Tuesday, 29 March 2022

Text: आकाशवाणी औरंगाबाद – दिनांक 29.03.2022 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 29 March 2022

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २९ मार्च २०२२ सकाळी ७.१० मि.

****

·      नवीन कामगार कायदा, खासगीकरण आदी मागण्यांसाठी देशभरातले कामगार दोन दिवसांच्या संपावर

·      राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचं खासगीकरण होऊ देणार नाही- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची ग्वाही

·      वीज कर्मचारी संघटनांसोबतची ऊर्जामंत्र्यांची आजची बैठक रद्द

·      राज्यात कोविड संसर्गाचे ११० तर मराठवाड्यात दोन नवे रुग्ण

·      ऊस गाळप आणि साखर उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर

आणि

·      बीडच्या काकू-नाना विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

****

केंद्र सरकारचा नवीन कामगार कायदा तसंच खासगीकरणाच्या धोरणाविरोधात बँक कर्मचारी आणि विद्युत विभागातल्या कर्मचाऱ्यांनी, कालपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन आणि कामगार संघटना संयुक्त कृती समितीनं, या संपाला पाठिंबा दिला आहे. कोळसा, लोखंड उद्योग, दूरसंचार क्षेत्र तसंच सार्वजनिक उद्योगातल्या कर्मचाऱ्यांनी या संपास उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याची माहिती, कृती समितीचे समन्वयक विश्वास उटगी यांनी मुंबईत दिली. वीज कायद्यात प्रस्तावित संशोधन, तसंच स्टँडर्ड बिलिंग डॉक्युमेंट आणि वीज वितरण फ्रँचायजी रद्द करावी, या मागण्यांसाठी विद्युत कर्मचारीही या संपात सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र विद्युत ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनीही या संपाला पूर्ण पाठिंबा असल्याचं जाहीर केलं आहे. संपामुळे अनेक राष्ट्रियीकृत बँका बंद राहिल्यानं ग्राहकांना त्रास सहन करावा लागला.

 

औरंगाबाद इथल्या भारतीय ट्रेड युनियन केंद्र - सीटू आणि आयटक अंतर्गत आशा, आणि गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार तसंच उमेद अभियानचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले. शहरातल्या क्रांती चौकात त्यांनी निदर्शनं केली. वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि कंत्राटी कामगारही या संपात सहभागी झाले. औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तसंच पैठण तालुक्यातही आंदोलन करण्यात आलं. आज ग्रामीण भागात १५ ते २० ठिकाणी देशव्यापी संपानिमित्त आयटकचं आंदोलन होणार असल्याची माहिती, कृती समितीचे कॉम्रेड राम बाहेती यांनी दिली.

 

परभणी इथं अखिल भारतीय टपाल कर्मचारी संघटनेच्या वतीनं शनिवार बाजारातल्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली.

दरम्यान, परभणी इथं जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेनं काल एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारल्यानं जिल्ह्यातल्या महसूल यंत्रणेचं कामकाज बहुतांशी ठप्प झालं होतं.

 

उस्मानाबाद इथं महसूल कर्मचारी संघटनेच्या गट क संवर्गातल्या कर्मचाऱ्यांनी काल लाक्षणिक संप पुकारला. यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात महसूल विभागातील कामकाज ठप्प झालं होतं. आंदोलकांनी आपल्या विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं. मागण्यांची दखल न घेतल्यास, येत्या चार एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

सोलापूर इथं ज्येष्ठ नेते माजी आमदार नरसय्या आडम आणि सिटूचे राज्य महासचिव एम.एच.शेख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट इथं धरणं आंदोलन करण्यात आलं.

पालघर इथं महावितरणच्या कार्यालयाबाहेर सर्व कर्मचाऱ्यांनी निदर्शनं केली. वाशिम इथं महावितरणच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.

****

राज्य वीज मंडळाच्या कुठल्याही कंपनीचं खासगीकरण होऊ देणार नाही, अशी ग्वाही ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली आहे. ते काल नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते. संपावर गेलेल्या २७ वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी राऊत यांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. ते म्हणाले...

