Tuesday, 15 August 2017

Text-AIR News Bulletin, Aurangabad 15.08.2017 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 15 AUG. 2017

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १५ ऑगस्ट २०१ दुपारी १.००वा.

****

देशाचा एकाहत्तरावा स्वातंत्र्यदिन आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला. राजधानी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित केलं. यात त्यांनी विकास, काळा पैसा, काश्मिर प्रश्न, गोरखपूर इथल्या बालकांच्या मृत्युच्या घटनेसह न्यू इंडियाच्या संकल्पनेचा उल्लेख केला. न्यू इंडियासाठी हीच योग्य वेळ आहे. सर्वांना सोबत घेऊन नविन भारत घडवायचा आहे. ज्यात गरीबांकडे घर, वीज आणि पाणी उपलब्ध असेल. देशातील शेतकऱ्यांना चिंतेची नव्हे तर शांतपणे झोप मिळेल. त्याचं उत्पन्न दुप्पट होईल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला. काश्मीरचा प्रश्न बंदुकीच्या जोरावर सुटणार नसून, त्यासाठी चर्चा हाच पर्याय असल्याचं त्यांनी सांगितलं. आतापर्यंत देशात १ लाख २५ हजार कोटी रूपयांचा काळा पैसा सापडला. नोटांबदीनंतर बँकींग क्षेत्रात २ लाख २५ हजार कोटी रूपये जमा झाले. हवाल्याचं काम करणाऱ्या तीन लखांपैकी पावणेदोन लाख कंपन्यांची नोंदणी रद्द केली. एप्रिल ते ५ ऑगस्टपर्यंत ५६ लाख नवीन लोकांना कर परतावा दाखल केला. मागील वर्षी ही संख्या २२ लाख एवढी होती यातील १ लाख लोकांनी कधीही कर भरलेला नव्हता असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केला. वस्तु आणि सेवा करामुळे देशांच्या विकासाचा वेग वाढणार आहे. सामूहिक शक्ती, एकीचं बळ हीच आपली ताकद आहे. देशात सर्वजण समान आहेत. सामूहिक शक्तीच्या एकीतुनच समार्थ्यशाली, सुरक्षित आणि जगभरात दबदबा असणारा न्यू इंडिया असेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.

****

बीड इथं अतिरिक्त जिल्हाधिकारी अनिल पवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. या ध्वजारोहण कार्यक्रमा नंतर उपस्थित स्वातंत्र्य सैनिकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.... जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या घडी पुस्तिकेचं तसच अंकाचं विमोचन करण्यात आले . यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व्हि.डी.नीला , निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांची उपस्थिती होती.

****

स्मानाबाद इथं इथं पालकमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.

जिल्ह्यातल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी सन्मानित करण्यात आलं, उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात बसवण्यात आलेल्या संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन सात -बारा उतारे तसंच ई पोर्टल द्वारे सुविधा देणाऱ्या प्रणालीचं उद्घाटनही पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.

 जिल्ह्यातल्या ७४ हजार ४२० शेतकऱ्यांना राज्यशासनानं जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार असून, प्रोत्साहनपर योजनेअंतर्गत ८६ हजार ४३३ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याचं रावते यांनी यावेळी सांगितलं.

****

हिंगोली जिल्ह्याचं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते झालं.

जिल्ह्याचा सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी अनेक वर्षापासून करण्यात येणाऱ्या

पाठपूराव्याची दखल घेवून  राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी १५ हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष भरुन काढण्यासाठी मंजुरी दिली असल्याचं प्रतिपादन पालकमंत्र्यांनी केलं.

यासाठी जलसंपदा विभागानं १ हजार २00 कोटी तर जलसंधारण विभागानं

८00 कोटी असा एकूण २ हजार कोटी रुपयांचा भौतिक आणि आर्थिक नियोजनाचा प्रारुप आरखडा तयार केला असून, राज्य शासनानं नदी पुर्नजीवन कार्यक्रमातंर्गत कयाधु नदीवर सेनगाव तालूक्यात ७ सिमेंट नाला बांध

कामास मान्यता दिली असून याकरीता दीड कोटी रुपयांचा निधी  मंजूर केला असल्याची माहिती पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी दिली.

****

परभणी जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात झाला. संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी शेतकरी सुकाणू समितीच्या वतीनं यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. पोलीसांनी सौम्य लाठीमार करुन या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं.

****

लातूर इथं जिल्हा क्रिडा संकुल मैदानावर पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. जिल्हाधिकारी जी श्रीकांत, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ शिवाजी राठोड यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी पालकमंत्र्याना पोलीस दल, गृहरक्षक दल, राष्ट्रीय छात्र सेना आणि उदगीर इथल्या सैनिक शाळेतील विद्यार्थ्यानी मानवंदना दिली. जिल्ह्याच्या प्रगतीचा आढावा घेणारे चित्ररथ ही यावेळी मैदानावर ठेवण्यात आले होते.

शिष्यवृत्ती परिक्षेत राज्य पातळीवर यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि पोलीस दलात यशस्वी कामगिरी केलेल्या पोलिसांचा यावेळी पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात ‘स्वदेश’ या उपक्रमातून जिल्ह्यातील शाळांच्या विकासासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचा विशेष उल्लेखही पालकमंत्री निलंगेकर यांनी केला.

****




No comments:

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 01.06.2026 रोजीचे दुपारी 01.00 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 01 June 2026 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्...