Regional
Marathi Text Bulletin, Chhatrapati
Sambhajinagar
Date: 22 September
2024
Time: 11.00 to
11.05 AM
Language
Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
क्वाड समुहाच्या शिखर परिषदेसाठी अमेरिका दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि जपानचे संबंध अधिक मजबुत करण्याविषयी यावेळी चर्चा झाली. त्यानंतर मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बानीज यांची भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये हिंद-प्रशांत परिसरात शांतता, स्थैर्य आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करण्याविषयी चर्चा झाली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बनीज म्हणाले, पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेली चर्चा ही दोन्ही देशांसाठी उपयोगी ठरली आहे.
****
श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पदासाठी काल झालेल्या मतदानानंतर लागलीच मतमोजणीला सुरुवात झाली आहे. या मतमोजणीमध्ये नॅशनल पिपल्स पॉवर म्हणजेच एनपीपी पक्षाचे उमेदवार अनुरा कुमारा दिसानायके यांनी मोठी आघाडी घेतल्याचं वृत्त आहे. आज सकाळपर्यंत झालेल्या मतमोजणीत त्यांना ५६ टक्के मते मिळाली आहेत. त्यांचे प्रतिस्पर्धी विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि साजिथ प्रेमदासा यांना प्रत्येकी १९ टक्के मते मिळाली आहेत. दरम्यान, देशात मतमोजणी होईपर्यंत संचरबंदी लागू करण्यात आली आहे.
****
मराठा आरक्षण
आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांचं जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाच
दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज जालना, परभणी जिल्ह्यात सकल मराठा
समाजाच्या वतीने बंदचं अवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, कालही धाराशिव आणि बीड जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता. तर उद्या सोमवारी लातूर जिल्हा बंदच अवाहन करण्यात आलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिक स्थानिक स्वराज्य मतदार संघाचे माजी आमदार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात नाशिक इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधान परिषदेचे सदस्य नसतांनाही विद्यमान
आमदार असल्याचं पत्र शासकीय कार्यालयांना दिले, अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबादास खैरे
यांनी केली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अजित पवार
यांच्या पक्षाला घड्याळ्याच्या ऐवजी नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी
शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे. घड्याळ हे
मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचं पक्षचिन्ह आहे. पण आता पक्ष कोणाचा हा मुद्दा
न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावेळी आम्हाला
तुतारी हे नवीन चिन्ह दिलं त्याचप्रमाणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी
काँग्रेसलाही नवीन चिन्ह द्यावं, अशी मागणी या
याचिकेत केल्याचं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. यापूर्वीही अनेकदा ही मागणी
केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज या दोन्ही पालखी मार्गावर सुमारे ४२ हजार झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. काल पुणे इथं श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाट -हडपसर मार्गाचं चौपदरीकरण आणि विविध विकास कामांच्या भुमीपुजन गडकरी त्यावेळी बोलत होते.
****
राज्यातली
ढासळती कायदा आणि सुव्यवस्था, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं
नुकसान आदी मागण्या घेऊन काँग्रेसच्या शिष्टमंडळाने
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची काल भेट
घेतली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी
पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधीमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब
थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना
पटोले यांचा या शिष्टमंडळात
समावेश होता.
****
रेल्वे रूळांच्या पाहणी आणि दुरूस्तीसाठी लाईन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे दौंड निजामाबाद ही गाडी उद्या मुदखेड ते निजामाबाद दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तर परवा निजामाबाद इथून निघणारी निजामाबाद पंढरपूर ही गाडी निजामाबाद ऐवजी मुदखेड इथून निघणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती कळवली आहे.
****
कांद्याची प्रमुख
बाजारपेठ असलेल्या नाशिकच्या कांद्याची आता पुन्हा नाशिक रोड आणि लासलगाव इंथल्या
रेल्वेस्थानकातून निर्यात होणार आहे. त्यासाठी रेल्वे मालवाहु डब्बे उपलब्ध
करून देण्याचं आश्वासन रेल्वेचे मुख्य वाणिज्य व्यवस्थापक अरविंद मलखेडे आणि
भुसावळ रेल्वे विभागाचे वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक अजय कुमार यांनी दिलं आहे. या संदर्भात
काल
नाशिक इथं जिल्ह्यातल्या
कांदा व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींशी त्यांनी बैठक
घेतली. दरम्यान, मालखेडे
यांनी नाशिक, लासलगाव आणि कसबेसुकेणे इथं
रेल्वे स्थानकाची पाहणी करून निर्यातीसाठी व्यापाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून
घेतल्या.
****
चेन्नई इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या आज चौथ्या दिवशी बांगलादेश संघाने आपल्या दुसऱ्या डावात शेवटचं वृत्त हाती आलं तेंव्हा ६ बाद २०५ धावा केल्या आहेत. त्याआधी भारतानं आपला दुसरा डाव चार बाद २८७ धावांवर घोषित करत बांदलादेशाला ५१५ धावाचं लक्ष दिलं होतं.
****
No comments:
Post a Comment