आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
०४ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राज्यपालांच्या दोन दिवसीय परिषदेचा समारोप काल राष्ट्रपती भवनात झाला. राज्यपाल कार्यालयाचं कामकाज सुधारण्यासह लोककल्याणासाठी प्राप्त मौल्यवान विचार-सूचनांची अंमलबजावणी व्हावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या भाषणात सांगितलं. आदर्श राज्याचं उदाहरण प्रस्थापित करणं राज्यपालांची जबाबदारी असून प्रभावी कामकाजासाठी संबंधित राज्य सरकारांशी सतत संवाद साधावा असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी यावेळी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यपालांना राजभवनात शासनाचं आदर्श मॉडेल विकसित करण्याचं आवाहन केलं .
****
राज्यात येत्या बहात्तर तासांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. मराठवाड्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, नाशिक जिल्ह्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असून नांदूर- मधमेश्वर, दारणा, कडवामधून आणि भाम धरणातून गोदावरी नदीपात्रात पाणी विसर्ग सकाळी नऊ वाजेपासून होत आहे. तर, गंगापूर धरणातूनही दुपारी बारा वाजता पाणी विसर्ग केला जाणार आहे. यापार्श्वभूमीवर गोदावरी नदीला पुर आला असून रामकुंड परिसरात लहान मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. यामुळं जयकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. कोयना धरणातूनही मोठा विसर्ग सुरु असल्यानं कृष्णाकाठच्या गावातील, पुररेषेलगत आणि सखल भागातील नागरिकांना काळजी घेण्यासह सुरक्षितस्थळी स्थलांतराचे निर्देश प्रशासनानं दिले आहेत. पुण्यासह सातारा जिल्ह्यासाठी अतिवृष्टीचा ‘लाल बावटा’ जारी झाला आहे.
****
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या, २०२४-२५ वर्षासाठी विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशाची मुदत वाढवून येत्या १५ ऑगस्टपर्यंत झाली आहे. याद्वारे विना विलंबशुल्क प्रवेश घेता येईल असं विद्यापीठानं कळवलं आहे.
****
आगामी काही वर्षात भारत वीस टक्के क्षेत्र, सेंद्रिय शेतीखाली आणू शकतो असं नीती आयोगाचे सदस्य तथा कृषी अर्थशास्त्रज्ञ आंतरराष्ट्रीय परिषद अध्यक्ष प्राध्यापक रमेश चंद यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीशी बोलतांना त्यांनी नैसर्गिक-सेंद्रिय शेतीत विज्ञानाच्या वापरानं शेती उत्पादकता वाढीस निश्चित मदत होईल असं नमूद केलं.
****
छत्रपती संभाजीनगर इंथल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या काल झालेल्या बैठकीत चार विद्याशाखांमधून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५१ हजार रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनानं कळवली आहे.
****
No comments:
Post a Comment