Tuesday, 2 May 2023

Text - आकाशवाणी औरंगाबाद, दिनांक : 02.05.2023 रोजीचे सकाळी 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 02 May 2023

Time 7.10 AM to 7.25 AM

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक ०२ मे २०२३ सकाळी ७.१० मि.

****

·      ६३ वा महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा;मराठवाड्यात ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमातून हुतात्म्यांना अभिवादन

·      मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन; हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ 

·      घटस्फोटासाठीची सहा महिन्यांची मुदत माफ करण्याचा सर्वोच्च न्यायालयाला अधिकार- घटनापीठाचा निर्वाळा

·      एप्रिल महिन्यात देशभरातून विक्रमी एक लाख ८७ हजार ३५ कोटी रुपये जीएसटी संकलन

·      शिंदे-फडणवीस सरकारने आर्थिक शिस्त बिघडवली-वज्रमूठ सभेत अजित पवार यांचा आरोप

·      शासकीय वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचं महसूल मंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

आणि

·      आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा लखनौ सुपर जायंट्सवर १८ धावांनी विजय

****

६३ वा महाराष्ट्र दिन काल उत्साहात साजरा झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या अद्वितीय व्यक्तिमत्वांची जन्मभूमी- कर्मभूमी आहे, तसंच ही संतांची, शूरवीरांची, कलाकार आणि विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीमत्वांची भूमी आहे, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही राज्यातल्या जनतेला स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हे सामाजिक चळवळींचं माहेरघर असून, राज्यातल्या नागरिकांचं देशाच्या प्रगतीत मोलाचं योगदान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र हे महान संस्कृती असलेलं मेहनती लोकांचं राज्य असून, इथल्या जनतेनं विविध क्षेत्रांमध्ये देशाच्या प्रगतीत भरीव योगदान दिल्याचं, पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.

नवी दिल्लीत महाराष्ट्र सदनात वासुदेव नृत्य, जात्यावरील ओवी, गोंधळ, धनगर नृत्य, भारूड, पोवाडा, अभंग गायनासह ‘महाराष्ट्र गीत गायनातून काल महाराष्ट्र दिन साजरा झाला.

महाराष्ट्र दिनाचं मुख्य ध्वजारोहण मुंबई इथं राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते झालं. त्यांनी यावेळी मराठी जनतेला शुभेच्छा देत, संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते नागपूर इथं शासकीय ध्वजारोह करण्यात आलं.

मुंबईत विधान भवन इथं विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली. हुतात्मा स्मारकाचं टपाल तिकीट जारी करण्यासाठी आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं गोऱ्हे यांनी सांगितलं.

****

छत्रपती संभाजीनगर इथं पोलिस आयुक्त कार्यालयाच्या देवगिरी मैदानावर पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास आणि कल्याणासाठी शासन विविध योजना राबवत असल्याचं सांगितलं. प्रत्येक जिल्ह्यातशासकीय  योजनांची  जत्रा’ हा अभिनव उपक्रम राबवण्यात येत असून, या माध्यमातून जिल्ह्यातल्या ७५ हजार नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार असल्याची माहिती भुमरे यांनी दिली. यावेळी त्यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचं वितरण आणि विविध विभागाच्या १७ उमेदावारांना नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले.

**

बीड इथं सहकार मंत्री तथा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आलं. पोलिस दलाच्या वतीनं पालकमंत्र्यांना मानवंदना देण्यात आली, तसंच त्यांनी पथसंचलनाचं निरीक्षण केलं. विशेष पुरस्कार विजेते पोलिस अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार, तसंच विविध पुरस्कारांचं वितरणही पालकमंत्री सावे यांच्या हस्ते करण्यात आलं.

**

उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. त्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून, महाराष्ट्राच्या स्थापनेकरता बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केलं. पोलिस दलात नव्यानं सामील झालेल्या वाहनांच्या ताफ्याचं लोकार्पण यावेळी करण्यात आलं. पोलीस निरीक्षक अमोल पवार आणि पोलीस अंमलदार प्रदीप वाघमारे यांना पालकमंत्री सावंत यांच्या स्ते 'पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह पदक देऊन गौरवण्यात आलं.

**

नांदेड इथं छत्रपती शिवाजी महाराज पोलिस कवायत मैदानावर पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी त्यांनी पोलिस संचलनाचं निरीक्षण करून मानवंदना स्वीकारली. नैसर्गिक आपत्तीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचं, महाजन यांनी सांगितलं. ते म्हणाले....

