Regional Marathi
Text Bulletin, Aurangabad
Date – 30
September 2019
Time 1.00 to 1.05pm
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३० सप्टेंबर २०१९ दुपारी १.०० वा.
****
बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा
मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार नमिता मुंदडा यांनी आज भारतीय जनता
पक्षात प्रवेश केला. परळी इथं गोपीनाथ गडावर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार
डॉ प्रीतम मुंडे यांनी नमिता मुंदडा यांचं पक्षात स्वागत केलं. नमिता मुंदडा यांचे
पती अक्षय मुंदडा यावेळी उपस्थित होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या
ज्येष्ठ नेत्यांची दिल्लीत काल बैठक झाली. या बैठकीत महाराष्ट्रातल्या उमेदवारांची
यादी जवळपास नक्की करण्यात आली असून, केजमधून नमिता मुंदडा यांचं नाव निश्चित झालं
असल्याचं मुंदडा समर्थकांनी सांगितलं. भाजप प्रवेशापूर्वी नमिता मुंदडा यांनी, राष्ट्रवादी
काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईमेलद्वारे
पाठवला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी, केज विधानसभा मतदार
संघातून नमिता मुंदडा यांना नुकतीच उमेदवारी जाहीर केली होती. नमिता मुंदडा या माजी
मंत्री दिवंगत विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदार संघातून
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज सकाळी उमेदवारी
अर्ज दाखल केला. भोकर इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयात चव्हाण यांनी अर्ज दाखल केला
आहे. चव्हाण यांच्या सुविद्या पत्नी अमिता चव्हाण यांचाही उमेदवारी अर्ज भरण्यात आल्याचं,
आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
फिट इंडिया अभियानात तरुणांनी सक्रीय सहभाग घ्यावा,
असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज चेन्नई इथं भारतीय तंत्रज्ञान
संस्था आय आय टीच्या पदवी प्रदान सोहळ्यात बोलत होते. विविध शाखांमध्ये विशेष गुणवत्ताधारक
विद्यार्थ्यांना यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते पदकं तसंच पदवी प्रमाणपत्रं प्रदान करण्यात
आली.
****
जम्मू काश्मीर मधून कलम
३७० हटवण्याचा निर्णय म्हणजे देशाच्या केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ३५ हजार हुतात्मा
सैनिकांना खरी श्रद्धांजली असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटल आहे.
ते आज गुजरातमधल्या अह्मदाबाद इथं शीघ्र कृती दलाच्या २७ व्या स्थापना दिनानिमित्त
बोलत होते. १९९२ मध्ये शीघ्र कृती दलाची स्थापना जातीय दंगली रोखण्यासाठी तसंच कायदा
आणि सुव्यवस्था राखण्यासाठी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी शाह यांनी हुतात्मा
सैनिकांच्या पत्नींना आणि जवानांना वीरता पुरस्कारानं सन्मानित केलं.
****
जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाला
आव्हान देणाऱ्या याचिकांवर उद्यापासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश
रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या एका पीठानं, या सर्व याचिका घटनापीठाकडे वर्ग
केल्या आहेत. कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये लागू असलेल्या निर्बंधावरही या याचिकांमधून
आक्षेप नोंदवण्यात आला आहे. न्यायमूर्ती एन व्ही रामना यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठ
या याचिकांवर सुनावणी घेणार आहे.
****
स्वच्छ भारत मोहिमेची
माहिती जाणून घेण्यासाठी जगातले अनेक देशांचे मंत्री भारतात येत आहेत. गेल्या वर्षी
जगभरातल्या विविध देशांच्या 55 मंत्र्यांनी भारताला भेट देऊन या मोहिमेची माहिती घेतली
असं युनिसेफचे भारतातले स्वच्छता अभियानाचे प्रमुख, निकोलस ऑस्बर्ट यांनी म्हटलं आहे.
मोदी सरकारचं स्वच्छ भारत अभियान हे जगासाठी चांगलं उदाहरण असून या अभियानामुळे भारतीय
समाजाचा स्वच्छतेकडे बघायचा दृष्टिकोन बदलला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं मुंबईत निधन झालं.
ते ७८ वर्षांचे होते. मराठी आणि हिंदी चित्रपटांसह मराठी आणि इंग्रजी रंगभूमीवर त्यांनी
विविध भूमिका साकारल्या. शोले या चित्रपटातली कालिया डाकूची भूमिका प्रेक्षकांच्या
आजही स्मरणात आहे. त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार
आहेत.
****
उस्मानाबाद तालुक्यातल्या आंबेजवळगे गावचे माजी सरपंच
मनोहरराव उर्फ मनू काका कुलकर्णी यांचं आज सकाळी निधन झालं, ते ९४ वर्षांचे होते. ते
सलग ५० वर्ष अंबेजवळग्याचे सरपंच होते. बार्शी अर्बन बॅंकेचे अध्यक्ष, पांगरी इथल्या
शिक्षण संस्थांचे अध्यक्ष यासह विविध संस्थांचं अध्यक्षपदही त्यांनी अनेक वर्ष सांभाळलं.
त्यांच्या पार्थिव देहावर आंबेजवळगे इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाची धडक
बसून एका तरुणाचा मृत्यू झाला. सोलापूर जिल्ह्यात हा अपघात झाला. श्याम होळे असं मृत
तरुणाचं नाव असून, संतप्त जमावानं, मंत्र्यांच्या वाहनाचं नुकसान केल्याचं, आमच्या
वार्ताहरानं कळवलं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.
****
भारताचा बॅडमिंटनपटू
कौशल धर्मामेर यानं मालदिवची राजधानी माले इथं झालेल्या मालदिव आंतरराष्ट्रीय बॅडमिन
स्पर्धेत पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात कौशलनं सिरील
वर्माचा सरळ सेटमध्ये पराभव केला. मात्र महिला दुहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की
रेड्डी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. त्यांना जपानच्या सायाक होबारा
आणि नात्सुकी सोनी या जोडीनं १०-२१, २१-१७, १२-२१ असं हरवलं. मिश्र दुहेरीत साईप्रतिक
कृष्णप्रसाद आणि अश्विनी भट या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं.
*****
***0
No comments:
Post a Comment