Friday, 31 March 2017

Text - AIR News Bulletin, Aurangabad 31.03.2017 10.00pm


आकाशवाणी औरंगाबाद.

संक्षिप्त बातमीपत्र

३१ मार्च २०१७ सकाळी १०.०० वाजता

****

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयातून जुन्या पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा बदलण्यासाठीचा आजचा शेवटचा दिवस आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी केंद्र सरकारनं या नोटांवर बंदी घालून त्या चलनातून बाद केल्या होत्या.

****

राज्यातल्या प्रत्येक कुटुंबाला हक्काचा निवारा मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या एकत्रित सहभागातून महत्वाकांक्षी प्रधानमंत्री आवास योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतल्या प्रस्तावित प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करुन देणं, निविदा प्रकिया, प्रशासकीय मंजुऱ्या आदींची कामं निर्धारित वेळेत पूर्ण करुन योजनेला गती देण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांसह नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.  मंत्रालयात यासंदर्भात व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठल आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी ते बोलत होते. या योजनेसाठी निवडण्यात आलेल्या राज्यातल्या १४२ शहरांमधून प्रत्येकी किमान दोन प्रकल्प अहवाल एका महिन्याच्या आत सादर करण्यात यावेत, असं ते म्हणाले.

****

नांदेड ते मुगट दरम्यान आज सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही गाड्यांच्या वेळेत बदल झाला आहे. तर काही गाड्या अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत.

आदिलाबाद - नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस आज फक्त मुदखेड पर्यंतच धावेल. काचीगुडा - मनमाड पॅसेंजर निझामाबादहून दोन तास दहा मिनिटे उशीरा निघेल, तर मनमाड - काचीगुडा पॅसेंजर नांदेडहून २५ मिनिटे उशीरा सुटेल. काचीगुडा - नारखेड इंटर सिटी एक्स्प्रेस मुदखेडहून एक तास २५ मिनिटे तर नारखेड - काचीगुडा ही गाडी मालटेकडीहून १५ मिनिटे उशिरा सुटेल.

****

ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य नागरिकांसह महिलांनीही संघटीत होण्याबरोबरच कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन जालना जिल्ह्यातल्या भोकरदन विभागाचे उपविभागीय अधिकारी हरिशचंद्र गवळी यांनी केलं आहे. ग्रामस्थांसाठी आयोजित ग्रामसंवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन, कुक्कुटपालन, मधुमक्षिका पालन, रेशीम उद्योग हे किफायतशीर आणि शाश्वत नफा देणाऱ्या जोडधंद्यांना शासनामार्फत अनुदान देण्यात येत असून, शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

****

No comments: