आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
१९ डिसेंबर २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
राज्य विधीमंडळाचं आजपासून नागपूरमध्ये
हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या अधिवेशनात २३ विधेयके आणि पाच अध्यादेश मांडले जाणार आहेत.
****
देशभरात आजपासून सुशासन सप्ताह सुरु होत आहे.
यानिमित्त नवी दिल्लीत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते
पाच दिवसांच्या प्रशासन गाव की ओर या मोहिमेचं उद्घाटन होणार आहे.
****
देशात थेट करांच्या
एकंदर संकलनात सुमारे सव्वीस टक्के वाढ झाली आहे. सध्या ही रक्कम १३ लाख ६३ हजार कोटी
रुपयांहून अधिक आहे. थेट करांचं निव्वळ संकलन सुमारे वीस टक्क्यांवर आहे असं अर्थ मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीत म्हटलं आहे.
****
विज्ञान विषयक प्रकाशनांच्या बाबतीत भारतानं
जागतिक मानांकनात सातव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. केंद्रीय विज्ञान
आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्लीत विज्ञान तंत्रज्ञान विभागाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांसोबत
घेतलेल्या आढावा बैठकीनंतर ही माहिती दिली.
****
राज्य सरकारनं दिव्यांगांकरता सुधारीत
विकास धोरण राबवण्याचा आणि दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतल्यानं खऱ्या
अर्थानं दिव्यांगांचं पुनर्वसन होईल, असा विश्वास पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी
व्यक्त केला आहे. जळगाव इथं काल जिल्हास्तरीय
क्रीडा स्पर्धा आणि दिव्यांगांसाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान सोहळा झाला,
त्यावेळी ते बोलत होते.
****
पुणे इथल्या आरोग्य सेवा हिवताप, हत्तीरोग आणि जलजन्यरोग सहसंचालक कार्यालयातले किटकनाशक शास्त्रज्ञ डॉ. महेंद्र जगताप यांना डेंगू नियंत्रण आणि संशोधनासाठी
केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी डॉ. कल्पना बारूआ अॅवार्ड फॉर एक्सलन्स हा पुरस्कार
देऊन गौरवण्यात आलं. काल हैद्राबाद इथं १५ व्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत हा पुरस्कार
देण्यात आला.
****
जालना जिल्ह्यातल्या २५४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी काल
एकूण ८५ टक्के मतदान झालं. जिल्ह्यात सर्वाधिक ८७ टक्के मतदान भोकरदन तालुक्यात
झालं. जाफराबाद तालुक्यात ८६ टक्के, अंबड, मंठा आणि घनसावंगी तालुक्यात सरासरी ८४ टक्के,
तर परतूर आणि जालना तालुक्यात सरासरी ८३ टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे.
//*********//
No comments:
Post a Comment