Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 30 June 2020
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक
– ३० जून २०२० सकाळी ७.१० मि.
****
·
टिकटॉकसह
५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा निर्णय.
·
पंतप्रधान
नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार.
·
केंद्र
आणि राज्य सरकारचा टाळेबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय; कोरोना विषाणूचा
संसर्ग असलेल्या भागात कडक अंमलबजावणी करणार.
·
औरंगाबाद
जिल्ह्यात वाळूज औद्योगिक परिसरातल्या सात ग्रामपंचायतींच्या हद्दीत येत्या ४ ते १२
जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय.
·
राज्यात
पाच हजार २५७ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण, १८१ रुग्णांचा मृत्यू.
·
औरंगाबाद
जिल्ह्यात दहा रुग्णांचा मृत्यू तर २४६ नवे रुग्ण.
·
नांदेडमध्येही
एकाचा मृत्यू तर जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली आणि परभणीत रुग्णांच्या संख्येत
वाढ.
·
वीज
देयकासंबंधातल्या ग्राहकाच्या तक्रारींचं निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत
न करण्याचे वीज नियामक आयोगाचे निर्देश.
आणि
·
आषाढी
एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या पहाटे सपत्निक शासकीय महापुजा.
****
लडाखमधल्या संघर्षानंतर केंद्र
सरकारनं काल टिकटॉकसह ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. भारतीय सायबर गुन्हे
समन्वय केंद्रानेही अलिकडेच या धोकादायक चिनी अॅप्सवर बंदी घालण्याची सरकारला शिफारस
केली होती. सुरक्षा यंत्रणांनी सरकारला पाठवलेल्या यादीमध्ये टिक-टॉकबरोबरच युसी ब्राऊझर,
एक्झेण्डर, शेअरइट, क्लीन मास्टर, हॅलो यासारख्या अॅप्सचा समावेश आहे. सामाजिक संदेश
वहनासह, कागद पत्र साक्षांकन, खेळ, मनोरंजनात्मक चित्रफिती, ॲप देवाण घेवाण, छायांकन
आदींसाठी या ॲप्सचा वापर होतो. भारताचं सार्वभौमत्व आणि एकात्मता, देशाची सुरक्षा आणि
जनहित लक्षात घेऊन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं असुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर
या ५९ चिनी अॅपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारनं जारी केलेल्या
पत्रकामध्ये म्हटलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज
दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयानं ट्विटर संदेशाद्वारे
ही माहिती दिली.
****
केंद्र आणि राज्य सरकारनं
टाळेबंदीची मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग
असलेल्या भागात टाळेबंदीची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. काल केंद्र आणि राज्य सरकारनं
याबाबतचे आदेश जारी केले. या आदेशाची उद्या १ जुलैपासून अंमलबजावणी होणार आहे. केंद्र
सरकारनं टाळेबंदी हटवण्याच्या दुसऱ्या टप्प्यातले मार्गदर्शक तत्त्व जारी करताना संसंर्ग
नसलेल्या भागात मोकळीक दिली आहे. यात अनेक व्यवहार टप्प्याटप्प्यानं सुरू करण्यात येणार
असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मेट्रो रेल्वे सेवा, चित्रपट
गृह, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क, थिएटर, बार, सभागृह, सामुदायिक सभागृह
आदी बंदच राहणार आहेत. सामाजिक, राजकीय, मनोरंजन, क्रीडा स्पर्धा, शैक्षणिक, सांस्कृतिक
आणि धार्मिक तसंच लोकांची गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी कायम आहे. संसर्ग नसलेल्या
भागात इतर सर्व व्यवहार सुरू करण्यास परवानगी असणार आहे. रात्रीची संचारबंदीची वेळ
१० ते पहाटे पाचपर्यंत करण्यात आली आहे.
