Friday, 17 November 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 17.11.2017 - 17.25


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 17 November 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १७ नोव्हेंबर २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

आर्थिक निकषांवर देशांचं मानांकन ठरवणारी अमेरिकेची संस्था मूडीजनं भारताच्या मानांकनात केलेली वाढ म्हणजे गेल्या तीन चार वर्षात देशानं केलेल्या आर्थिक सुधारणांना मान्यता मिळाली असून, त्या योग्य असल्याचं सिद्ध झालं असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आज ते वार्ताहरांशी बोलत होते. आर्थिक क्षेत्रात अनेक रचनात्मक सुधारणा सुरु असून, या सुधारणा देशाला उच्च आर्थिक विकासाच्या दिशेनं घेऊन जात आहेत, असं ते म्हणाले. या प्रक्रियेसंदर्भात हे साशंक आहेत, त्यांनी अंतर्मुख होण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले.
काँग्रेस आणि भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी मात्र या मानांकनासंदर्भात संशय व्यक्त करत आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था आणि पंतप्रधान देशाची मानसिकता समजण्यात अपयशी ठरल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी भूकबळी, शेतीची वाईट अवस्था, बेरोजगारी, वाढती महागाई, निर्यातीत घट, नोटबंदीमुळे निर्माण झालेलं संकट आणि अन्य बाबी मानांकन निश्चित करण्यासाठीचे मापदंड असल्याचं ट्विटरवरील आपल्या संदेशात म्हटलं आहे.

****

सरकारनं बियाणं प्रमाणित करण्याची जबाबदारी योग्यरित्या पार पाडली असती तर शेतकऱ्यांना बोगस बियाणं मिळालं नसतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मांगलादेवी इथं शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते आज बोलत होते. प्रत्येक शिवारात जाऊन बोंडअळीनं झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजेत, त्याआधारे राज्य शासनानं शेतकऱ्यांना लागवड खर्च आणि हमीभाव लक्षात घेऊन एकरी मदत द्यावी अशी मागणीही पवार यांनी यावेळी केली. कापूस प्रश्नासंदर्भात येत्या १६ डिसेंबरला नागपूरच्या कापूस संशोधन केंद्रामध्ये देशभरातल्या कापूस पिकाच्या संशोधकांची एकदिवसीय कार्यशाळा घेण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारला विनंती करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

****

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं राष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी सर्व मान्यता दिल्या असून, पर्यावरणीय मान्यता अंतिम टप्प्यात असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. मुंबई इथं बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या संकेतस्थळाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. स्मारकाच्या निर्मितीमध्ये शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या पाचव्या स्मृतीदिनानिमित्त शिवाजी पार्कवर जाऊन त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. राज्यभरातून शिवेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं शिवाजी पार्कवर दाखल झाले होते.  

****

प्रसार भारतीच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त आकाशवाणी औरंगाबाद केंद्रात आज रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. आकाशवाणीच्या कर्मचाऱ्यांसह अनेक नागरिकांनी या उपक्रमात आपला सहभाग नोंदवला.
आकाशवाणी मुंबई केंद्रातही रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं, तसंच प्रादेशिक वृत्त विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी आज राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेतली.

****

‘दशक्रिया’ या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मराठी सिनेमावर बंदी घालण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं आज फेटाळून लावली. पैठण इथल्या काही पुरोहितांनी ही याचिका दाखल केली होती. या चित्रपटातले अनेक संवाद, उल्लेख हे मानहानीकारक, भावना दुखावणारे, संदर्भहीन असून, आक्षेपार्ह संवाद, दृश्ये वगळण्यात यावेत आणि या चित्रपटाच्या प्रदर्शनास बंदी घालण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
दरम्यान, दशक्रिया चित्रपटात ब्राम्हण समाजाची बदनामी झाल्याचा आरोप करत ब्राम्हण संघटनांनी आज औरंगाबाद शहरातल्या प्रोझोन मॉलमध्ये या चित्रपटाचा खेळ बंद पाडण्याचा प्रयत्न केला. यावेळी ब्राम्हण संघटना आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला, मात्र चित्रपट सुरुच राहीला.

****

जालना जिल्ह्यात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गास जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध मावळत आहे. जालना तालुक्यातल्या पानशेंद्रा इथल्या तेरा शेतकऱ्यांनी आपली आठ हेक्टर ३२ गुंठे जमीन राज्यरस्ते विकास महामंडळाला विक्री केली. आजपर्यंत जालना आणि बदनापूर तालुक्यातल्या दीडशे शेतकऱ्यांनी ६६ पूर्णांक ६५ गुंठे जमीन समृद्धी महामार्गासाठी दिली असून, या शेतकऱ्यांना शासनाकडून ३५ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला आहे.   

****

चीनमधल्या फुझोऊ इथं सुरु असलेल्या चीन खुल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा उपान्त्यपूर्व फेरीत पराभव झाला. आज झालेल्या सामन्यात चीनच्या गाओ फँग्जीनं सिंधूचा ११- २१, १० - २१ असा पराभव केला.

****

भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलकाता इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याचा आज दुसऱ्या दिवसाचा खेळही पावसामुळे थांबवण्यात आला. खेळ थांबला तेव्हा भारताच्या पाच बाद ७४ धावा झाल्या होत्या.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 10 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...