आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१० ऑक्टोबर २०२१
सकाळी ११.०० वाजता
मुंबई नजिक खासगी जहाजावरच्या रेव्ह पार्टीवर गेल्या आठवड्यात छापा टाकून ताब्यात घेतलेले आठ जण आणि जप्त केलेल्या
अंमली पदार्थ प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण विभाग- एन.सी.बी.वर करण्यात येत असलेले
आरोप निराधार असल्याचं निर्देशक समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. एनसीबी अंमली पदार्थांविरुद्ध
सक्रीयपणे कार्यरत असून कोणत्याही राजकिय पक्षाशी
किंवा धर्माशी या विभागाचा संबंध नाही असं त्यांनी नमूद केलं.
***
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरणांतर्गत देशभरात आता ९४ कोटी ६२ लाखांहून अधिक जणांना ज्यामध्ये महाराष्ट्रात ८ कोटी ७२ लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
आहेत.यात ६८ कोटी जणांना पहिली मात्रा, तर २६ कोटी ६२ लाख जणांना लसीची दुसरी मात्रा
देण्यात आली आहे. . देशात काल लसीच्या ६० लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या.
***
सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळ एस.टी. राज्यभरातील आगारातून मिळून रोज
एक हजार जादा गाड्या सोडणार आहे. येत्या २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर दरम्यान प्रवासी याचा लाभ घेऊ शकतील. या गाड्यांचं आरक्षण
महामंडळाचं संकेतस्थळ किंवा भ्रमणध्वनी अँपवर करता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर
खबरदारीचा उपाय म्हणून सर्व गाड्या स्वच्छ आणि निर्जंतुक करण्याचही एस.टी.चं नियोजन
आहे.
दरम्यान, भारतीय रेल्वेकडूनही आजपासून २१ नोव्हेंबरपर्यंत विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. गर्दीवर नियंत्रण
आणण्यासाठी उत्तर रेल्वे विभागानं आजपासून विशेष गाड्यांची घोषणा केली असून दक्षिण
रेल्वे विभागाचही विशेष गाड्या सुरु करण्याचं नियोजन आहे.संबंधीत आगाऊ आरक्षण देखील
सुरु करण्यात आलं आहे. पश्चिम, दक्षिण मध्य आणि पूर्व दक्षिण रेल्वे विभागानही अनेक विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.
***
भारत-यजमान ऑस्ट्रेलिया
महिला संघांदरम्यान काल क्विन्सलंड इथं झालेला दूसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना ऑस्ट्रेलियानं
चार गडी राखून जिंकला.भारतानं प्रथम फलंदाजी करत विजयासाठी ठेवलेलं ११९ धावम्चं लक्ष्य
ऑस्ट्रेलियानं सहज पार केलं.तीन सामन्यांच्या या मालिकेतला पहिला सामना पावसामुळं अनिर्णित
राहिला.आज अंतिम सामना होणार आहे .याच दौऱ्यात उभय संघात झालेल्या एकमेव कसोटी सामना
अनिर्णित राहिला होता तर एकदिवसीय सामन्यांची
मालिका ऑस्ट्रेलियानं दोन-एकनं जिंकली.
***
राज्यात आजही अनेक भागात व्यापक प्रमाणात पावसाची शक्यता हवामान
विभागानं वर्तवली आहे.मात्र, मराठवाड्यात आज
पावसांचं प्रमाण तुरळक असलं तरी,मराठवाड्यासह
कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वीजा- जोराच्या वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा
आहे.काल,पुण्यासह ,अहमदनगर ,सातारा जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे. परभणी जिल्ह्याच्या पालम तालुक्यात
अनेक भागात काल दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह
विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस झाला. बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातही
जोरदार पाऊस झाला.
***
संक्षिप्त बातमीपत्र संपलं.
No comments:
Post a Comment