Regional Marathi Text Bulletin,
Aurangabad
Date - 2 January 2018
Time 17.25 to 17.30
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक २ जानेवारी २०१८ सायंकाळी ५.२५ मि.
****
पुणे जिल्ह्यात भीमा कोरेगाव
इथं काल झालेल्या घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत न्यायालयीन
चौकशी करून घटनेच्या मुळापर्यंत पोहोचणार असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणात मरण पावलेल्या तरूणाची
हत्या झाल्याचं मानून गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी केली जाईल, तसंच मृत तरुणाच्या
कुटुंबाला दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. या घटनेत ज्या
वाहनांचं नुकसान झालं, त्यांनाही मदत करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. या
ठिकाणी तैनात पोलिसांनी तातडीनं परिस्थितीवर नियंत्रण मिळवल्याचं ते म्हणाले. राज्यात
जातीय तणाव निर्माण होऊ नये, याची सर्वांनी दक्षता घेण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी
केलं. ते म्हणाले...
कुठलाही जातीवादाचा प्रकार याच्यात होणार नाही.अशा प्रकारची दक्षता घेतली पाहिजे.
अशा प्रकारे जो कारवाई करेल.पोलिस त्याच्यावर कडक कारवाई करतील.सोशल मिडीयातून जर कोणी
अफवा पसरवत असेल. तर त्याच्यावर देखील कडक कारवाई केली जाईल.विविध राजकीय पक्षाच्या
आणि संघटनेच्या नेत्यांनाही माझी विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकाराचं
कोणीही व्यक्तव्य करू नये. या संपूर्ण प्रकरणाच्या तळाशी आम्ही जातो आहोत. आणि निश्चितपणे
त्यातलं सत्य हे बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाईल.आणि म्हणून सर्वांनी शांतता बाळगावी.
केंद्रीय
सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच
कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या घटनेचा निषेध करत, न्यायालयीन चौकशीची
मागणी केली.
दरम्यान,
या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी उद्या
महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. हा बंद शांततेनं पाळावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
या
घटनेचे आज राज्यभरात पडसाद उमटले. औरंगाबाद इथं काही ठिकाणी जमावानं दगडफेक केली, जमावाला
नियंत्रित करण्यासाठी सिद्धार्थ नगर इथं लाठीमार करावा लागला, तर उस्मानपुरा इथं अश्रुधुराचा
वापर करावा लागल्याचं प्रभारी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे सांगितलं. शहरात जमावबंदी
आदेश लागू करण्यात आले असून, नागरिकांनी शांतता राखण्याचं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले
....
त्याचा पडसाद आपल्याकडे उमटून आपल्या इथलं सोशल फॅब्रीक
अशांत होऊ नये याकडे आपण लक्ष्य द्यावं अशा प्रकारचे जर कोणी रूर्मस पसरवण्याचा प्रयत्न
कोणी करत असेल तर त्या वर कृपया करून कोणी विश्वास ठेऊ नये.
परभणी
इथं या घटनेच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. मोर्चेकऱ्यांनी रेल्वे
स्थानकासह काही भागात दगडफेक करत, वाहनांची नासधुस केली. बसेसवर दगडफेक झाल्यानं, जिल्ह्यात
काही काळ बससेवा बंद ठेवण्यात आली होती.
जालना
शहरातल्या नूतन वसाहत भागात काही तरुणांनी वाहनांवर दगडफेक करून एका खाजगी वाहनाला
आग लावली. अप्पर पोलीस अधीक्षक लता फड यांच्या वाहनावर झालेल्या दगडफेकीत एक पोलीस
कर्मचारी जखमी झाला. एसटी बसवर अनेक ठिकाणी दगडफेक झाल्यानं, बस वाहतूक बंद ठेवण्यात
आली आहे. शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त असून, पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतलं
आहे.
नांदेड
इथं आजही बंदचं आवाहन करण्यात आलं होतं, या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात धुळे, नाशिक, वाशिम, अहमदनगर सह अनेक ठिकाणी या घटनेचे
पडसाद उमटल्याचं वृत्त आहे.
****
राष्ट्रीय
वैद्यकीय आयोग विधेयक २०१७ लोकसभेनं स्थायी समितीकडे पाठवलं आहे. संसदेच्या अर्थसंकल्पीय
अधिवेशनाच्या आधी समितीला अहवाल सादर करण्यास सांगण्यात आलं आहे.
या
निर्णयानंतर भारतीय वैद्यकीय संघटनेनं आपला बंद मागे घेतला आहे. औरंगाबाद इथले सुमारे
८० टक्के वैद्यकीय व्यावसायिक, या बंदमध्ये सहभागी झाले होते. मात्र आता, वैद्यकीय
सेवा पूर्ववत झाल्याचं, आयएमएच्या औरंगाबाद शाखेचे सचिव डॉ संतोष रंजलकर यांनी सांगितलं.
जालना जिल्ह्यातलेही २६० वैद्यकीय व्यावसायिक या बंदमध्ये सहभागी झाले होते.
****
राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना जामीन देण्याच्या मागणीसाठी नाशिक मध्ये आज सकाळी
भुजबळ समर्थकांनी निदर्शनं केली. जिल्हाधिकारी कार्यलयावर झालेल्या या आंदोलनात कार्यकर्ते
मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
जालना
इथं अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर
करून, भुजबळ यांना जामीन मंजूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
//********//
No comments:
Post a Comment