Regional
Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 May
2021
Time 18.10
to 18.20
Language
Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ मे २०२१ सायंकाळी ६.१०
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत
पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं
आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. कोविड लसीची पहिली
मात्रा घेतलेल्या नागरिकांनी दुसरी मात्रा अवश्य घ्यावी, आणि १८ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावं. प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन
करावं. नाक आणि तोंडाला मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित
अंतर राखावं, हात वेळोवेळी साबणाने धुवावेत. हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा.
****
**
येत्या १५ दिवसांत केंद्र सरकार, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना १ कोटी ९० लाख कोविड
लसी विनामूल्य पाठवणार.
**
रशियातून आयात केलेल्या कोरोना विषाणूवरील 'स्पुटनिक व्ही' या लसीची भारतातील किंमत
जाहीर.
**
राज्यभरात २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली
आणि
**
साखर उद्योगानं प्राणवायू निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचं
आवाहन
****
केंद्र सरकार येत्या १५ दिवसांत १ कोटी ९० लाख कोविड लस राज्य
आणि केंद्रशासित प्रदेशांना विनामूल्य पाठवणार आहे. यामध्ये १ कोटी ६२ लाख ५० हजार
कोव्हिशील्ड लसी आणि २९ लाख ४९ हजार कोव्हॅक्सीन लसींचा समावेश आहे. या सर्व लसी ४५
पेक्षा जास्त वय असलेले नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात
येतील. यापूर्वीही केंद्र सरकारनं १ कोटी ७० लाख कोविड लसी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना
पाठवल्या होत्या.
****
रशियातून
आयात केलेल्या कोरोना विषाणूवरील 'स्पुटनिक व्ही' या लसीची भारतातील किंमत जाहीर करण्यात
आली आहे. या लसीच्या एका मात्रेची किंमत नऊशे पंच्याण्णव रुपये चाळीस पैसे इतकी असणार
आहे. भारतात मंजुरी मिळालेली स्पुटनिक व्ही ही कोरोनावरील तिसरी लस आहे. हैदराबाद इथली
डॉ. रेड्डीज ही औषध निर्माण कंपनी या लशीचं भारतात उत्पादन करणार असून, आज हैदराबादमध्ये
पहिली मात्रा देण्यात आल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. पुढच्या आठवड्यापासून ही लस
देशभरात उपलब्ध होणार असल्याचं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे.
****
देशात काल ३ लाख ४३ हजारांहून अधिक नवीन कोविड बाधितांची नोंद झाली. त्यामुळे बाधितांची एकूण
संख्या २ कोटी ४०
लाखांवर गेली आहे. काल ४ हजार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यानं
मृतांची एकूण संख्या २ लाख ६२ हजार ३१७ झाली आहे. आतापर्यंत एकूण २ कोटी ७९ हजार ५९९ रुग्ण संसर्गमुक्त झाले असून,
देशाचा रुग्ण बरे होण्याचा दर ८३ पूर्णांक ५ टक्के झाला आहे. सध्या देशात ३७ लाख ४ हजार ८९३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत
२० लाख २७ हजार नागरिकांचं
कोविड लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत लसींच्या जवळपास १८ कोटी मात्रा देण्यात आल्या आहेत. देशात आतापर्यंत ४ कोटी ५ लाख नागरिकांचं लसीकरण
पूर्ण झालं असून, सुमारे १३ कोटी ८८ लाख नागरिकांनी लसीची पहिली मात्रा घेतली आहे.
****
`प्रधानमंत्री
शेतकरी सन्मान निधी` योजनेचा आठवा हप्ता आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वितरीत केला.
यावेळी पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. लातूरचे शेतकरी बाबा नरारे
यांना पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. यावेळी किसान क्रेडिट
कार्डच्या लाभाविषयी पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नरारे म्हणाले...
छोटे किसानोंको बँक से सस्ती
दर पर आसान ऋण मिला। इसके लिए किसान क्रेडीट कार्ड का दायरा बहोत बढाया गया। आप के
खेती पर इससे कोई फरक पडा है क्या? मैनें १ लाख ५८ हजार रुपये ऋण लिया था। उन पैसोंसे
जमीन लेवल कर दिया था। और कोई बीज, कोई मजदूरी और उसके साथ साथ हमनें बकरीयाँ भी पाली
थी। जमीन लेवल से और गोबर खत भी लिया था हमने उससे, तो पिछले साल २० ट्रॅक्टर सोयाबीन
हो गया था। इस साल ४० ट्रॅक्टर सोयाबीन हो गया सर। इसलिए बहोत बडा फायदा हो गया है।
और उसके साथ साथ हम वहा प्याज भी लगाते है। थोडा मिर्ची भी लगाते है। ये सबकूछ तो केसीसी
के वजह से हो गया सर।
या
योजनेचा हा आठवा हप्ता नऊ कोटी ५० लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात
आला असून, याअंर्तगत १९ हजार कोटी रुपये निधीचं
वितरण करण्यात आलं आहे.