‘‘खरं म्हणजे गेल्या महिनाभरामध्ये निसर्गाची खूप अवकृपा झालेली आहे. शेतकरी अडचणीत आहे. गारपीट चाललेली आहे, वादळ चाललंय. पाऊस चालला आहे. दररोज कुठे न कुठे काही ना काही घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. पण निश्चित सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. आम्ही सगळे मंत्री बांधावर जाऊन, शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन सगळी पाहणी करतोय. आपण बघितलं असेल गेल्या महिन्यात मी नांदेडला, लातूरला आलो होतो. त्याची मदत जवळपास अकरा कोटी रूपये हे सगळे आता जिल्हाधिकाऱ्यांकडे आलेले आहेत. त्यांनी सगळ्या शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये ती रक्कम टाकलेली आहे. काही अंशी काही राहिलेले असतील, मला वाटतंय दोन-चार-पाच दिवसांमध्ये ती रक्कम जाईल.’’

**

हिंगोली इथं पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. यावेळी त्यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या. हिंगोली जिल्ह्याच्या विकासात शासन स्तरावरून सातत्याने उपाययोजना केल्या जात असून, विकास कामांमध्ये कुठलाही गतिरोध येऊ देणार नाही,सं आश्वासन सत्तार यांनी दिलं.

**

जालना इथं पोलिस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या हस्ते, परभणी इथं प्रियदर्शनी इंदिरा गांधी जिल्हा क्रीडा संकुलावर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते, तर लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

**

महाराष्ट्राबाहेर इतर राज्यातही काल महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. आसाममध्ये राज्यपाल गुलाबचंद कटारीया यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम झाला. तर पुद्दुचेरी इथं राज्यपाल डॉक्टर तमिलीसाई सुंदरराजन यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र आणि गुजरात दिवस साजरा करण्यात आला. तामिळनाडूत चेन्नई इथं राज्यपाल आर.एन.रवी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्र आणि गुजरात दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने, राज्यभरात आपला दवाखाना तसंच, शहरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचं उद्घाटन झालं. राज्यात ३१७ तालुक्यांच्या ठिकाणी "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना" योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर इथले पाच आपले दवाखाने, तसंच १२ आरोग्यवर्धिनी केंद्रांचा समावेश आहे.

धाराशिव जिल्ह्यातही आपला दवाखाना योजनेचा शुभारंभ झाला. या दवाखान्या मध्ये सर्व उपचार मोफत मिळणार असून, गर्भवतींसंदर्भातही सर्व आरोग्य सुविधा मिळणार आहेत. हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात एक आपला दवाखाना सुरु होआहे.

जालना जिल्ह्यात २० शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र तसंच आठ आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात येत आहेत. लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या हस्ते नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचं उद्घाटन झालं.

****

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ई-शिवनेरी बसचं लोकार्पण तसंच हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानाचा काल शुभारंभ करण्यात आला. प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या मुंबई-ठाणे-पुणे अशा १०० शिवनेरी ई बस धावणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

****

भिवंडी इमारत दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटूंबाला पंतप्रधान सहायता निधीतून दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत, जखमींच्या जलद बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

दरम्यान, या इमारतीच्या ढिगाऱ्यातून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. आता या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आठ झाली आहे. याठिकाणचं बचावकार्य पूर्ण झाल्याचं राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - एन डी आर एफ नं जाहीर केलं.

****

पती-पत्नीच्या नात्यात सुधारणेची शक्यता नसेल तर घटस्फोटासाठीची सहा महिन्यांची मुदत सर्वोच्च न्यायालय आपल्या अधिकारात माफ करू शकतं, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं दिला आहे. घटस्फोटासंदर्भात दाखल एका याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाच्या घटनापीठानं, संविधानाच्या अनुच्छेद १४२ च्या तरतुदींचा वापर करून, ही मुदत माफ करता येईल, असं सांगितलं. सध्याच्या कायद्यानुसार, पती-पत्नीला घटस्फोट घ्यायचा असल्यास कौटुंबिक न्यायालयाकडून समुपदेशनासाठी सहा महिन्यांचा वेळ दिला जातो.

****

एप्रिल महिन्यात देशभरातून एक लाख ८७ हजार ३५ कोटी रुपये वस्तू आणि सेवा कर जीएसटी संकलित झाला आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याच्या तुलनेत हे प्रमाण १२ टक्के अधिक असल्याचं, केंद्रीय अर्थमंत्रालयानं म्हटलं आहे. जीएसटी संकलन करुन देणाऱ्या राज्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे. महाराष्ट्रातून एप्रिल महिन्यात ३३ हजार १९६ कोटी रुपये जीएसटी संकलित झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत महाराष्ट्रात जीएसटी संकलनात तब्बल २१ टक्के वाढ झाली आहे.

