Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 28
August 2022
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ ऑगस्ट २०२२ सायंकाळी
६.१०
****
·
तृणधान्याविषयी जागरूकता वाढवण्यासाठी लोकचळवळ उभारण्याचं पंतप्रधानांचं
आवाहन.
·
नाशिक इथं तोफखाना क्षेत्रात संशयास्पद ड्रोन प्रकरणी गुन्हा
दाखल.
·
परळी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात राख जमा करण्यासाठी स्फोटकं
वापरण्याच्या तयारीत असलेले तीन जण ताब्यात.
·
औरंगाबाद इथं नियोजित क्रीडा विद्यापीठाचं लवकरच भूमिपूजन-सहकार
मंत्री अतुल सावे.
आणि
·
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज सायंकाळी भारताची पाकिस्तानशी
लढत.
****
देशातील
जनतेमध्ये तृणधान्या विषयी जागरूकता वाढवण्याची गरज असून, त्यासाठी लोकचळवळ उभारण्याचं
आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रम
मालिकेच्या ९२ व्या भागात जनतेशी संवाद साधत होते. संयुक्त राष्ट्रांनी एक ठराव मंजूर
करून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. भारत हा जगातील
सर्वात मोठा तृणधान्य उत्पादक देश असून, देशाच्या विविध भागातल्या अन्नात तृणधान्यांचे
ज्वारी, बाजरी, नाचणी, वरी, राळे, कोडो, कुटकी, कुट्टू, असे विविध प्रकार पाहायला मिळतात,
याकडे लक्ष वेधताना, ऊर्जा तसंच जीवनसत्वांनी परिपूर्ण तृणधान्ये कुपोषणाशी लढण्यासाठी
उपयोगी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. कमी पाण्यात उत्पादन होणाऱ्या तृणधान्यांच्या
आरोग्य विषयक विविध वैशिष्ट्यांचा उल्लेख करत, शेतकऱ्यांनी तृणधान्यांची अधिकाधिक लागवड
करून त्याचा लाभ घेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. तृणधान्यावर प्रक्रिया उद्योग
उभारलेल्या स्टार्ट-अपस्चं पंतप्रधानांनी कौतुक केलं.
आगामी
सणासुदीच्या काळात तृणधान्यांपासून शिजवलेल्या पक्वान्नांची छायाचित्रं सोशल मीडियावर
प्रदर्शित करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं. दूरदर्शनवरून प्रसारित होणारी स्वराज
मालिका आवर्जून पाहण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना केलं.
डिजिटल
इंडिया, इंटरनेट सुविधा, पोषण मास, अमृत सरोवर, जल संरक्षण आदी मुद्यांवरही पंतप्रधानांनी
संवाद साधला. मेजर ध्यानचंद यांची जयंती -राष्ट्रीय क्रीडा दिन, गणेशोत्सव, ओणम, जैन
धर्मियांचं संवत्सर पर्व, या निमित्ताने पंतप्रधानांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
गुजरातमध्ये
भूज इथं उभारण्यात आलेल्या देशातल्या पहिल्या भूकंप संग्रहालयाचं लोकार्पण पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं. ‘स्मृतीवन’ असं या संग्रहालयाचं नाव असून संग्रहालयात
भूजमधे जानेवारी २००१ मधे झालेल्या भूकंपाच्या स्मृती जतन केलेल्या आहेत.
****
नाशिकमधील
प्रतिबंधित तोफखाना क्षेत्रात लष्कराच्या जवानांना काल रात्री घिरट्या घालतांना ड्रोन
आढळले. यासंदर्भात प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडविल्याबद्दल अज्ञात व्यक्ती विरुद्ध
नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन महिन्यांपूर्वीच नाशिकच्या
पोलीस आयुक्तालयाकडून शहरातील ‘नो ड्रोन फ्लाईग झोन’ घोषित करण्यात आले आहेत. त्यानंतर
विना परवानगी ड्रोन आणि तेही प्रतिबंधित क्षेत्रात उडविल्याबद्दल नाशिक पोलिसांनी गंभीर
दखल घेतली आहे.
****
परळी
औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील राखतळ्यातून राख जमा करण्यासाठी स्फोटकं वापरण्याच्या
तयारीत असलेल्या तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वीज निर्मिती केंद्राच्या सुरक्षा
व्यवस्थापकाने सतर्कता दाखवत या तिघांना ताब्यात घेऊन ग्रामीण पोलिसांच्या हवाली केलं.
मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी अधिक माहिती देत, यामुळे परळी औष्णिक वीज निर्मिती
केंद्रास काही धोका नसल्याचा खुलासा केला आहे.
