Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 December 2025
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक
२२ डिसेंबर
२०२५ सकाळी ११.०० वाजता
****
महाराष्ट्र विकासाच्या बाजूने खंबीरपणे
उभा असल्याचं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीच्या विजयाबद्दल
अभिनंदन करत जनतेचे आभार मानले. हा निकाल लोककेंद्रित विकासाच्या रालोआ सरकारच्या दृष्टिकोनावर
जनतेनं दाखवलेल्या विश्वासाचं प्रतिबिंब असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या
प्रत्येक नागरिकाच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नव्या उर्जेने काम करण्यास आम्ही वचनबद्ध
आहोत, असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीत महायुतीला भरघोस पाठिंबा दिल्याबद्दल जनतेचे आभार
मानले. हा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या सर्वसमावेशक कल्याणकारी
दृष्टिकोनाला मिळालेला आशीर्वाद असल्याचं शाह
यांनी म्हटलं आहे.
****
ग्रामीण रोजगार धोरणात आमूलाग्र सुधारणा
घडवून आणणाऱ्या विकसित भारत जी-राम-जी विधेयकासह शांती अर्थात शाश्वत अणुऊर्जा वापर
आणि विकास विधेयक २०२५ यांसह अनेक महत्त्वाच्या विधेयकांना राष्ट्रपतींनी मंजुरी दिली
आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ही विधेयकं
संमत झाली होती आणि राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर आता त्यांचं कायद्यात रूपांतर झालं
आहे. जी-राम-जी कायद्यानुसार प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला आता वर्षातून १२५ दिवसांच्या वेतन रोजगाराची कायदेशीर हमी मिळणार आहे.
अर्ज केल्यानंतर १५ दिवसांत रोजगार न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता देण्याची तरतूदही यात
करण्यात आली आहे. तसंच ग्रामसभा आणि ग्रामपंचायतींना योजना आखण्याचे अधिक अधिकार देण्यात
आले आहेत. शांती विधेयकामुळे नागरी अणुऊर्जा क्षेत्राशी संबंधित सर्व कायदे एकत्रित
करण्यात आले असून, खासगी क्षेत्राचा सहभाग
खुला करण्यात आला आहे. याअंतर्गत अणुऊर्जा अधिनियम १९६२ आणि नागरी अणु नुकसान भरपाई अधिनियम २०१० रद्द करण्यात आले आहेत.
याशिवाय सबका बीमा, सबकी रक्षा विमा कायदा
सुधारणा विधेयक २०२५ आणि निरसन सुधारणा विधेयकांनाही राष्ट्रपतींनी मंजुरी दिली.
****
धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान
वाहतूक विस्कळीत झाली, तर विमान कंपन्यांनी
प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, आणि विमानतळांवर पुरेसे कर्मचारी
नियुक्त करावेत, असे निर्देश केंद्र सरकारनं
दिले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयानं काल याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं. विमान
कंपन्यांनी प्रवाशांना विमानाच्या स्थितीबाबत वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी, प्रवासाला अधिक विलंब झाला, तर भोजन आणि अल्पोपहाराची व्यवस्था
करावी, तिकीट रद्द झालं, तर पुन्हा आरक्षण अथवा तिकिटाच्या
पैशाचा परतावा करण्याची व्यवस्था करावी, अशा सूचनाही सरकारनं दिले आहेत.
****
शेतीची उत्पादकता आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी
राज्य सरकार ‘मिशन नैसर्गिक शेती’ राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांनी केली. या उपक्रमाअंतर्गत येत्या दोन वर्षांत राज्यातली २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक
शेतीखाली आणण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलं आहे. नागपूर इथल्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट
ऑफ टेक्नॉलॉजीच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे आयोजित ‘उडान’ संमेलनात ते काल बोलत
होते. मुख्यमंत्र्यांनी शिक्षण क्षेत्रातील बदलांवर भाष्य करताना, एआय ही काळाची गरज असून, LIT सारख्या संस्थांनी मोठ्या प्रमाणात
AI स्वीकारल्यास जागतिक स्पर्धेसाठी
सक्षम विद्यार्थी घडू शकतात, असं सांगितलं.
****
अवकाश ही कधीच मर्यादा नव्हती आणि
नसेल; अशा प्रेरणादायी शब्दांत अंतराळवीर
आणि भारतीय वायु दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांनी युवकांना मोठी स्वप्नं पाहण्याचा
आणि ती सत्यात उतरवण्याचा सल्ला दिला. पुणे पुस्तक महोत्सवात ते काल बोलत होते. भारत
२०४० मध्ये चंद्रावर उतरण्याची तयारी करत आहे आणि कदाचित तिथं पडणारं पहिलं पाऊल तुमचंही
असू शकतं, असं सांगत त्यांनी तरुणांमध्ये आत्मविश्वास
निर्माण केला. यावेळी शुभांशू शुक्ला यांनी आपल्या अंतराळ मोहिमेतील रोमांचक अनुभव सांगितलं. काल पुणे पुस्तक महोत्सवाची सांगता
झाली.
****
पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी इथं नगरपालिकेच्या
निवडणूक निकालानंतर काढण्यात आलेल्या विजयी मिरवणुकीदरम्यान मोठी दुर्घटना घडली. विजयाचा
जल्लोष सुरू असतानाच रंगीत स्प्रे आणि पेटत्या ज्योतीच्या संपर्कामुळे अचानक आग भडकली, यात दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह
किमान १६ जण गंभीररीत्या भाजले. जखमींमध्ये महिला आणि युवकांचाही समावेश आहे.
****
राज्यातली वीज वहन यंत्रणा अधिक बळकट
करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी – महापारेषण आणि महाराष्ट्र राज्य
विद्युत निर्मिती कंपनी– महानिर्मितीमध्ये काल सामंजस्य करार झाला. ७६५ के.व्ही. क्षमतेच्या
पारेषण प्रकल्पासाठी 'टॅरिफ बेस्ड कॉम्पिटिटिव्ह
बिडिंग' अंतर्गत संयुक्तपणे निविदा सादर करण्याचा
निर्णय दोन्ही वीज कंपन्यांनी घेतला आहे. यामुळे महापारेषणचा पारेषण क्षेत्रातला अनुभव
आणि महानिर्मितीची मोठ्या वीज प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील तांत्रिक कार्यक्षमता एकत्र
येणार आहे.
****
महिला क्रिकेटमध्ये, श्रीलंकेविरुद्धच्या पाच टी –ट्वेंटी
सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने आठ खेळाडू राखून विजय मिळवला. या
विजयामुळे भारतीय संघाने मालिकेत एक – शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला दुसरा
सामना उद्या विशाखापट्टणम इथं होणार आहे.
****
No comments:
Post a Comment