आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०२ एप्रिल २०२१ सकाळी ११.००
वाजता
****
आज गुड फ्रायडे. गुड फ्रायडे निमित्त लोक एकमेकांना भेटून मानसिक बळ आणि
आनंदासाठी शुभेच्छा देतात. येशू ख्रिस्तांनी मानवजातीच्या कल्याणासाठी केलेल्या संघर्ष
आणि बलिदानाचं स्मरण हा दिवस करून देतो, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटर
संदेशाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
****
रिजर्व बँकेनं ऑनलाईन व्यवहारांसाठी आवश्यक यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी
बँका आणि वित्तीय संस्थांना सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सर्व बँका आणि
वित्तीय संस्थांना आता नवी प्रणाली लागू करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत मिळणार
आहे.
****
आसाम आणि पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी काल
किरकोळ अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी शांततेत मतदान झालं. आसाममध्ये ७७ पूर्णांक २१ शतांश
टक्के, तर पश्चिम बंगालमध्ये ८० पूर्णांक ४३ शतांश टक्के मतदानाची नोंद झाली.
****
वस्तू आणि सेवा कर - जीएसटीच्या माध्यमातून मार्च २०२१ पर्यंत एक लाख
२३ हजार ९०२ कोटी रूपयांचा विक्रमी महसूल जमा झाला आहे. हा कर लागू झाल्यापासून आतापर्यंतचा
हा सर्वाधिक महसूल आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात जमा झालेल्या महसुलापेक्षा, हा
महसूल २७ टक्क्यांनी आधिक आहे.
****
मागील आर्थिक वर्षात भारतानं जगातल्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत
अधिक प्रमाणात महामार्ग बांधल्याचं रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी
सांगितलं. ते काल दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. गेल्या आर्थिक वर्षात भारतात
१३ हजार किलोमीटरहून अधिक रस्ते बांधण्यात आले असून, दररोज सरासरी ३७ किलोमीटरचे रस्ते
बांधण्यात आले. कोविड कालावधीत आलेल्या आव्हानांचा सामना करत ही कामगिरी केल्याचं त्यांनी
सांगितलं.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ८३४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद
झाली, तर ९३ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या
३४, नांदेड जिल्ह्यातल्या २६, परभणी ११, जालना सात, बीड सहा, हिंगोली आणि उस्मानाबाद
जिल्ह्यात प्रत्येकी चार तर लातूर जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
****
No comments:
Post a Comment