****
कोरोना
विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात २३ मे रोजी होणारी शिष्यवृत्ती
परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. इयत्ता पाचवीची पूर्व उच्च प्राथमिक
शिष्यवृत्ती परीक्षा आणि इयत्ता आठवी साठीची पूर्व माध्यमिक
शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, परीक्षेची पुढील तारीख यथावकाश
कळवण्यात येईल, अशी माहिती पुणे येथील महाराष्ट्र राज्य परीक्षा
परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी दिली आहे.
****
राज्यातल्या साखर उद्योगानं प्राणवायू
निर्मितीच्या क्षेत्रात पुढाकार घ्यावा,
असं आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं
आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात चोराखळी इथं धाराशिव साखर कारखान्याच्या प्राणवायू निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आज मुख्यमंत्र्यांच्या
हस्ते झालं. यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ते बोलत
होते. राज्याला सध्या सतराशे मेट्रीक टन प्राणवायूची आवश्यकता आहे. साखर
कारखान्यातल्या इथेनॉल प्रकल्पात काही
फेरबदल करून विकसित करण्यात आलेला हा प्रकल्प कोविड विरुद्धच्या लढ्यात अतिशय महत्वाचा असून, इतर उद्योग
आणि सहकारी साखर कारखान्यांनी यापासून प्रेरणा घ्यावी, असं
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
महात्मा बसवेश्वर यांची आज ८९० वी जयंती.
या निमित्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी महात्मा बसवेश्वर
यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
****
औरंगाबाद
जिल्ह्यात छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आज ठिकठिकाणी अभिवादन करण्यात आलं. शहरातल्या
टीव्ही सेंटर चौकात संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याला विविध पक्ष, सामाजिक
संघटनांच्या वतीनं पुष्पहार अर्पण करण्यात आला. महात्मा बसवेश्वर महाराजांच्या ८९०
व्या जयंतीनिमित्त आकाशवाणी चौकात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
रक्तदान शिबीराचं आयोजनही यावेळी करण्यात आलं होतं.
अक्षय्य
तृतीया सण आज जिल्ह्यात पारंपरिक पद्धतीनं पूजा करुन साजरा करण्यात आला. मागील वर्षापासून
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा बंद असल्यामुळे सोने खरेदी आणि
इतर खरेदी न झाल्यामुळे व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागत आहे.
ईद
उल फित्र - रमजान ईदही गर्दी न करता सर्वत्र साधेपणानं साजरी करण्यात आली.
****
परभणी जिल्हयातील पेठशिवणी इथं बसवेश्वर जयंती साजरी करण्यात
आली. तसंच शहरातील खंडोबा बाजार इथं संभाजी सेना या सामाजिक
संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती
उत्साहात साजरी करण्यात आली.
****
नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील मालेगाव इथं संभाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आलं.
****
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं पालन करत मान्सूनसाठी सर्व यंत्रणांनी निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या
दृष्टीने सज्ज राहण्याचे निर्देश औरंगाबादचे जिल्हाधिकारी
सुनील चव्हाण यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या
मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत ते आज बोलत होते. जिल्ह्यात
एक मोठे, तसंच १६
मध्यम आणि ९६ लहान असे एकूण ११३ पाटबंधारे प्रकल्पांशिवाय बरेच पाझर तलाव, जुने
तलावही आहेत. या तलावांच्या सर्वेक्षणासह त्यांची गळती बाबत तपासणी करुन तत्काळ
अहवाल सादर करावा. या तलावांची दुरूस्ती आणि पूर परिस्थितीचं नियोजन, तसंच
संभाव्य धोक्याच्या ठिकाणी नागरिकांना माहिती आणि सावध करण्याच्या दृष्टीने परिपूर्ण सूचनांचे फलक लावावेत, असेही निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.
****
मराठा
समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्ग ओबीसीमध्ये समावेश करावा. या मागणीचं निवेदन संभाजी
ब्रिगेडच्या वतीनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय
आणि जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज पाठवण्यात आलं. संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष
रमेश गायकवाड यांच्या शिष्टमंडळानं हे निवेदन सादर केलं. मराठा आरक्षणाच्या बाबतीत
संभाजी ब्रिगेड आता समाजाची फसवणूक होऊ देणार नाही. त्यासाठी लढा उभारणार असल्याचं
या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
****
औरंगाबाद
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात आज २४ कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये
औरंगाबाद जिल्ह्यातल्या १९, अहमदनगर जिल्ह्यातल्या चार आणि जालना जिल्ह्यातल्या एका
रुग्णाचा समावेश आहे. आज घाटीत ५७ नवे रुग्ण दाखल झाले, तर ३५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना
सुटी देण्यात आली.
//********//
No comments:
Post a Comment