Regional Marathi Text
Bulletin, Aurangabad
Date – 03 February 2021
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ सायंकाळी ६.१०
****
** कृषी कायद्याच्या मुद्यावरून
विरोधी पक्षांनी गदारोळ केल्यामुळे लोकसभेचं कामकाज दोनवेळा तहकूब तर राज्यसभेत आम
आदमी पक्षाचे तीन खासदार निलंबित
** प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी आंदोलकांकडून करण्यात
आलेल्या हिंसाचाराची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिका दाखल करुन घेण्यास सर्वोच्च
न्यायालयाचा नकार
** १५ फेब्रुवारीपासून
५० टक्के उपस्थितीसह राज्यातील महाविद्यालय सुरु करण्याचा राज्य सरकारचा निर्णय
आणि
** राज्याच्या ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि सर्व
सुविधा असणारं फिरतं रुग्णालय सुरू करणार- आरोग्यमंत्री राजेश टोपे
****
कृषी कायद्याच्या मुद्यावरून विरोधी
पक्षांनी गदारोळ केल्यामुळे आज लोकसभेचं कामकाज दोनवेळा तहकूब करावं लांगलं. तर राज्यसभेत आजही या कायद्यावरून गदारोळ
झाला. सभापतींच्या आसनासमोर जाऊन जोरदार घोषणाबाजी केल्यानं आम आदमी पक्षाच्या तीन
खासदारांना निलंबित करण्यात आलं. संजय सिंह, सुशील कुमार गुप्ता आणि एन डी गुप्ता यांनी सदनात शेतकरी
आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यावेळी सभापती एम. व्यंकय्या नायडूंनी
त्यांना जागेवर बसण्यास सांगितलं. मात्र, खासदारांनी
घोषणाबाजी कायम ठेवल्यामुळे सभापतींनी तिघांवरही निलंबनाची कारवाई केली. तत्पूर्वी
काँग्रेसचे सदस्य गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांनी राज्यसभेचं अन्य कामकाज थांबवून
कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनावर चर्चा करण्याची मागणी केली.
****
राज्यसभा सभागृहात आणि कार्यालयात
भ्रमणध्वनीच्या वापरासंबधी राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू यांनी सदस्यांना
विशेष दिशानिर्देश दिले आहेत. राज्यसभा कार्यालयात भ्रमणध्वनीच्या वापरावर बंदी
असून काही सदस्य सभागृहात बसून सभागृहाचं कामकाज चित्रित आणि ध्वनीमुद्रित करताना
आढळले असून ते सभागृहाच्या नियमांच्या विरुद्ध असल्याचं नायडू म्हणाले. अशा प्रकारे चित्रण
करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित करणं हे विशेषाधिकार उल्लंघन आणि सभागृहाचा
अवमान असल्याचं नायडू यांनी सांगितलं. सभागृहातील सर्व सदस्यांनी अशा कृतींपासून दूर रहावं आणि त्याबाबत सावधगिरी बाळगावी असंही ते म्हणाले.
****
टाळेबंदीमुळे झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी कामाचा कालावधी वाढवण्याची
मागणी करणारे राज्य सरकारचे प्रस्ताव केंद्र सरकारनं फेटाळले असल्याची
माहिती केंद्रीय कामगार मंत्री संतोष गंगवार यांनी राज्यसभेत लेखी
उत्तरात दिली. टाळेबंदीमध्ये कारखाने
बंद राहिल्यामुळे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारांनं हे प्रस्ताव केंद्र सरकारकडे
पाठवले होते.
****
देशात जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२० या
कालावधीत अवैधरीत्या घुसलेल्या विदेशी नागरिकांवर कारवाई आणि लूक आऊट नोटीस
बजावण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली आहे. याप्रकरणी
लोकसभेत उत्तर मुंबईचे
खासदार गोपाळ शेट्टी यांनी तारांकित प्रश्न विचारला होता. लूक
आऊट नोटिस बजावण्यात आलेल्या विदेशी नागरिकांना भारताबाहेर जात असताना ‘इमिग्रेशन चेक पोस्ट’वर माहिती मिळाल्यानंतर
त्यांच्याविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात आली
असल्याचंही राय यांनी सांगितलं.
****
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकरी
आंदोलकांकडून करण्यात आलेल्या हिंसाचाराची चौकशी व्हावी, अशी मागणी करणाऱ्या याचिका
सर्वोच्च न्यायालयानं
दाखल करुन घेण्यास नकार दिला आहे. या प्रकरणात, सर्वोच्च
न्यायालय मध्यस्थी करणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी
ट्रॅक्टर रॅली काढत दिल्लीत प्रवेश केला. यावेळी दिल्लीच्या सीमेवर तसंच दिल्लीत
मोठ्या प्रमाणात शेतकरी आंदोलकांकडून हिंसाचार करण्यात आला होता. याची चौकशी
व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या.
