून एटीएममधून एका वेळी २४ हजार रुपये काढता येतील. चालू खात्यातून पैसे काढण्यासाठीही आता काहीही मर्यादा नसेल.

****

निवडणूक काळात काही मुद्यांवर मतभेद असले तरी संसदेच कामकाज सुरळीत चाललं पाहिजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. संसदेच्या उद्यापासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्लीत आयोजित सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. कामकाज सुरळीत चालवण्याचं आश्वासन सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्याचं संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांनी सांगितलं.

बैठकीनंतर काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी, पत्रकारांशी बोलताना, पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारनं अर्थसंकल्प लवक ठेवायला नको होता, असं सांगत अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात नऊच दिवस असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही अर्थसंकल्पीय अधिवेशन लवकर होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. 

****

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ-बीसीसीआयच्या कामकाजासाठी सर्वोच्च न्यायालयानं प्रशासकीय समिती नेमली असून, या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त महालेखाकार विनोद राय यांची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये राय यांच्यासह इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा, विक्रम लिमये, महिला क्रिकेटर डायना एडल्जी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यांमध्ये क्रीडा मंत्रालयाच्या सचिवांचा समावेश करण्याची केंद्र सरकारची मागणी न्यायालयानं फेटाळून लावली.

****

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधिशांच्या नियुक्ती संदर्भातल्या याचिकांची सुनावणी न्यायालयानं महिनाभरासाठी पुढे ढकलली आहे. या याचिका रद्दबातल ठरवण्याची मागणी केंद्र सरकारनं केली आहे. दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक म्हणून करनाल सिंग यांची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव एका आठवड्यात तयार करावा, असे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.

****

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानहानीसंदर्भात काँग्रेस उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भिवंडी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी तीन मार्चला होणार आहे. आज राहुल गांधी भिवंडी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी जनसामान्यांच्या मनातून गांधीजींचे विचार कधीही दूर करता येणार नाहीत, असं मत व्यक्त केलं.

****

ाष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त गांधीजींच्या स्मृतिंना आज सर्वत्र अभिवादन करण्यात आलं. मुंबईत मंत्रालय परिसरात राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह मान्यवरांनी महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली. विधान भवनात विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांनी गांधीजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं.

औरंगाबाद इथं विभागीय आयुक्तालयात हुतात्मा दिनानिमित्त दोन मिनिटं मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

****

सकल मराठा समाजाच्या उद्याच्या प्रस्तावित चक्का जाम आंदोलनासंदर्भात आज औरंगाबाद इथं पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मराठा समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन चक्काजाम आंदोलनाची परवानगी नाकारली. आपल्या मागण्यांसाठी शांततेत निदर्शन करावं, मात्र वाहतुकीला अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास, गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलिस आयुक्तांनी दिला आहे.

कोल्हापूर इथं मराठा समाजाच्या एका गटाने ११ ते एक या वेळेत चक्काजाम आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर दुसऱ्या गटाने चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा नसल्याचं सांगत ठिय्या आंदोलन करणार असल्याचं सांगितलं आहे.

****

नांदेड इथं आज राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठरोग जनजागृती फेरी काढण्यात आली. जिल्हा रुग्णालयातले वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, शालेय विद्यार्थी या फेरीत सहभागी झाले होते, फेरीचा समारोप एका पथनाट्याच्या सादरीकरणानं झाला. 

****

गोदावरी खोरे समन्यायी पाणी वाटप लोकसमिती स्थापन करण्याची मागणी, प्रसिध्द जल अभ्यासक प्रदीप पुरंदरे यांनी केली आहे. औरंगाबाद इथं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या महात्मा गांधी अध्यासन केंद्राच्या वतीनं आयोजित, जायकवाडीची कहाणी या विशेष व्याख्यानात ते आज बोलत होते. आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापना आधारे जल व्यवस्थापन शक्य आहे, असा पर्याय विकसित करणं ही काळाची गरज असल्याचं पुरंदरे यावेळी म्हणाले.

****

औरंगाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानात ९१ पूर्णांक नऊ टक्के लसीकरण झाल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बी टी जमादार यांनी सांगितलं. ग्रामीण भागातल्या दोन लाख ६२ हजार ५४४ बालकांना, तर शहरी भागातल्या २६ हजार ४०८ बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

****

Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 30 January 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ३० जानेवारी २०१ दुपारी .००वा.

