Friday, 27 December 2024

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 27.12.2024 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 27 December 2024

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – २७ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०

****

·      माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

·      राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह अनेक मान्यवरांकडून डॉ सिंग यांना श्रद्धांजली अर्पण

·      देश का प्रकृती परीक्षण अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर

आणि

·      महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा ३-० असा निर्भेळ विजय

****

माजी पंतप्रधान डॉ मनमोहनसिंह यांच्या पार्थिव देहावर उद्या पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉ सिंग यांचा पार्थिव देह उद्या सकाळी त्यांच्या निवासस्थानाहून काँग्रेस मुख्यालयात आणण्यात येईल, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांना त्या ठिकाणी डॉ सिंग यांचं अंत्यदर्शन घेता येईल. सकाळी साडे नऊच्या सुमारास काँग्रेस मुख्यालयातूनच डॉ सिंग यांची अंत्ययात्रा निघेल, असं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री तसंच केंद्रीय मंत्रिमंडळातल्या अनेक सदस्यांनी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली, तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं.

देशसेवा, निष्कलंक राजकीय जीवन आणि कमालीची नम्रता या स्वभावगुणविशेषांमुळे डॉ सिंग नेहमीच स्मरणात राहतील, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमोहनसिंग यांच्या कार्याला उजाळा देत, त्यांच्या निधनानं देशाचं मोठं नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी केलेलं कार्य आगामी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, असं पंतप्रधान आपल्या शोकसंदेशात म्हणाले.

 

एक नेक इंसान के रूप में, एक विद्वान अर्थशास्त्री के रूप में,और रिफॉर्म्स के प्रति समर्पित लीडर के रूप में, उन्हे हमेशा याद किया जाएगा एक अर्थशास्त्री के रूप में उन्होने अलग अलग स्तर पर भारत सरकार में अनेक सेवांएं दी एक चुनौती  पूर्ण समय में उन्होने, रिझर्व बँक के गव्हर्नर की भूमिका निभाई पूर्व प्रधानमंत्री, भारत रत्न श्री पीवी नरसिम्हा राव जी की सरकार के वित्तमंत्री रहते हुए उन्होने वित्तीय संकट से घिरे देश को एक नयी अर्थव्यवस्था के मार्ग पर प्रशस्त किया

 

फाळणीचा कटू अनुभव गाठीशी घेऊन भारतात आलेल्या सर्वसामान्य कुटुंबातला एक किशोरवयीन मुलगा, आपल्या प्रज्ञेच्या बळावर अर्थशास्त्रासारख्या क्लिष्ट विषयात पारंगत होतो, देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी ऊर्जा देतो आणि पंतप्रधानाच्या रुपात दहा वर्ष देशाचा कारभार सांभाळतो, ही काही सामान्य कामगिरी नाही. डॉ मनमोहनसिंह त्यामुळेच असामान्य ठरतात. प्रतिकुल परिस्थितीतही प्रगतीच्या वाटेवर अग्रेसर राहणाऱ्या आपल्या देशाबद्दल बोलतांना ते राज्यसभेतल्या एका भाषणात म्हणाले होते..

 

यूनान मिश्र रोमां सब मिट गए जहां से

अब तक मगर है बाकीं नामों निशा हमारा।

कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी

सदियों रहा है दुश्मन दौर- ए- जमा हमारा’।।

 

मनमोहनसिंग यांच्या दुसऱ्या कार्यकाळात केंद्र सरकारवर अनेक आरोप झाले, अनेकांनी टीका केली. मात्र मृदुभाषी, मितभाषी असलेले डॉ सिंग यांनी अशा आरोपांना किंवा टीकेला उत्तर न देणं पसंत केलं. संसदेच्या एका अधिवेशन काळात लोकसभेतल्या वादळी चर्चेनंतर बाहेर आलेल्या डॉ सिंग यांनी पत्रकारांच्या या संदर्भातल्या प्रश्नाला या शब्दांत उत्तर दिलं...

 

हजारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी,

जो कई सवालों की आबरू ढक लेती है

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, डॉ सिंग यांच्या अशाच स्मृतिंना उजाळा देत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली...

 

देश में मनमोहन सिंग जी की एक अपनी छबी रही है एक अर्थशास्त्री के रूप में उसके बाद एक रिझर्व बँक गव्हर्नर के रूप में। वित्त सचिव के ग्रुप में मंत्री के रूप में। प्रधानमंत्री के रूप में। उन्होंने अपने कर्तव्यों का बहुत अच्छी रह से निर्वहन करने का प्रयास किया है मै उनको विनम्र श्रद्धांजली अर्पण करता हूं। और उनका जो परिवार है, उस परिवार के दुख मे हम सभी रोग शामील है

 

राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. विनम्रता, सौजन्य आणि विद्वत्तेसाठी ओळखले जाणारे डॉ सिंग यांनी, आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांमधून संसदेतील चर्चांचा स्तर उंचावला. त्यांच्या निधनामुळे देशानं जागतिक ख्याती लाभलेले अर्थतज्ज्ञ, संसदपटू आणि विद्वान व्यक्तिमत्व गमावलं, असं राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे.