राज्य सरकारनं जारी केलेल्या
आदेशात ‘मिशन बिगीन अगेन’च्या दुसऱ्या टप्प्याच्या आदेशात संसर्ग असलेल्या आणि नसलेल्या भागांसाठी
पहिल्या टप्प्यातले बहुतांश नियम कायम ठेवले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी
संबंधित जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त योग्य ती पाऊलं उचलत स्थानिक परिसरात निर्बंध
लागू करु शकतात असं राज्य सरकारनं या आदेशात म्हटलं आहे. संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक
गोष्टींना परवानगी नाकारण्याची तसंच लोकांच्या हालचालींवर मर्यादा आणण्याची परवानगीही
त्यांना देण्यात आली आहे.
टाळेबंदीच्या या काळात सार्वजनिक,
कामाच्या ठिकाणी आणि वाहतुकीच्यावेळी चेहऱ्यावर मास्क घालणं त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी
दोन व्यक्तींमध्ये सहा फुटाचं अंतर राखणं बंधनकारक आहे. दुकानात गेल्यानंतर ग्राहकांमध्ये
योग्य अंतर राखण्याची जबाबदारी दुकानदारांवर टाकण्यात आली असून एकाचवेळी पाचपेक्षा
जास्त लोकांना दुकानात जाण्यास परवानगी असणार नाही. सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी कायम
आहे, तर लग्न आणि अंत्यविधीसाठी केवळ ५० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी कायम आहे.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांविरूद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल,
विद्यापीठं, महाविद्यालयं,
शाळांची कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ई-सामग्रीचा विकास, उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन
आणि निकाल जाहीर करणे आदी कामे करता येतील.
याशिवाय आंतर जिल्हा बस वाहतूक
बंद राहील, मात्र जिल्हातर्गंत बस वाहतूक प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह सामाजिक
अंतर आणि सुरक्षेची काळजी घेऊन सुरू राहतील, असंही या आदेशात म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणुचा वाढता संसर्ग
लक्षात घेता औरंगाबाद जिल्ह्याच्या वाळूज औद्योगिक परिसरातल्या सात ग्रामपंचायतींच्या
हद्दीत येत्या ४ ते १२ जुलै दरम्यान संचारबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला
असल्याचं जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी काल वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं. यावेळी
महापालिका आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद उपस्थित होते.
या काळात जीवनावश्यक वस्तूंची किराणा आणि इतर दुकानेही बंद राहणार आहेत.
वाळूज म्हणजे बजाजनगर, रांजणगाव, पंढरपूर या सर्व
भागांमध्ये, इंडस्ट्रियल एरियामधे चार जुलैपासून ते १२ जुलैपर्यंत total curfew या
ठिकाणी जारी करत आहोत. Curfew दरम्यान फक्त दूध आणि मेडिकलचे source हेच फक्त open
असतील. हे आपण Mission Begin Again अंतर्गत जे industrial चक्र पुन्हा सुरू केलेलं
आहे, ते मात्र आपण या ठिकाणी थांबवू शकत नाही, ते तसंच चालू राहील. मात्र आपण ४ ते
१२ तारखेमधल्या curfew च्या अनुषंगाने सर्व उद्योगांना हे आवाहन करत आहे की जे जे उद्योग
कमीत कमी operation वर काम करू शकतात, त्यांनी तसं करावं. एक अजून महत्वाचा विषय म्हणजे
शहरातून वाळूजला जाणारी आणि वाळूजमधून शहरात होणारी movement ही ४ तारखेपासून ते १२
तारखेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. कारण की हा वाळूज क्षेत्रासाठी संपूर्ण curfew आपण
संयुक्तपणे याठिकाणी जारी करत आहोत.
दरम्यान, औरंगाबाद शहरात
जनजागृती करण्याचं तसंच येत्या दहा तारखेपर्यंत परिस्थितीचं निरीक्षण करण्याचा निर्णय
घेण्यात आला. या काळात जर रुग्ण संख्या नियंत्रणात आली नाही तर त्यानंतर शहरातही आवश्यकतेनुसार
संचारबंदी लावण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
टाळेबंदीची मुदत वाढवण्यात
आल्यामुळे, राज्य सरकार येत्या ३१ जुलैपर्यंत शेतकऱ्यांकडून २५ रुपये प्रति लीटर दरानं
दुध खरेदी सुरुच ठेवणार असल्याचं पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार
यांनी सांगितलं. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात
आल्याचं ते म्हणाले.
****
राज्यात काल पाच हजार २५७
नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर दिवसभरात १८१ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे
राज्यातल्या एकूण कोरोना विषाणू बाधितांची संख्या ही १ लाख ६९ हजार ८८३ इतकी झाली आहे.
राज्यात आतापर्यंत या आजारानं सात हजार ६१० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात
दोन हजार ३८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले. आतापर्यंत ८८ हजार ९६० रुग्ण बरे झाले आहेत.
सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल दहा
कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये उस्मानपुरा, जय भवानी नगर,
देवळाई, भावसिंगपुरा, कुंभारवाडा, सादाफ कॉलनी, शहागंज, संभाजी कॉलनी, जुना बाजार आणि
पळशी इथल्या रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात या विषाणू संसर्गामुळे मरण पावलेल्यांची
संख्या २५७ झाली आहे.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात
काल आणखी २४६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
पाच हजार २८३ इतकी झाली आहे. काल आढळलेल्या रुग्णांमध्ये महानगरपालिका क्षेत्रातले
१४३, तर ग्रामीण भागातले १०३ रुग्ण आहेत. तर औरंगाबाद जिल्ह्यात काल ११३ रुग्णांना
बरे झाल्यानं रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत दोन हजार ६६९ रुग्ण बरे झाले
असून, सध्या दोन हजार ३५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल नव्याने
आणखी ६ कोरोना विषाणू बाधीत रूग्ण आढळून आले. यात छत्रपती चौक, शिवाजीनगर, देगलूर नाका,
नविन कौठा, बाफना परिसर आणि मुखेड इथल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात
आता एकूण बाधित रूग्णांची संख्या ३७३ झाली आहे. दरम्यान, काल एका ५३ वर्षीय पुरूषाचा
उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या आजारामुळं मृत्यू पावलेल्या रूग्णांची एकूण
संख्या १७ झाली आहे. काल दोन रुग्णांना यशस्वी उपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात
आली. जिल्ह्यात आतापर्यंत २८१ रूग्ण बरे झाले आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल १७ कोरोनाविषाणू
बाधित रुग्णांची वाढ झाली. जिल्ह्यात आता कोरोना विषाणू बाधितांची एकूण संख्या ५२१
झाली आहे. यापैकी ३३६ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा उपचारादरम्यान
मृत्यू झाला असून, सध्या १७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल आणखी
१३ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. लातूर शहरातले दोन, औसा तालुक्यातले सहा,
उदगीर एक, आणि बिदर जिल्ह्यातल्या हुसनाल इथला एक रुग्ण आहे. लातूर जिल्ह्यातली एकूण
रुग्णसंख्या १७९ झाली आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल
आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद शहरातले तीन, तुळजापूर
आणि उमरगा तालुक्यातले प्रत्येकी दोन रुग्ण आहेत. त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण
रुग्णसंख्या २१७ झाली आहे. त्यापैकी १६८ रुग्ण बरे झाले असून, १० जणांचा मृत्यू झाला.
जिल्ह्यात सध्या ३९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल पाच रूग्णांचे
अहवाल कोरोना विषाणू बाधित आले आहेत. यातील तीन रूग्ण आष्टी तालुक्यातले तर दोन रूग्ण
बीड शहरातले आहेत. यामुळे बीड जिल्ह्यातली रुग्णसंख्या आता १२१ झाली असून यापैकी १०४
रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी गेले आहेत तर तर एकूण तीन रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या १४ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी
चार कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. केंद्रा बुद्रुक इथले दोन, वसमत आणि अंधारवाडी
इथला प्रत्येकी एक रुग्ण आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या २७० झाली आहे.