****

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आर्थिक शिस्त बिघडवल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. काल मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलावर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत ते बोलत होते. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला असताना राज्य सरकार जबाबदारी घेत नसल्याची टीकाही पवार यांनी केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपल्या भाषणातून राज्यसरकारवर टीका केली. महाविकास आघाडीने गेल्या काही निवडणुकांमध्ये भाजपला चितपट केल्याचा दावा, उद्धव ठाकरे यांनी केला आहे. ते म्हणाले…

‘‘या वज्रमूठेच्या हिसका गेल्या काही दिवस आपण पाहिला ना, विधान परीषद असतील, विधान सभेच्या, सगळया मार्केट्च्या , पंचायतची निवडणूका असेल, अगदी अंधेरीची निवडणूक असेल, या सगळया निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांनी मिळून त्यांना चारी मुंड्या चित केलेलं आहे, ही वज्रमूठ आहे, आणि आता जो महाराष्ट्रामध्ये सध्या विषय भडकलेला आहे बारसू, बारसू मध्ये सुद्धा माझा नावाने पत्र दाखवतायत, उद्घव ठाकरेनी ती जागा सुचवली, हो सुचवली होती, आपल्या सरकारने सुचवली होती, पण त्या पत्रामधये असं कुठे लिहिलयं का.. की पोलिसांना घुसवा, लाठ्या चालवा, अश्रुधूर सोडा, वेळप्रसंगी गोळ्या चालवा पण रिफायनरी करा, असे माझ्या पत्रात लिहिलंय? मी दहा तारखेला पहिल्या प्रथम बारसूला जाणार अन त्याच्यानंतर महाडच्या सभेला जाणार.’’

महाविकास आघाडीने एकत्र राहून निवडणुका लढल्या तर सत्ताधारी पक्षाचा पराभव होतो, हे मागील काही निवडणुकांवरून स्पष्ट झाल्याचं, अशोक चव्हाण यांनी नमूद केलं. तर प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा दारूण पराभव होत असल्यानं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नसल्याची टीका नाना पटोले यांनी केली.

****

शहरी नक्षलवाद ही मोठी समस्या असल्याचं, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. काल गडचिरोली जिल्ह्यात दामरंचा आणि ग्यारापत्ती इथं पोलिस विभागाच्या इमारतींच्या उद्‌घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी नागरिकांशी संवाद साधत, शासकीय योजनांच्या लाभाबाबत माहिती जाणून घेतली.

****

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत काल १७१ रुपये ५० पैशांची कपात करण्यात आली आहे. नव्या दरानुसार आता व्यावसायिक सिलिंडरची किंमत मुंबईत १ एक हजार ८०८ रुपये ५० पैसे असणार आहे. मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतींमध्ये सध्या कोणताही बदल झाला नाही.

****

राज्यातल्या पहिल्या शासकीय वाळू विक्री केंद्राचं उद्घाटन आणि वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचं लोकार्पण, अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यातल्या नायगांव इथं, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांच्या हस्ते काल झालं. सर्वसामान्यांच्या हितासाठी सरकारनं घेतलेला हा निर्णय क्रांतिकारी आहे, असं ते यावेळी म्हणाले. नायगावचा वाळू साठा हा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. ग्राहक प्रतिसादानुसार विविध ठिकाणी साठा केंद्र सुरू केलं जाणार आहे. या माध्यमातून ग्राहकांना 'महाखनिज' या भ्रमणध्वनी अॅपवर मागणी नोंदवल्यार, ६०० रूपयात एक ब्रास वाळू दिली जाणार असून, जास्तीत जास्त १० ब्रास वाळू घरपोच दिली जाणार आहे. वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अचूक ठाव ठिकाण्याची माहिती देणारी-जीपीएस यंत्रणा असल्याने भष्ट्राचार-अनियमितेला शून्य वाव असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

****

इंडियन प्रीमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल लखनौ इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरनं लखनौ सुपर जायंट्सवर १८ धावांनी विजय मिळवला. बंगळुरुच्या संघानं प्रथम फलंदाजी करत दिलेल्या १२७ धावांचं लक्ष्य पार करताना लखनौचा संघ १०८ धावांवर सर्वबाद झाला. दरम्यान या स्पर्धेत आज अहमदाबाद इथं गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होणार आहे. सायंकाळी साडे सात वाजता सामन्याला सुरुवात होईल.

****

परभणी इथं महाराष्ट्र दिन ध्वजारोहण सोहळ्यात ‘सुंदर माझा दवाखाना मोहिमेंतर्गंत विजेत्या आरोग्य संस्थांना, जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं. जिल्हा माहिती अधिकारी सुनील पोटेकर लिखित, ‘परभणी जिल्हा ऐतिहासिक वारसा, या पुस्तकाचं प्रकाशन, खासदार संजय जाधव आणि जिल्हाधिकारी गोयल यांच्या हस्ते झालं. समाजकल्याण विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या विविध योजना, लाभार्थ्यांची माहिती देणाऱ्या यशोगाथा पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं.

****

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली काल जिल्हा नियोजन समितीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत २०२२-२३ मध्ये जिल्ह्यात विकास कामावर झालेल्या २७० कोटी १९ लाख १३ हजार रुपयाच्या खर्चाला मान्यता देण्यात आली.

****

No comments:

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 21.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 21 August 2025 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्र...