****

माजी कृषिमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज मुंबईत राजभवन इथं त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. पर्यावरण, वातावरणीय बदल आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी, मंत्रालयात देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी राज्यमंत्री इंद्रनील नाईक, मुख्य सचिव सुजाता सौनिक, यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

परभणी इथं जिल्हाधिकारी कार्यालयात देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.

****

भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने घेण्यात येत असलेल्या देश का प्रकृती परीक्षण या अभियानात छत्रपती संभाजीनगर जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २० हजाराहून अधिक परीक्षण नोंदवण्यात आल्याचं या बाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुर्वेद-युनानी दवाखाने आणि आरोग्यवर्धिनी केंद्रातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आयुष वैद्यकीय अधिकाऱ्यांना या अभियानात सहभागी होण्यासाठी जिल्हा आयुष कक्षाने मार्गदर्शन केलं आहे. सर्वात जास्त ६४१ प्रकृती परीक्षण करणारे डॉ मोनम डव्हळे आणि ५३३ प्रकृती परीक्षण करणारे डॉ. परमेश्वर फालके यांचं जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अभय धानोरकर यांनी अभिनंदन केलं आहे.

****

जलजीवन मिशन अंतर्गत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठित करावी, तसंच या समितीने येत्या १० जानेवारीला प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची सद्यस्थिती पहावी, असे निर्देश छत्रपती संभाजीनगर जिल्हा विकास समन्वय आणि सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खासदार संदिपान भुमरे यांनी दिले आहेत. आज छत्रपती संभाजीनगर इथं दिशा समितीच्या बैठकीत भुमरे बोलत होते.

दरम्यान, जिल्हा विद्युत सल्लागार समितीच्या बैठकीला भुमरे यांनी मार्गदर्शन केलं. जिल्ह्यात ग्रामीण भागात विशेषतः शेतकऱ्यांसाठी होणाऱ्या वीज वितरणाच्या बळकटीकरणाला वेग द्यावा, असे निर्देश खासदार भुमरे यांनी यावेळी दिले.

****

सौर कृषीपंप योजनेच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर असून, डिसेंबर महिन्यात दररोज सरासरी ८४४ पंप राज्यात बसवण्यात आले आहेत. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. ही आतापर्यंतची कोणत्याही महिन्यातील सर्वाधिक सरासरी आहे, असं चंद्र यांनी सांगितलं. राज्यात साडेदहा लाख सौर कृषीपंप बसवण्याचे उद्दिष्ट निर्धारित करण्यात आलेलं आहे.

****

महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची आयसीसी चॅम्पियनशिप मालिका भारतीय संघाने ३-० अशी जिंकली आहे. आज वडोदरा इथं झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात, वेस्ट इंडिज संघाने दिलेलं १६३ धावांचं आव्हान भारतीय संघाने ५ खेळाडू गमावत २९ व्या षटकात पूर्ण केलं. दिप्ती शर्मा हिला सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून तर मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रेणुका ठाकूर सिंह हिला गौरवण्यात आलं.

****

बॉर्डर गावसकर मालिकेतल्या मेलबर्न क्रिकेट कसोटीत भारतानं पहिल्या डावात दुसऱ्या दिवस अखेर पाच बाद १६४ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघानं पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत. या कसोटीत भारत अजूनही ३१० धावांनी पिछाडीवर आहे. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.

****

गोंदिया इथं अंध मुला-मुलींच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेला आजपासून सुरवात झाली. या स्पर्धेत देशाच्या १५ राज्यातील ३०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतले देशातील पहिले अंध अधिकारी म्हणून नियुक्त झालेले राजेश सिंग यांनीही या सर्धेत सहभाग घेतला आहे. या स्पर्धेत अंतिम सामने उद्या खेळले जाणार आहेत.

****

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध नोंदवत लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं आज सकल मराठा समाजाच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी आणि मुलगा विराज देशमुख हे ही या मोर्चात सहभागी झाले. मोर्चानंतर रेणापूरच्या तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन देण्यात आलं.

****

लातूर जिल्ह्यामध्ये १६ ते २७ डिसेंबर या कालावधीत अतिजोखमीच्या भागात कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र - कुसुम हे अभियान राबवण्यात आलं. या अभियानात जिल्ह्यात १३ नवीन कुष्ठरुग्ण आढळले. या रुग्णांवर मोफत उपचार सुरु करण्यात आले आहेत

****

हवामान

छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे तसंच दिवसभरातही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

****

No comments: