Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 10 September
2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० सप्टेंबर २०२५ सायंकाळी ६.१०
****
· सीपीआरआय प्रकल्पामुळे इलेक्ट्रीकल उत्पादन क्षेत्राला चालना-मुख्यमंत्र्यांचं
प्रतिपादन
· ‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी राज्य
सरकारच्या विचाराधीन
· जनसुरक्षा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचं राज्यभरात आंदोलन
· जीएसटी कपातीमुळे क्रयशक्ती वाढेल-केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांचा
विश्वास
आणि
· आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा यजमान युएई संघासोबत सामना
****
नाशिक इथं उभारलेल्या सीपीआरआय प्रकल्पामुळे राज्याच्या इलेक्ट्रीकल
उत्पादन क्षेत्राला चालना मिळेल, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांनी केलं आहे. सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या या प्रकल्पाचं आज केंद्रीय
मंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या हस्ते लोकार्पण झालं, त्यावेळी
मुख्यमंत्री बोलत होते.
बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगरसह राज्यात इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रात वाढती
गुंतवणूक पाहता,
नाशिकच्या या प्रकल्पात ईव्ही चाचणीची व्यवस्था करावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्री खट्टर यांच्याकडे केली.
दरम्यान, राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
वेळेत मिळावी,
यासाठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणाप्रमाणेच शिष्यवृत्ती
वितरण ‘ऑटो सिस्टम’वर होण्यासाठी प्रारूप तयार करावा, असे
निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. राज्य उच्च शिक्षण आणि विकास आयोगाची बैठक आज मुंबईत
झाली,
त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
****
प्रदूषण मुक्त पर्यावरणासाठी भविष्यात प्रत्येक पेट्रोल पंपावर
‘नो पीयूसी नो फ्युएल’ उपक्रमाची अंमलबजावणी सक्तीने करण्यात यावी, असे
निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. आज परिवहन आयुक्त कार्यालयात
झालेल्या बैठकीत सरनाईक बोलत होते.
प्रत्येक पेट्रोल पंपावर सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे इंधन
भरण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक वाहनाचा वाहन क्रमांक तपासला जाईल. त्यानुसार वाहनाच्या
पीयूसी वैधता कळेल. पीयूसी संपलेल्या वाहनांना पेट्रोल पंपावर उपलब्ध सुविधेतून पीयुसी
काढता येईल आणि त्यानंतरच इंधन भरता येईल, अशी
यंत्रणा,
सरकारच्या विचाराधीन आहे. भविष्यात वाहन विक्री तसंच दुरुस्ती
करणाऱ्या दुकानांमध्ये पीयुसी देण्याची व्यवस्था केली जाईल. अवैध पद्धतीने पीयूसी देणाऱ्या
टोळींविरोधात धडक मोहीम राबवण्याचे आदेशही सरनाईक यांनी दिले. सध्याच्या पिढीने स्वतः
वर पर्यावरणपूरक काही निर्बंध घालून घेणं आवश्यक असल्याचंही सरनाईक यांनी म्हटलं आहे.
****
आरक्षणाच्या बाबतीत ओबीसींवर अन्याय होणार नाही, असा पुनरुच्चार ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे यांनी केला आहे. आज या उपसमितीची पहिली बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत, त्यांनाच
अध्यादेशाप्रमाणे प्रमाणपत्र मिळेल, वंशावळ जुळल्यानंतर सर्व कागदपत्रांच्या
पूर्ततेनंतरच दाखला देण्यात येईल. फक्त खोट्या नोंदी होणार नाहीत याची, उपविभागीय अधिकाऱ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता उपसमितीतील सर्वच सदस्यांनी व्यक्त
केली,
अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.
****
जनसुरक्षा कायदा रद्द करावा या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी
आंदोलनं करण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथं क्रांती चौकात महाविकास आघाडीनं आंदोलन
केलं. सरकारनं या आंदोलनाची गंभीर दखल घ्यावी अन्यथा, आंदोलन
अधिक व्यापक करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
बीड इथं महाविकास आघाडीच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात
आंदोलन करण्यात आलं. जिल्हाधिकारी कार्यालयावर यावेळी मोर्चा काढण्यात आला.
राज्यात धुळे, सोलापूर नाशिक, नागपूर,
रत्नागिरीसह अनेक ठिकाणी जनसुरक्षा कायद्या विरोधात आंदोलन करण्यात
आलं. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायदा आणि सुव्यवस्था आणि विकासाशी संबंधित प्रश्न त्वरित
सोडवण्याची मागणी केली.