****

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज देशभर त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. दिल्लीत राजघाट या गांधीजींच्या समाधीस्थळावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पुष्पचक्र अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. उपराष्ट्रपती मोहम्मद हमीद अन्सारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू, संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यासह तीनही सेना दलांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.

देशासाठी प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आज सकाळी अकरा वाजता देशभर दोन मिनीटे मौन पाळण्यात आलं. औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयातही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आलं.

****

उद्यापासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं बोलावलेली सर्वपक्षीय बैठक नवी दिल्लीत सध्या सुरू आहे. अधिवेशनाचं कामकाज सुरळीतपणे चालवण्यात विरोधीपक्षांचं सहकार्य मिळावं, या उद्देशानं ही बैठक बोलावण्यात आली आहे.

लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनीही आज सायंकाळी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. तृणमूल काँग्रेसनं मात्र आपले खासदार या बैठकीला तसंच एक फेब्रुवारीला संसदेत हजर राहणार नसल्याचं सांगितलं आहे. पक्षाचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना, आज तृणमूल काँग्रेसची बैठक असल्यानं, तसंच एक फेब्रुवारी रोजी वसंत पंचमी निमित्त सरस्वती पूजन असल्यानं, आज बैठकीला तसंच एक फेब्रुवारीला संसदेत उपस्थित राहणार नसल्याचं, म्हटलं आहे.

****

स्वयंघोषित संत आसाराम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावला आहे. लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली अटकेत असलेले आसाराम यांनी प्रकृती अस्वास्थ्याचं कारण देत जामीनासाठी अर्ज केला होता.

****

विविध आरोग्यसेवा योजना आणि जागरूकता कार्यक्रमांमुळे माता आणि बाल मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी नड्डा यांनी म्हटलं आहे. मुंबई इथं टाटा मेमोरिअल रूग्णालयाच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. २००५ आणि २०१५ मधील नमूना नोंदणी यंत्रणेच्या अहवालांनुसार बालमृत्यूच्या प्रमाणात मोठी घट झाल्याचं दिसून येतं असल्याचं नड्डा म्हणाले.

****

भुमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई दारु मुक्त महाराष्ट्रासाठी अभियान राबवणार आहेत. या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात पुणे इथून करणार असल्याचं देसाई यांनी पीटीआयशी बोलताना सांगितलं. दारुमुळे घरगुती हिंसाचाराच्या प्रमाणात वाढ होत असून, त्याचा महिलांच्या आयुष्यावर वाईट परिणाम असल्याचं त्या म्हणाल्या. महिलांना मदत करण्यासाठी राज्यभर ताईगिरी नावाचे गट स्थापन करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

****

छत्तीसगढ मधल्या नारायणपूर जिल्ह्यात २४ महिलांसह १९५ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. हे नक्षलवादी अबूझमाड या भागात सक्रिय होते.

****

समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि काँग्रेससाठी प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. काँग्रेससोबत आघाडी करून ही निवडणूक लढवण्यावर आपला विरोध असून, समाजवादी पक्ष स्वबळावर निवडणूक जिंकण्यास सक्षम असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  

****

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याच्या शक्यता फेटाळून लावत, धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस कधीही तडजोड करणार नसल्याचं म्हटलं आहे. ते गोव्यात पणजी इथं बोलत होते. विमुद्रीकरणामुळे असंघटीत क्षेत्रातल्या कामगारांचे रोजगार बुडल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

****

शिवसेना भाजपची मुंबईत युती होऊ शकली नसली, तरी राज्य सरकारला काहीही धोका नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीची गरज भासणार नाही, असं महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते कोल्हापूर इथं बोलत होते. शिवसेना भाजप नेत्यांनी एकमेकांवर जहरी टीका करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

****

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ अंतर्गत लातूर जिल्ह्यातील ५१ मतदान केंद्रावर ३ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या संदर्भात काल शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत, निवडणूक निरीक्षक नरेंद्र पोयाम यांनी लातूर जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेऊन मार्गदर्शक सूचना केल्या.

//********//