त्यापैकी २३८ रुग्ण बरे झाले असून, सध्या ३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल ४ व्यक्तींचा
अहवाल कोरोना विषाणू बाधित आला आहे. यामध्ये परभणी तालुक्यातल्या झरी इथल्या ३ जणांचा
तर परभणी शहरातल्या एकाचा समावेश आहे. या दोन्ही ठिकाणांना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून
घोषित करण्यात आलं आहे. काल वाढलेल्या रुग्णांमुळे परभणी जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या
११३ झाली असून यातील ९१ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले आहेत. तर ४ जणांचा मृत्यू झाला
आहे.
****
मुंबईत काल एक हजार २४७ नवे
कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ९२ जणांचा मृत्यू झाला. पुणे जिल्ह्यात काल ८३३
नवे रुग्ण, तर १२ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात आणखी १८२ रुग्ण आढळले, तर नऊ
बाधितांचा मृत्यू झाला. रायगड जिल्ह्यात २३४, जळगाव १७०, सोलाप्यर ३१, तर सांगली जिल्ह्यात
काल आणखी दहा रुग्ण आढळले.
****
लातूर शहरात कोविड प्रतिबंधाचे
नियम न पाळणऱ्या ५२ जणांवर काल दंडात्मक कारवाई करण्यात आली. मास्क न वापरता फिरणारे
लोक तसंच ग्राहकांना उपाहारगृहात बसवणाऱ्या उपहारगृह चालकांचा यात समावेश आहे. नंदी स्टॉप आणि अंबाजोगाई रोड या भागात महानगरपालिका
आणि पोलिस प्रशासनानं ही कारवाई केली.
****
वीज देयक आकारणीत अधिक पारदर्शकता
आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचं ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा
उभारावी, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगानं वीज कंपन्यांना दिले आहेत.
वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयकं मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत आयोगानं
हे निर्देश दिले आहेत. तक्रार प्राप्त झाल्यापासून एक दिवसाच्या आत त्याला प्रतिसाद
द्यावा; ज्या ग्राहकांना वीज देयक मार्च ते मे या कालावधीसाठीच्या सरासरी देयकाच्या
दुप्पट आहे, अशा ग्राहकांना देयकांचा भरणा मासिक हप्त्यांमध्ये भरण्याचा पर्याय द्यावा,
देयकासंबंधातल्या ग्राहकाच्या तक्रारींचं निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत
करण्यात येऊ नये असे निर्देशही आयोगानं दिले आहेत. जर ग्राहकाचे समाधान झाले नाही तर
ग्राहकाला गाऱ्हाणे निवारण मंच आणि विद्युत लोकपाल यांच्याकडे दाद मागण्याचा पर्याय
उपलब्ध असल्याचं, आयोगानं स्पष्ट केलं आहे.
****
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते उद्या पहाटे तीन वाजता
विठ्ठल रुख्माईची शासकीय महापुजा केली जाणार आहे. यासाठी आज ते पंढरपूरला पोहोचणार
आहेत. यंदा कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारी रद्द करण्यात
आली आहे. मानाच्या पादुका आणि पालख्या आज रात्रीपर्यंत वाहनाने पंढरपूरमध्ये दाखल होणार
आहेत.
दरम्यान, आषाढी वारीच्या
पार्श्वभूमीवर पंढरपूर इथं आजपासून दोन जुलैच्या
रात्री १२ वाजे पर्यंत कडक संचारबंदी
लागू करण्यात आली आहे. पंढरपूर शहर आणि १० किमी अंतरावरील गावांमध्ये ही संचारबंदी
लागू करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी ही माहिती दिली. सर्वसामान्य
नागरिकांनी तसंच वारकऱ्यांनी पंढरपूरला येऊ नये असं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे.
****
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात
काल लीटरमागे अनुक्रमे पाच पैसे आणि १३ पैशांनी वाढ झाली. गेल्या तेवीस दिवसांपासून
पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
दरम्यान, या पेट्रोल आणि
डिझेलच्या दरवाढी विरोधात कॉंग्रेस पक्षानं काल राज्यभरात आंदोलन केलं. टाळेबंदीमुळे
आर्थिक स्थिती नाजुक असलेल्या सर्वसामान्यांना पेट्रोल डिझेलच्या किमती कमी करून दिलासा
द्यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर
थोरात तसंच ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी
ते बोलत होते. थोरात यांनी पुण्यातही या आंदोलनाचं नेतृत्व केलं.