****
वस्तू आणि सेवा कराच्या दरात केलेल्या कपातीमुळे लोकांची क्रयशक्ती
वाढेल,
असा विश्वास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी व्यक्त
केला आहे. प्रसारभारतीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. बाजारपेठेतील खरेदी
वाढल्यानंतर उत्पादनात वाढ होऊन मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळेल, असं चौधरी यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
बाईट – पंकज चौधरी, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री
****
जीएसटी परिषदेचे निर्णय देशाची प्रगती तसंच ग्राहक कल्याणाची
बांधिलकी अधोरेखित करतात, असं मत सीआयआयचे मराठवाडा झोनल
अध्यक्ष तसेच छत्रपती संभाजीनगरचे उद्योजक प्रशांत नरवाडे यांनी व्यक्त केलं आहे.
बाईट – प्रशांत नरवडे
वस्तू आणि सेवा कर - जीएसटी पुनर्रचनेत, अन्न,
औषधं, शेतीविषयक सामग्री, मत्स्योत्पादन अशा विविध घटकांसह अन्य अनेक क्षेत्रांमध्ये कराच्या दरात कपात करण्यात
आली आहे. याबाबत अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून -
बांधकाम
क्षेत्रासाठी लागणारे संगमरवर, ग्रॅनाईटसारखे दगड, बांबूपासून
बनणाऱ्या फरश्या, विविध
प्रकारचे गालिचे, रजया
यांवरचा जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. घर सजावटीसाठी
लागणारं लाकडी साहित्य, सुशोभनाच्या
वस्तू, पॅकिंगसाठी लागणारं साहित्य
तसंच विविध प्रकारचं हस्तकला साहित्य, मोती आणि प्रवाळ यांवरचा करही १२ टक्क्यावरून ५ टक्के इतका करण्यात आला आहे. सिमेंट, वातानुकूलित यंत्र यावरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे. बायोगॅस, सौर उपकरणं, पवनचक्की
अशा साहित्यावरचा करही १२ टक्क्यावरून ५ टक्के करण्यात आला आहे. बायोडिझेल, कोळसा आणि तत्सम इंधन घटक यांवरचा जीएसटी मात्र १२ टक्क्यांवरून १८ टक्के इतका
वाढवण्यात आला आहे.
****
जीएसटीची सुधारित कर रचना सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी
आणि देशाचं सकल उत्पन्न वाढवणारी असल्याचं, धाराशिव
जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जाधव यांनी म्हटलं आहे. या नवीन कर
रचनेमुळे गृहिणींना दिलासा मिळणार असून, घरगुती वस्तूवरचा कर
कमी केल्यामुळे घर खर्चाचं बजेट आटोक्यात येईल, असं
मत उज्ज्वला मसलेकर या गृहिणीने व्यक्त केलं तर खतं आणि सिंचन साहित्यावरच्या करात
कपात केल्याबद्दल अमित देवगिरे या शेतकऱ्याने समाधान व्यक्त केलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना दुबईत यजमान
युएईच्या संघाशी होणार आहे. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी आठ वाजता सामन्याला सुरुवात
होईल. संयुक्त अरब अमिरातीत कालपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा पहिला सामना अफगाणिस्तान
आणि हाँगकाँग यांच्यात झाला. भारताचा पुढचा सामना येत्या १४ तारखेला पाकिस्तान बरोबर
होणार आहे.
****
बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीड इथं विशेष न्यायालयात
सुनावणी झाली. आरोपी विष्णू चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर युक्तिवाद पूर्ण झाला
असून न्यायालयाने आपला आदेश राखून ठेवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ सप्टेंबर
रोजी होणार आहे.
****
नौदलाच्या सैनिकाची दिशाभूल करुन त्यांची बंदूक आणि काडतुसं
पळवून नेल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. हे दोघे भाऊ असून, दोघांपैकी एक जण अग्नीवीर आहे. शनिवारी रात्री दोघांपैकी एकानं कर्तव्यावर असणाऱ्या
सैनिकाची दिशाभूल करुन त्याची बंदूक आणि काडतुसं घेतली होती. त्यांना तेलंगणातल्या
असिफाबाद इथे काल अटक करून, मुंबईत आणलं जातं आहे.
****
पैठणच्या जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग थांबवण्यात आला आहे.
सध्या धरणात येणाऱ्या पाण्यात लक्षणीय घट झाल्यानं, हा
निर्णय घेण्यात आला आहे. विभागात येलदरी धरणातून सुमारे दोन हजार तर इसापूर धरणातून
सुमारे साडे आठ हजार दशलक्ष घनफूट प्रतिसेकंद
वेगानं विसर्ग केला जात आहे.
****
जालना शहर महानगरपालिकेने केलेल्या सर्वेक्षणात १३ हजार नळ जोडणी
अनाधिकृत आढळून आली आहे. या प्रकरणी नोटीस देण्यात आली असून, या संदर्भातली सुमारे ५ हजार प्रकरणं आता १३ सप्टेंबर रोजी लोकअदालतीत ठेवण्यात
येणार असल्याचं,
याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
हवामान
राज्यात आज विदर्भ, मराठवाडा
तसंच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मराठवाड्यात परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर,
धाराशिव तसंच बीड जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने
वर्तवला आहे.
****
No comments:
Post a Comment