Friday, 11 July 2025

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 11.07.2025 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 

Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date: 11 July 2025

Time: 7.10 to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक: ११ जूलै २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेत मंजूर-देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्याची गरज मुख्यमंत्र्यांकडून व्यक्त

·      शेतकरी कर्जमाफीचा अनुषंगिक अभ्यास करण्यासाठी राज्यशासनाकडून समिती गठीत

·      गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून जाहीर करण्यात येणार

·      मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङ्गमय पुरस्कार जाहीर

आणि

·      लॉर्ड्स कसोटीत पहिल्या दिवसअखेर इंग्लंडच्या ४ बाद २५१ धावा

****

महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक विधानसभेनं काल संमत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक सदनासमोर सादर केलं. देशाच्या व्यवस्थेवर घाला घालणाऱ्यांविरोधात कडक कायदे करण्याची गरज व्यक्त करत, असा कायदा करण्यामागची भूमिका मुख्यमंत्र्यांनी सदनात स्पष्ट केली, ते म्हणाले...

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

या कायद्यानुसार सरसकट कोणालाही अटक करता येणार नाही, फक्त प्रतिबंध असलेल्या संघटनांच्या सक्रीय कार्यकर्त्यांनाच न्यायव्यवस्थेनुसार स्थापन प्राधिकरणाच्या परवानगीनुसार अटक येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले... 

बाईट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

या विधेयकावरच्या चर्चेत सुधीर मुनगंटीवार, नितीन राऊत, जयंत पाटील, वरुण सरदेसाई, भास्कर जाधव तसंच कम्युनिस्ट पक्षाचे विनोद निकोले यांच्यासह अनेक सदस्यांनी सहभाग घेत, आपली मतं मांडली.

****

डिजिटल अरेस्ट सारखे प्रकार रोखण्यासाठी जनजागृतीसाठी अधिकाधिक प्रयत्न करणार असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणेसाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी, यासंदर्भातल्या लक्षवेधीच्या उत्तरात दिली. विधीमंडळात काल झालेल्या इतर कामकाजाचा हा संक्षिप्त आढावा..

शेतकरी कर्जमाफीचा अनुषंगिक अभ्यास करण्यासाठी राज्य शासनाकडून समिती गठीत करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी विधानसभेत ही माहिती दिली. यासंदर्भात सभागृहाला सविस्तर माहिती मुख्यमंत्री देणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

राज्यात जुनी पीक विमा योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती कृषि मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली, याबाबतची लक्षवेधी सूचना राजेश विटेकर यांनी उपस्थित केली होती.

एक रुपयात विमा या योजनेत विमा कंपन्यांना सुमारे साडे सात हजार कोटी रुपये नफा झाला, त्या मानानं शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ मिळाला नसल्याने हा निर्णय घेतल्याचं कोकाटे यांनी सांगितलं.

शेतमजूरांसाठी सामाजिक सुरक्षेची योजना तयार करण्यात येत असून, या योजनेचा मसुदा लवकरच तो मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवला जाणार असल्याचं, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी सांगितलं आहे, राज्यातल्या एक कोटी ७५ लाख शेतमजुरांना या योजनेचा लाभ मिळेल. शेतकऱ्याला समृद्ध करण्यासाठी शासन कार्यरत असल्याचं जयस्वाल यांनी सांगितल.

शेतीसाठी एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर केला जात असल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली.

जालना जिल्ह्यात सन २०२२ ते २०२४ या कालावधीत नैसर्गिक आपत्तीपोटी शेतकऱ्यांच्या अनुदानात घोटाळ्याच्या आरोपांसंदर्भात विभागीय चौकशी विहित कालावधीत पूर्ण करणार असल्याचं, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी काल विधानसभेत सांगितलं.

परभणी जिल्ह्याची थकीत असणारी १८ कोटीं रुपयांची पीकविमा आर्थिक मदत येत्या पंधरा दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितलं.

शेतकऱ्यांच्या शेतजमीन, बांध आणि रस्त्यांवरील वादांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यव्यापी शेतजमीन मोजणी मोहीम राबवण्यात येणार आहे, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत ही माहिती दिली.