****
१५ फेब्रुवारीपासून ५० टक्के उपस्थितीसह राज्यातील
महाविद्यालय सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण
मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं पर्याय विद्यार्थ्यांसाठी खुला ठेवण्यात
आला असल्याचं त्यांनी सांगितलं. ७५ टक्के उपस्थितीचं बंधन राहणार
नसून त्यासंदर्भातली शासन निर्णय जारी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. कोविड प्रतिबंधात्मक उपायांची बंधन ठेवून महाविद्यालय
सुरु करण्यात यावी, १०० टक्के महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भात
चर्चा करण्यात येणार असून महाविद्यालयांसदर्भातील पुढील निर्णय घेण्यासाठी कुलगुरुंनी
जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घ्यावेत, अशा सूचना केल्या
असल्याचं ते म्हणाले. वसतीगृह सुरु करतांना फायर ऑडिटसह इतर सगळी
परीक्षण करुनच सुरु करण्याची सक्ती करण्यात आली आहे. परिक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईनसाठी सहमती दिली असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अनुसूचित जातीतील सर्व पात्र
विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, फ्रिशिप, देशांतर्गत शिष्यवृत्ती,
विद्यावेतन आणि तत्सम योजनांचा लाभ हा विद्यार्थ्यांची ऑनलाईन
उपस्थिती ग्राह्य धरून देण्यात यावा असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
मंत्री धनंजय मुंडे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले आहेत. कोविड
प्रादुर्भावामुळे शाळा महाविद्यालयंजरी बंद असली तरी ऑनलाईन,
डिजिटल, ऑफलाईन आदी पद्धतींनी बहुतांश महाविद्यालयात
शिक्षण सुरू असल्याचं ते म्हणाले. सामाजिक न्याय विभागांतर्गत विविध योजना
राबवल्या जातात त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा असंही मुंडे
म्हणाले.
****
तथाकथित टी आर पी घोटाळाप्रकरणी प्रसारण
प्रेक्षक संशोधन परिषदेचे माजी कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्या जामीन
अर्जावरील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयानं येत्या नऊ तारखेपर्यंत पुढे ढकलली आहे. विशेष सरकारी वकील
शिशिर हिरे यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. तत्पूर्वी शहर दिवाणी आणि सत्र
न्यायालयानं १६ जानेवारीला दासगुप्ता यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
****
देशभरात आतापर्यंत ४१ लाख ३८ हजार ९१८
नागरीकांचं कोविड लसीकरण करण्यात आल्याची माहिती, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिली आहे.
दरम्यान देशात गेल्या चोवीस तासात कोरोनाविषाणू संसर्गाचे नवे अकरा हजार एकोणचाळीस
रुग्ण आढळले असून एकशे दहा रुग्णाचा या
संसर्गानं मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे.
****
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्याच्या
ग्रामीण भागातील महिलांसाठी अत्याधुनिक आणि सर्व सुविधा असणारं फिरतं रुग्णालय
सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. विशेषतः गरोदर महिलांना
रुग्णालयातून त्यांच्या घरी सुरक्षित
सोडण्यासाठी ही सुविधा असणार आहे. ग्रामीण भागात प्रत्येक जिल्ह्यात दोन फिरते रुग्णालय असणार
आहेत. मुंबईतही अशा फिरत्या रुग्णालयात वाढ केली जाणार असल्याचं आरोग्यमंत्री टोपे
यांनी सांगितलं.
*****
नांदेड जिल्ह्यातल्या ग्रामीण रुग्णालय भोकर
इथले आरोग्य सहायक तथा महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेचे
कोषाध्यक्ष सत्यजित टिप्रेसवार यांनी कोरोना लस घेतली आहे. कोविड-19 पासून सुरक्षीत होण्यासाठी सर्व
आरोग्याधिकारी, कर्मचारी यांनी लस घेण्याचं आवाहन टिप्रेसवार
यांनी केलं आहे.
****
वर्धा जिल्ह्यातल्या भुगाव इथल्या उत्तम गॅल्वा मेटॅलिक्स या स्टील
कारखान्यात आज सकाळी अचानक स्फोट झाला.
यात जवळपास ३८ कामगार जखमी झाले आहेत. जखमींना सावंगी मेघे इथल्या आचार्य विनोबा
भावे ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आलं आहे. भट्टीततून गरम राख बाहेर काढत असताना गरम हवा आणि राख अंगावर आल्यानं ही घटना घडली
असुन घटनास्थळाची पाहणी केल्या नंतर या स्फोटाच्या चौकशीअंती दोषींवर कारवाई
करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी सांगितलं.
****
जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार हरीभाऊ आत्माराम महाजन
यांचं काल रात्री अल्पशा आजारानं निधन झालं. ते पूर्वाश्रमीच्या एरंडोल विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
****
परभणी जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन
कार्यालयाच्यावतीनं आज रस्ता सुरक्षा अभियानानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात १७५
जणांनी रक्तदान केलं. यावेळी परिवहन विभागाच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन
करण्यात आलं होतं.
****
परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरातील नविन
मोंढा परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक करणाऱ्या एक टिप्पर पोलिसांनी जप्त केला. चालक सय्यद तौसिफ सय्यद लाल आणि जाफर पठाण यांच्याविरूध्द गुन्हा
दाखल करत पोलीसांनी टिप्परसह पाच लाख चार हजारांचा ऐवज जप्त केला
आहे.
//************//
No comments:
Post a Comment