औरंगाबाद, नाशिक, सातारा,
धुळे, गडचिरोली, चंद्रपूर, सांगली तसंच परभणी, इथंही कॉंग्रेस पक्षानं आंदोलन केलं.
औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. यावेळी मागण्यांचं निवेदन उपजिल्हाधिकारी रिता
मेत्रेवार यांना देण्यात आलं. जिल्हा काँग्रेस अध्यक्ष कल्याण काळे, शहराध्यक्ष हिशाम
उस्मानी यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. सातारा इथं माजी
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर धुळे इथं जिल्हा माजी मंत्री रोहिदास पाटील
यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं.
परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर
निदर्शनं करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रशासनाला पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं. नांदेडमध्ये
पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं.
****
लातूर ते जहीराबाद राष्ट्रीय
महामार्गाच्या कामात गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे निर्देश पालकमंत्री अमित
देशमुख यांनी दिले आहेत. लातूर इथं राष्ट्रीय महामार्ग कामाच्या आढावा बैठकीत ते बोलत
होते. सुमारे ६५ किलो मीटरच्या राष्ट्रीय महामार्गापैकी ३० तीस किलोमीटर अंतराचं काम
पूर्ण झालं असून पुढील वर्षी मे पर्यंत काम पूर्ण होऊन हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला
होईल असं राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता जाधव यांनी सांगितलं.
****
परभणी शहरात मास्क न लावता
फिरणाऱ्या ११३ नागरीकांविरूद्ध कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ११ हजार ३०० रुपये
दंड वसूल करण्यात आला असल्याचं महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी सांगितलं.
****
परभणी जिल्ह्यात पूर्णा इथल्या
तहसील कार्यालयानं, जप्त केलेली वाळू शासनाच्या विविध घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना
स्वस्त दरात देण्याचा उपक्रम राबवला आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी
–
जप्त करण्यात आलेल्या रेतीच्या साठ्यातून घरकुल योजनेतील
लाभार्थ्यांना माफक दरात दोन बरास रेती देण्याचे कसब साधले आहे पूर्णा प्रशासनाने.
यासंदर्भात तहसीलदार वंदना म्हस्के म्हणाल्या “रमाई आणि पंतप्रधान आवास योजनेतील घरकुल
लाभार्थ्यांकडून बांधकामासाठी रेतीची मागणी वाढू लागली. त्यानुसार पूर्णा नगर परिषद
आणि पंचायत समितीकडून लाभार्थ्यांच्या याद्या मागविण्यात आल्या. प्रतिक्षा यादीनुसार
५३ लाभार्थ्यांना प्रत्येक लाभार्थी दोन ब्रास रेती देण्यात आली.” पूर्णा महसूल प्रशासनाप्रमाणे
अन्य तालुका प्रशासनाने पुढाकार घेतल्यास घरकुल लाभार्थ्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण
होईल. आकाशवाणी बातम्यांसाठी परभणीहून विनोद कापसीकर.
****
युरिया खताची कृत्रिम टंचाई
दूर करण्याची मागणी परभणीतल्या दबाव गटानं उपजिल्हाधिकाऱ्याकडे एका निवेदनाद्वारे केली
आहे. बोगस बियांणांमुळं बियाणांची उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट
निर्माण झालं असून यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळं कृत्रिम टंचाईबाबतची
सखोल चौकशी करून संबंधित कंपन्या आणि विक्रेत्यांविरूद्ध फौजदारी स्वरूपाची कारवाई
करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
****
उस्मानाबादसह राज्यातल्या
वाशिम, गडचिरोली आणि नंदुरबार जिल्ह्यात प्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियान राबवण्याची
मागणी आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी केली आहे. टाळेबंदीमुळं हातचा रोजगार गेल्यानं
जिल्ह्यात आजतागायत एक लाखाहून अधिक मजूर आणि ग्रामीण नागरिकांनी स्थलांतर केले असून
रोज त्यात भर पडत आहे. जिल्ह्यात अशा नागरिकांच्या रोजगाराचा आणि चरितार्थाचा प्रश्न
गंभीर बनला असल्यानं हे अभियान राबवावं अशी मागणी पाटील यांनी केली आहे.
****
औरंगाबाद शहरात दिव्य मराठी
या दैनिकाचे प्रकाशक, संपादक आणि पत्रकार यांच्याविरोधात दाखल गुन्ह्याचा निषेध म्हणून
उस्मानाबाद जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याला निवेदन सादर केलं. पत्रकारांना आता
घटनाकारांनीच न्याय द्यावा, अशी मागणी पत्रकार संघाच्या वतीनं करण्यात आली. औरंगाबाद
शहरात कोविड प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती, रुग्ण संख्या, तसंच या संसर्गामुळे
झालेले मृत्यू याबाबत या दैनिकानं वृत्त प्रकाशित केलं होतं.
****
राज्यात अनेक भागात काल जोरदार
पाऊस झाला. औरंगाबाद शहर आणि परिसरात काल संध्याकाळी आणि रात्री मुसळधार पाऊस झाला.
शहरातल्या सखल भागात पाण साचलं. जिल्ह्यातल्या फुलंब्री, गंगापूर, खुताबाद या तालुक्यांमध्येही
चांगला पाऊस झाला. त्यामुळे नदी, नाले, ओढे दुथडी भरुन वाहत आहेत.
उस्मानाबाद तालुक्यातल्या
कसबे तडवळे परिसरात जोरदार पाऊस झाल्यानं खामसवाडी ते कसबे तडवळेदरम्यान नदीच्या पुलावरुन
पाणी वाहू लागलं. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी
सात वाजता मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे नर्सी इथल्या गोमती नदीवरील पर्यायी पूल
वाहून गेल्यानं हिंगोली - सेनगाव संपर्क तुटल्यानं
वाहतूक ठप्प झाली आहे.
परभणी जिल्ह्यात पूर्णा,
जिंतूर, मानवतसह गंगाखेड तालुक्यात काल संध्याकाळी जोरदार पाऊस झाला.
सांगली जिल्ह्यातही काल दुपारी
जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातल्या तासगांव, खानापूर, आटपाडी, कवठे महांकाळ तालुक्यात
हा पाऊस पडला आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात मध्यरात्री मध्यम स्वरूपाचा
पाऊस झाला.
****
उस्मानाबाद जिल्हा पोलीस
कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीनं मुख्यमंत्री मदत निधीसाठी ५१ हजार रुपयांचा धनादेश
देण्यात आला. जिल्हाधिकारी दीपा मुंडे-मुधोळ यांच्याकडे काल हा धनादेश सुपूर्द करण्यात
आला.
****
नांदेड जिल्ह्यात सोयाबिन
बियाण्यांची उगवण न झाल्याप्रकरणी इंदूरच्या एका कंपनीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात
आला आहे. मराठवाड्यातला हा पहिला गुन्हा नोंद झाल्याचं कृषी विभागानं सांगितलं. अनेक
शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या तक्रारीची दखल घेत वजिराबाद पोलिस ठाण्यात हा गुन्हा
नोंदवण्यात आला.
****
उस्मानाबाद इथल्या वंचित
बहुजन आघाडी शाखेच्यावतीनं तुळजापूर तालुक्यातल्या गरजू कुटुंबांना काल किराणा संचाचं
वाटप करण्यात आलं. यामध्ये दहा दिवस पुरेल अशा जीवनावश्यक वस्तुंचा समावेश आहे. टाळेबंदी
लागू झाल्यापासून सुरू असलेल्या या उपक्रमात आतापर्यंत १ हजार ७६६ गरजू कुटुंबाना हा
संच देण्यात आला आहे.
****
No comments:
Post a Comment