****
औरंगाबादमध्ये
नियोजित क्रीडा विद्यापीठाचं भुमीपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र
फडवणीस यांच्या हस्ते लवकरच होणार असल्याचं आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिलं
आहे. राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या अनुषंगानं आज औरंगाबाद इथं जिल्हा ऑलिम्पिक संघटनेचा
तिसरा जीवन गौरव पुरस्कार खो खो चे ज्येष्ठ संघटक रमेश भंडारी यांना मंत्री अतुल सावे
यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवछत्रपती पुरस्कार विजेते
आणि अर्जुन पुरस्कार विजेते नौकानयनपटू दत्तू भोकनळ यावेळी उपस्थित होते. खेळाडूंनी
पायाभूत सुविधा नाहीत म्हणून रडत बसण्यापेक्षा परिस्थितीवर मात करत आपलं ध्येय गाठण्याचं
आवाहन भोकनळ यांनी केलं. यावेळी जिल्हाभरातील विविध राष्ट्रीय आणि आतंराष्ट्रीय पातळीवर
कामगिरी केलेले खेळाडू आणि आदर्श क्रीडा शिक्षकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार
देवून गौरवण्यात आलं.
****
चंद्रपूर
इथले प्रसिद्ध जलयोग साधक कृष्णाजी नागपुरे यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस्मध्ये नोंद
करण्यात आली आहे. चंद्रपूर इथल्या जलतरण तलावात नागपुरे यांनी आज जलयोगाची प्रात्यक्षिके
सादर केली. कृष्णाजी नागपुरे हे जलयोग करणारे सर्वाधिक वयाचे व्यक्ती ठरले आहेत. ३७
प्रकारच्या योगासनांचं आणि योगमुद्रांचं ३७ मिनिटात सादरीकरण करून आपलं नाव त्यांनी
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद केलं.
****
देशात
कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २११ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल २६ लाख
५३ हजारांहून अधिक नागरीकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या २११ कोटी ६६
लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या आहेत.
आरोग्य
मत्रांलयानं २०१ कोटीं २१ लाखांहून अधिक कोविड प्रतिबंधक लसी राज्य आणि केंद्रशासित
प्रदेशांना आतापर्यंत मोफत उपलब्ध करुन दिल्या आहेत. यापैकी ६ कोटी २९ लाखांहून अधिक
मात्रा शिल्लक असल्याचं मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे.
****
आशिया
चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर
संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरु होईल. आकाशवाणीवरुन या सामन्याचं धावतं समालोचन
हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रसारित होणार आहे.
****
कचरा
व्यवस्थापनाचा एक आदर्श नमुना म्हणून लातूर जिल्ह्याची राज्यात ओळख होईल असा विश्वास
नगर परिषद प्रशासनाचे सह आयुक्त रामदास कोकरे यांनी व्यक्त केला आहे. लातूर जिल्ह्यातल्या
सर्व नगर पंचायतींमध्ये जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या सूचनेनुसार कचरा विघटन
प्रक्रिया सुरु झाली आहे, त्या पार्श्वभूमीवर कोकरे बोलत होते. कोकरे यांनी प्रत्येक
नगर पंचायतीत विघटन प्रक्रियेचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं आहे. औसा नगरपालिकेकडून
आज घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक बंदी सप्ताह अंतर्गत दहा पथका मार्फत संपूर्ण शहरात
१०० टक्के कचरा विलगीकरण करून, बसस्टॅन्ड ते कचरा डेपो पर्यंत भव्य जनजागृती फेरी काढण्यात
आली
****
लेखक,
कलावंतांनी सतत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरला पाहिजे असं मत ज्येष्ठ साहित्यिक
तथा समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. आज औरंगाबाद इथं, संस्कार भारतीच्या
एक दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्धाटन रसाळ यांच्या हस्ते झालं. त्यावेळी ते बोलत होते.
भयमुक्त असा लेखक, कलावंत, विचारवंताचा वर्ग या देशामध्ये निर्माण होण्यासाठी साहित्यसंस्थांनी
पुढाकार घेण्याचं आवाहन डॉ.सुधीर रसाळ यांनी यावेळी केलं. भरत लोळगे यांनी अध्यक्षीय
समारोपात कला व्यक्तीला सुसंस्कृत आणि परिपूर्ण करते ती व्यक्तीला क्षणिक सुख नाही
तर खरी शांती आणि खरा आनंद प्रदान करत असल्याचं यावेळी म्हटलं. परिसंवाद, काव्यसंमेलन,
मुलाखत असे विविध कार्यक्रम संमेलनात घेण्यात आले.
****
साहित्यरत्न
अण्णाभाऊ साठे यांनी मानवी मूल्यांसाठी संघर्ष केला, ती मूल्य समाजाने जोपासायला हवीत,
असं विधीज्ञ वैशाली डोळस यांनी म्हटलं आहे. लहुजी साळवे कर्मचारी महासंघ आणि परिवर्तन
ग्रूपच्या विद्यमानं अण्णाभाऊ साठे यांच्या १०२ व्या जयंतीनिमित्त काल औरंगाबाद इथं
अभिवादन सभा घेण्यात आली, यावेळी केलेल्या भाषणात विधीज्ञ डोळस यांनी, अण्णाभाऊ यांच्या
कार्याला उजाळा दिला.
****
सार्वजनिक
गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव मंडळांनी सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत
वीजजोडणी घ्यावी, असं आवाहन वीज महावितरण कंपनीनं केलं आहे. यासाठी मंडळांना घरगुती
ग्राहकांप्रमाणे वीज दर आकारला जाणार आहे.
****
No comments:
Post a Comment