 

Byte

विजेची मागणी सातत्याने वाढतेय २७ हजार मेगावॅटच्या वर विजेची मागणी गेलेली आहे. दहावी आणि बारावीची परिक्षा आहे. त्यांचा अभ्यास आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उभ पिक आहे. त्यांना मदत करावी म्हणून राज्याच्या विधानसभेत आपण तीन महिन्याची त्यांना सवलत दिलेली आहे. अशा या परिस्थितीमध्ये महावितरण सुद्धा आर्थिक संकटात आहे. अशा या अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये आपण राज्याला वेठीस धरु नये, आणि हा संप मागे घ्यावा अशी विनंती मी त्यांना केली. -  ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

 

 

दरम्यान, वीज कर्मचारी संघटनांसोबतची ठरलेली आजची बैठक रद्द करण्याचा निर्णय ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला आहे. संप मागे घेण्याचं आवाहन करूनही कर्मचारी संघटनांकडून प्रतिसाद न मिळाल्यानं हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी सांगितलं. मेस्माची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं ऊर्जामंत्री राऊत यांनी सांगितलं.

****

 

शिवसेनेच्या औरंगाबाद शाखेच्या वतीनं, पेट्रोल डिझेल गॅस दरवाढी विरोधात काल जन आक्रोश निषेध आंदोलन शहरातल्या प्रत्येक वार्डात तसंच चौकाचौकात करण्यात आलं. या आंदोलनात त्या त्या भागातले शिवसैनिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

जालना इथं काल गांधीचमन चौकात पेट्रोल आणि गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेच्यावतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं. शिवसेना नेते माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या नेतृत्त्वात हे आंदोलन करण्यात आलं. केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

****

कर्मचारी भविष्य निधी ईपीएफ योजनेअंतर्गत गेल्या वर्षी ३१ मार्चपर्यंत, ११ लाख ७२ हजार ९२३ निष्क्रिय खात्यांमध्ये तीन हजार ९०० कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला असल्याचं, केंद्र सरकारनं सांगितलं आहे. श्रम आणि रोजगार राज्य मंत्री रामेश्वर तेली यांनी लोकसभेत काल एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात ही माहीती दिली. चालू आर्थिक वर्षात या महिन्याच्या २२ तारखेपर्यंत, ५१ लाख ५४ हजारांहून अधिक भविष्य निधी प्रकरणं निकाली काढण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

****

राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ११० रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७३ हजार ६१९ झाली आहे. या संसर्गानं काल कोणाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची संख्या एक लाख ४७ हजार ७८० एवढी असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल ७२ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २४ हजार ८७५ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या ९६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

****

मराठवाड्यात काल बीड जिल्ह्यात दोन कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. औरंगाबाद, परभणी, नांदेड, उस्मानाबाद, जालना, हिंगोली तसंच लातूर जिल्ह्यात काल एकही नवा रुग्ण आढळला नाही.

 ****

यंदाच्या पद्म पुरस्कार प्रदान समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यातले पुरस्कार काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. शास्त्रीय गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना पद्मविभुषण, दिवंगत नेते कल्याणसिंह यांना मरणोत्तर पद्मविभुषण, भारत बायोटेकचे कृष्णा आणि सुचित्रा इल्ला, अभिनेता विक्टर बॅनर्जी, लेखक डॉ. प्रतिभा रे, यांना पद्मभुषण सन्मान प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध गायिका लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण, गायक सोनू निगम तसंच भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना, पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आले.

****

राज्यानं ऊस गाळप आणि साखर उत्पादनात यावर्षी देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. राज्यात आत्तापर्यंत ११ कोटी १२ लाख ३४ हजार मेट्रीक टन ऊस गाळप केलं. त्यामुळे ११ कोटी ५४ लाख १८ हजार क्विंटल साखर उत्पादन झालं. चालूवर्षी १० पूर्णांक ३८ शतांश टक्के साखर उतारा मिळाल्याची माहिती साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली. ते काल सांगलीत बोलत होते. या बाबतीत इतर राज्यांबरोबरच ऑस्ट्रेलिया, चीन, थायलँड आणि पाकिस्तान या देशानाही यंदा महाराष्ट्रानं मागे टाकलं आहे.

****

लातूर जिल्ह्यात फळबाग लागवडीला प्राध्यान्य द्यावं तसंच यासाठी कार्यशाळा घ्याव्या अशा सूचना, जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी दिल्या आहेत. लातूर इथं विविध विभागांच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. रमाई आवास योजनेचा त्यांनी यावेळी आढावा घेतला, तसंच वन नेशन वन रेशनकार्ड या योजनेची प्रभावी अमंलबजावनी करावी, अशी सूचना संबंधितांना दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अधिकाधिक गावातले शेत रस्ते, शीव रस्ते, मातीकाम, गिट्टी काम करून घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

लातूर इथं महिला आणि बालविकास भवन उभारण्यासाठी प्रशासनानं जागेचा शोध घेऊन त्या संबधी तातडीने कार्यवाही करावी आणि जिल्हयात एकूण किती महिला कामगार वसतीगृह आहेत यांची अधिकृत नोंद सादर करावी तसंच त्यांच्यासाठी उभारावयाच्या वसतीगृहाचा प्रस्ताव नव्याने सादर करावा, असे निर्देश देशमुख यांनी यावेळी दिले. एकल कलाकार अर्थ सहाय्य प्रस्तावातील त्रुटी दूर करुन शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याची सूचनाही त्यांनी केली.

****

बीड इथं काल काकू-नाना विकास आघाडीच्या पाच नगरसेवकांनी काल माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या उपस्थितीत काल शिवसेनेत प्रवेश केला. बीड मध्ये सुरू असलेला अंधाधुंद कारभारास बीडकर कंटाळून गेले आहेत, मात्र अजून वेळ गेलेली नाही आपण सर्व यातून बाहेर पडू आणी नव्याने पुन्हा कामाला लागू असं सांगून क्षीरसागर यांनी, शिवसेनेस आता खऱ्या अर्थाने मजबूती मिळाली असल्याचं नमूद केलं.  आम्ही कधीही सुडाचं राजकारण केलं नाही, असं ते म्हणाले.

****

नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गौरी बक्ष या तृतीयपंथीयाला सेतु सुविधा केंद्र सुरू करण्याचं परवानगी पत्र पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते काल प्रदान करण्यात आलं. तृतीथपंथीयांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना योग्य त्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यातला हा राज्यातला पथदर्शी उपक्रम म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात इमारतीच्या नूतनीकरणाचं उद्घाटन, तसंच अद्ययावत अभ्यागत कक्षाचं लोकार्पण पालकमंत्री चव्हाण यांच्या हस्ते काल करण्यात आलं. जिल्ह्यातल्या ३४ तृतीथपंथीयांना मतदान ओळखपत्राचं वाटपही करण्यात आलं.

****

दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ पुतळा आणि शिवाजीराव दाजी मोरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि इतर कार्यक्रम चव्हाण यांच्या उपस्.थितीत पार पडले.  मराठवाड्याच्या हक्काचं कृष्णा खोऱ्यातलं २४ टीएमसी पाणी उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यास मिळावं, यासाठी कटिबद्ध असल्याचं, ते म्हणाले.

****

बीड इथल्या स्थानिक गुन्हे शाखेला काल चोरट्यांच्या एका टोळीला पकडण्यात यश आलं.  या टोळीनं २७ गुन्ह्यांची कबूली दिली आहे. महाराष्ट्रासह गोव्यातही या टोळीने गुन्हे केले असल्याची माहिती, प्रभारी पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांनी दिली.

****

औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आपल्याला मुंबईत घर द्यावं, अशी मागणी विधानसभेत केली होती. यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं काल आमदार राजपूत यांच्या मुंबईतल्या घरासाठी, कन्नड इथं माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात भिक्षा आंदोलन करण्यात आलं. तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतील असंख्य गोर गरिबांची घरे प्रलंबित असतांना आमदार उदयसिंग राजपूत यांची ही मागणी चुकीची असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी म्हटलं. राजपूत यांच्या मुंबईतल्या घरासाठी कन्नड शहरात भीक मांगो आंदोलन करण्यात आलं.

****

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात, मराठवाड्यातील लेखन या विषयावर, दोन दिवसांच्या राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं आहे. आज २९ आणि उद्या ३० मार्च रोजी विद्यापीठातील सिनेट सभागृहात हे चर्चासत्र होईल.

****

होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज - एच ए आर सी परभणी या संस्थेतर्फे, काल बीड इथल्या इंफॅन्ट इंडिया आनंदवन बालगृह पाली, या एचआयव्ही संक्रमित बालकांच्या प्रकल्पातील मुलींसाठी, ३०० सॅनिटरी नॅपकिनचं वाटप करण्यात आलं.

****

No comments:

آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر‘علاقائی اُردو خبریں: بتاریخ: 30 مئی 2026‘ وقت: صبح 09:00 تا 09:10

  Regional Urdu Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date: 30 May 2026 Time: 09:00-09:10 AM آکاشوانی چھترپتی سمبھاجی نگر علاقائی خبریں ت...