Wednesday, 2 December 2020

Text - आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 02.12.2020 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 December 2020

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक – ०२ डिसेंबर २०२० दुपारी १.०० वा.

****

केंद्र सरकारच्या सुधारीत कृषी कायद्यांच्या विरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी बैठक सुरु आहे. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर, वाणिज्य मंत्री पियुष गोयल या बैठकीला उपस्थित आहेत. सरकारनं काल शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार चर्चा करण्यास तयार असल्याचं सांगितलं.

****

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती उद्या तीन डिसेंबरला महाराष्ट्रात उग्र आंदोलन करणार आहे. समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितलं. संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसंच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत तीन डिसेंबर रोजी राजस्थानातल्या प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर भव्य मोर्चे काढून तथा ठिकठिकाणी रस्ता रोको करून शेतकऱ्यांचं हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे. या आंदोलनाला काँग्रेस पक्षानं पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट आधारभावाचं रास्त संरक्षण द्या, केंद्र सरकारनं केलेले तीन शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकरी विरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

****

देशात काल दिवसभरात ३६ हजार ६०४ नवे कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले, तर ५०१ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. देशातली एकूण रुग्णसंख्या ९४ लाख ९९ हजार ४१४ झाली आहे. देशात आतापर्यंत या विषाणू संसर्गानं एक लाख ३८ हजार १२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल ४१ हजार ९८५ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. देशात आतापर्यंत ८९ लाख ३२ हजार ८४७ रुग्ण बरे झाले असून, सध्या चार लाख २८ हजार ६४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल दहा लाख ९६ हजार ४५१ कोविड चाचण्या करण्यात आल्या, देशभरात आतापर्यंत १४ कोटी २४ लाख ४५ हजार ४९ चाचण्या करण्यात आल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं सांगितलं.

****

नियंत्रक आणि महालेखापाल - कॅगने जलयुक्त शिवार योजनेत सुधारणात्मक शिफारसी केलेल्या असताना राज्य सरकारनं ही योजनाच गुंडाळून टाकल्याचा आरोप भाजपाचे आमदार रणधीर सावरकर यांनी केला आहे. अकोला इथं वार्ताहरांशी बोलताना सावरकर यांनी, जे शेतकरी पूर्वी एक पीक घेत होते, ते आता या योजनेमुळे दोन पीकं घेतात, तसंच पाणी पुरवणाऱ्या टँकर्सची संख्या कमी झाल्याचं या अहवालात, नमूद असल्याचं सांगितलं. राज्यात २२ हजार ५८९ गावांत जलयुक्त शिवार योजनेची ६ लाख ४१ हजार ५६० कामं झाली, त्यापैकी फक्त १२० गावातली एक हजार १२८ म्हणजे शून्य पूर्णांक १७ शतांश टक्के कामंच कॅगने तपासली असल्याकडे सावरकर यांनी लक्ष वेधलं. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीतून सत्यच बाहेर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, या चौकशीचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी काहीही संबंध नसल्याचं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. या चौकशीतून सत्य काय ते कळेल, असं ते म्हणाले. या योजनेचं अपयश दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास सरकारकडून होत आहे, त्यामुळे या प्रकारच्या चौकशीचा फरक भाजपवर पडणार नाही, असं ते म्हणाले.

****

विधान परिषदेच्या तीन पदवीधर, दोन शिक्षक आणि एक स्थानिक प्राधिकारी मतदारसंघातल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या होणार आहे. या निवडणुकीसाठी काल सरासरी ६९ टक्के मतदान झालं. औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत ६१ पूर्णांक आठ दशांश टक्के मतदान झालं.

****

नांदेड जिल्ह्यात नववी ते बारावीच्या शाळा आजपासून एकदिवसआड सुरु झाल्या. जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी नियोजनाप्रमाणे खात्री करुन शाळा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. गर्दी टाळण्यासाठी इयत्ता दहावी आणि बारावीचे विद्यार्थीं सम तारखेला तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना विषम तारखेला शाळेत येण्याची सूचना करण्यात आली आहे.

****

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघानं हार्दिक पंड्याच्या ९२ आणि रविंद्र जडेजाच्या ६६ धावांच्या बळावर निर्धारित षटकात पाच बाद ३०२ धावा केल्या. कर्णधार विराट कोहलीनं ६३, शुभमन गीलनं ३३, शिखर धवननं १६, श्रेयस अय्यरनं १९, के एल राहुलनं पाच धावा केल्या. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतले पहिले दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघानं यापूर्वीच विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात टी ट्वेंटी तसंच कसोटी क्रिकेट मालिका होणार असून, पहिला टी ट्वेंटी सामना परवा चार तारखेला होणार आहे.

****

No comments: