Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19
July 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ जुलै २०१९ दुपारी १.०० वा.
****
भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या
मानाच्या ‘हॉल ऑफ फेम’मध्ये समावेश करण्यात आला आहे. सचिनसह दक्षिण अफ्रिकेचा माजी
वेगवान गोलंदाज ॲलन डोनाल्ड, ऑस्ट्रेलियाची माजी महिला वेगवान गोलंदाज कॅथरीन यांचाही
हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला आहे. हा मानाचा सन्मान मिळवणारा सचिन हा सहावा
भारतीय क्रिकेटपटू आहे. सचिनपूर्वी बिशन सिंह बेदी, कपिल देव, सुनील गावस्कर, अनिल
कुंबळे आणि राहुल द्रविड यांना हा सन्मान मिळालेला आहे. सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून
निवृत्त होऊन पाच वर्ष पूर्ण झालेल्या क्रिकेटपटूचाच या या सन्मानासाठी विचार केला
जातो.
****
१९९२ च्या बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी विशेष न्यायालयानं पुढच्या
नऊ महिन्यात निर्णय द्यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. भारतीय जनता
पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, आणि उमा भारती यांच्यासह अनेक
ज्येष्ठ नेते या प्रकरणात आरोपी आहेत. या प्रकरणी साक्षी पुरावे नोंदवण्याची प्रक्रिया
पुढच्या सहा महिन्यात पूर्ण करावी, असंही न्यायालयानं सांगितलं आहे. या प्रकरणाची सुनावणी
होत असलेले विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती येत्या ३० सप्टेंबरला निवृत्त होत आहेत,
त्यांना सुनावणी पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले.
याबाबत उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय जारी करावा, असंही न्यायालयानं म्हटलं आहे.
****
कर्नाटक विधानसभेमधे जनता दल धर्मनिरपेक्ष - काँग्रेस आघाडी सरकारच्या
विश्वासमत प्रस्तावावरच्या चर्चेला आज पुन्हा सुरुवात झाली. काल मुख्यमंत्री कुमारस्वामी
यांनी विश्वास दर्शक ठराव विधान सभेत मांडला होता, परंतु चर्चेदरम्यान गोंधळ झाल्यान
सभापतींनी कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं होतं. राज्यपाल वजुभाई वाला यांनी आज दुपारी
दीड वाजता मुख्यमंत्री कुमार स्वामी यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, कर्नाटकच्या या मुद्यावरून काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी
आज लोकसभेत गदारोळ केला. अनेक सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोरच्या हौद्यात उतरून,
घोषणाबाजी करत फलक झळकावले.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येत्या स्वातंत्र दिनाच्या अनुषंगानं
त्यांच्या भाषणासाठी देशातल्या नागरीकांना आपले विचार पाठवण्याचं आवाहन केलं आहे. नागरीक
आपले विचार नमो ॲपच्या माध्यमातून पाठवू शकतात असं मोदी यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून
म्हटलं आहे.
दरम्यान, पंतप्रधान या महिन्याच्या अखेरच्या रविवारी, येत्या २८
तारखेला सकाळी ११ वाजता आकाशवाणीच्या ‘मन की बात’या कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधणार
आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा ५५ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांना
1800-11-7800 या टोल फ्री क्रमांकावरुन तसंच ‘मायगव्ह ओपन फोरमद्वारेही’ आपले विचार
कळवता येतील.
****
गेल्या जून महिन्यात कृष्णा आणि वारणा नदीतून तब्बल ४० टीएमसी पाणी
कर्नाटकात वाहून गेल्यानं अलमट्टी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. १२५ टीएमसी क्षमता
असलेल्या अलमट्टी धरणात सध्या १०६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पावसाचं
पाणी अडवण्यासाठी नद्यांवर बंधारे नसल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. सांगली जिल्ह्यात
टेंभू, ताकारी, म्हैसाळ इथं पावसाचं पाणी अडवण्यासाठी बंधारे बांधण्याची आवश्यकता आहे.
मात्र तशी व्यवस्था राज्य सरकारनं अद्याप केलेली नाही. वरील तीनही ठिकाणी सिंचन योजनेद्वारे
पाणी उचलण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, मात्र या योजनांचे पंप पुरेशा क्षमतेने चालत
नसल्यामुळं कृष्णा आणि वारणा नद्यातील पाणी दरवर्षी पावसाळ्यात थेट कर्नाटक मध्ये वाहून
जातं. सदरचे पाणी अडवून कायम दुष्काळी तालुक्यातील गावांना द्यावे अशी मागणी अनेक वर्षांपासून
केली जात असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधान सभेसाठीच्या मतदानासाठी मतदार याद्याच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम
सुरु झाला असून १९ ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे. मतदारांना
त्यांचे नाव, मतदान केंद्र या विषयीच्या शंकाचे निरसन करण्यासाठी २०, २१ आणि २७,२८
जुलै या चार दिवशी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं, या बाबतच्या वृत्तात म्हटलं
आहे.
****
राज्यातल्या ग्रामसेवक संवर्गाच्या प्रलंबित मागण्यांबाबत राज्य
सरकार गांभीर्य दाखवत नसल्यानं आणि आपल्या विविध मागण्यांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चा,
बैठकांमधे देण्यात आलेल्या आश्वासनांची अद्याप पूर्तता झालेली नाही, त्यामुळे याबाबत
तातडीनं निर्णय घ्यावा अन्यथा राज्यातले ग्रामसेवक शासनाचं लक्ष वेधण्यासाठी लोकशाही
मार्गानं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत, असा इशारा महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे
राज्य उपाध्यक्ष सुचित घरत यांनी दिला आहे. ते पालघर इथं वार्ताहरांशी बोलत होते.
****
No comments:
Post a Comment