****

राज्यातल्या कॅन्टोनमेंट बोर्ड अर्थात कटक मंडळांचा संबंधित महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समावेश करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सदर मंडळांमध्ये नागरी सुविधा तसंच इतर विकास होण्यास मदत होणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. या निर्णयानुसार औरंगाबाद कटक मंडळाचा छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये समावेश होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलतांना, जिल्हा नियोजनातून कटक मंडळांच्या विकासासाठी निधी देण्यात येणार असून, संबंधित महापालिका तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांनी याबाबतचे प्रस्ताव दाखल करण्याची सूचना केली.

****

सार्वजनिक गणेशोत्सव आता राज्य महोत्सव म्हणून जाहीर केला जाणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल विधानसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले...

बाईट- सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार

गणेशोत्सव मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा, आपल्या देखाव्यांमध्ये भारतीय सैन्य, महाराष्ट्राने विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेलं यश अधोरेखित करावं, त्यांना काहीही कमी पडू दिलं जाणार नाही, असंही शेलार यांनी यावेळी नमूद केलं.

****

पंढरपूरच्या आषाढी वारीचा काल समारोप झाला. गोपाळपुरात काल पहाटे झालेल्या गोपाळकाल्यानंतर सर्व पालख्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन परतीच्या वाटेवर मार्गस्थ झाल्या. मंदिर समितीच्या वतीने मानाच्या पालख्यांमधल्या पादुकांचं पूजन करून, मानकऱ्यांचा उपरणे, श्रीफळ आणि हार देवून सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठलाची प्रक्षाळपूजा येत्या बुधवारी १६ जुलैला होणार असल्याचं, मंदिर समितीकडून सांगण्यात आलं आहे.

****

मराठवाडा साहित्य परिषदेच्या विविध पुरस्कारांची काल अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी घोषणा केली. यंदाचा नरहर कुरुंदकर वाङ्गमय पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या वंदना पारगावकर यांच्या, अनोखे थायलंड, या प्रवासवर्णनपर पुस्तकाला जाहीर झाला आहे. प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्गमय पुरस्कार, मिरजच्या कुसनाळे यांच्या गांधीवाद आणि वास्तवया वैचारिक ग्रंथाला, बी. रघुनाथ कथा-कादंबरी पुरस्कार यंदा राधानगरी इथल्या पांडुरंग मुरारी पाटील यांच्या नांगरमुठी या कादंबरीला, तर रा.ज. देशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगरच्या कैलाश प्रकाशन संस्थेचे अनिल अतकरे यांना जाहीर झाला आहे.

****

गुरुपौर्णिमेचा सण काल सर्वत्र साजरा झाला. शिर्डी इथं श्री साई सच्चरित ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्ती मिरवणुकीत शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

गुरुपौर्णिमेनिमित्त काल छत्रपती संभाजीनगर इथं सरस्वती भुवन महाविद्यालयात गुरुवंदन २०२५ हे बहुविद्याशाखीय तसंच बहुभाषिक राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या चर्चासत्राचं, पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ जोगेंद्रसिंह बिसेन यांचं या चर्चासत्रात बीजभाषण झालं.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने काल छत्रपती संभाजीनगरात तीनशे पेक्षा अधिक ठिकाणी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

****

बीड जिल्ह्यात एक हजार ३५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांच्या आरक्षणाची

काल सोत काढण्यात आली. संबधित तहसील कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालयाच्या सूचना फलकावर अधिसूचना प्रसिद्ध करण्याचे निर्देश उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी दिले आहेत. दरम्यान, गेवराई तालुक्यातल्या तलवडा ग्रामपंचायतीचं विभाजन होऊन पोईतांडा नवी ग्रामपंचायत झाली आहे, असं सूर्यवंशी यांनी सांगितलं.

****

नांदेड इथले साहित्यिक आणि रंगकर्मी सुधाकर गाजरे यांचं काल छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

****

क्रिकेट

भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या अँडरसन - तेंडुलकर कसोटी मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंड आपल्या पहिल्या डावात आज चार बाद २५१ धावांपासून पुढे खेळेल. काल नाणेफेक जिंकून इंग्लंडच्या संघाने फलंदाजीला सुरुवात केली. भारताकडून नितीश कुमार रेड्डीने दोन, तर रविंद्र जडेजा आणि जसप्रित बुमराहने प्रत्येकी एक गडी बाद केला.

****

हवामान

मध्य महाराष्ट्राचा घाट भाग तसंच मराठवाड्यात जालना, परभणी आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पुढच्या २४ तासांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाजही हवामान खात्यानं वर्तवला आहे.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणातला पाणीसाठा ७० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.

****

No comments: