Sunday, 10 August 2025

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 10.08.2025 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 10 August 2025

Time 18.10 to 18.20

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक – १० ऑगस्ट २०२५ सायंकाळी ६.१०

****

·      अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर सरकारचा भर, पंतप्रधानांचं प्रतिपादन; पुणे ते अजनीसह तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचा शुभारंभ

·      छत्रपती संभाजीनगर ते जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट पर्यंत नवीन मालवाहतूक मार्गिका निर्माण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

·      अनैतिकता दूर करण्याचा मार्ग सांगितला नाही तर नैतिक उपदेशाला अर्थ नसल्याचं ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांचं मत

·      इगतपुरी इथं एक बेकायदेशीर कॉल सेंटर सीबीआयकडून उध्वस्त

आणि

·      हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड इथं तिरंगा वाहन फेरीला उत्स्फुर्त प्रतिसाद

****

अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करण्यावर आपल्या सरकारचा भर असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज बंगळुरू इथं तीन वंदे भारत रेल्वे गाड्यांचा शुभारंभ तसंच विविध पायाभूत सुविधांचं भूमिपूजन तसंच पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. आपली शहरं स्मार्ट, गतिमान आणि अधिक कार्यक्षम होतील, तेव्हाच आपण प्रगतीपथावर अग्रेसर होऊ, असं पंतप्रधानांनी नमूद केलं. ते म्हणाले

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूरनंतर आपण प्रथमच बंगळुरूत आल्याचं सांगत, दहशतवादाविरोधातल्या या कारवाईच्या यशात बंगळुरूचा मोठा वाटा असल्याबद्दल पंतप्रधानांनी बंगळुरूतल्या तरुणांचं तसंच शास्त्रज्ञांचं कौतुक केलं. ते म्हणाले

बाईट - पंतप्रधान नरेंद्र मोदी

****

पुणे ते अजनी, बंगळुरू ते बेळगाव आणि अमृतसर ते कटरा माता वैष्णोदेवी या वंदे भारत रेल्वे गाड्यांचा यावेळी शुभारंभ करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर रेल्वे स्थानकावरून या समारंभात सहभागी झाले होते. अजनी-पुणे ही महाराष्ट्रातली बारावी वंदे भारत गाडी असून, ८८१ किलोमीटर अंतर कापणारी ती देशातली सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत आहे. ही जलदगती गाडी ७३ किलोमीटर प्रतितास वेगाने धावेल आणि नागपूर ते पुणे दरम्यान १० थांबे घेईल, या रेल्वेला शेगाव इथंही थांबा देण्यात आला आहे, असं मध्य रेल्वेने आपल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं आहे.

****

नागपूर-पुणे ही सर्वाधिक अंतराची वंदे भारत रेल्वे सुरु झाली असून, त्यामुळे वेळेची मोठी बचत होऊन विदर्भातल्या लोकांना पुण्याशी जोडलं जाईल, असं मुख्यमंत्री फडणवीस यवोळी म्हणाले. ज्या प्रवासाला आधी १६ ते १७ तास लागत होते ते अंतर आता केवळ बारा तासात कापणं शक्य होणार असून, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले. छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि पुणे हा औद्योगिक पट्टा असून इथला विकास साधायचा तर रेल्वेचे नवीन मार्ग निर्माण करणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

****

नागपूर पोलिसांनी विकसित केलेल्या गरुडदृष्टी समाजमाध्यम निगराणी प्रकल्पाचं सादरीकरण आणि आर्थिक फसवणूक झालेल्यांना त्यांची चोरलेली रक्कम परत देण्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आज सहभागी झाले होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर, आर्थिक फसवणुकीचे प्रकार वाढत असल्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांकडे सजगपणे बघावं, सावध राहावं, असं आवाहन, त्यांनी यावेळी केलं. नागरिकांनी फसवणूक झाल्यावर त्याची माहिती तातडीनं संबंधित यंत्रणांना द्यावी, जेणेकरून वेळीच योग्य ती कारवाई करून ही फसवणूक थांबवता येईल, असंही फडणवीस म्हणाले.

****

ऑपरेशन सिंदूर हे तिन्ही सेनादलांमधल्या समन्वयाचं आणि कार्यान्वयन एकात्मकतेचं उदाहरण आहे, असं संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज सिकंदराबाद इथं संरक्षण व्यवथापन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबोधित करत होते. सशस्त्र दलांमध्ये एकत्र कृतीसाठी आवश्यक धोरणात्मक दृष्टिकोन आणि भविष्यातल्या रुपरेषेबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. याशिवाय सध्याच्या तंत्रज्ञानावर आधारित युगात व्यापक क्षमता विकास, आत्मनिर्भरता आणि संरक्षण क्षेत्रातल्या परिवर्तनात्मक बदलांचं ज्ञान असणं ही काळाची गरज आहे, असं ते म्हणले.

****

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी बांधलेल्या १८४ निवासस्थानांचं उद्घाटन होणार आहे. बाबा खरक सिंह मार्गावरच्या या संकुलात पंतप्रधानांच्या हस्ते शेंदूर वृक्षाचं रोपही लावलं जाणार आहे. लोकप्रतिनिधी म्हणून असणारी जबाबदारी अधिक कार्यक्षमतेने सांभाळता यावी, या दृष्टीनं या संकुलात सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

****

अनैतिकता दूर करण्याचा मार्ग सांगितला नाही तर नैतिक उपदेशाला अर्थ नसल्याचं मत, ज्येष्ठ समीक्षक डॉ सुधीर रसाळ यांनी व्यक्त केलं आहे. रसाळ यांनी लिहिलेल्या आणि मौज प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या श्याम मनोहरांची नाटकं या पुस्तकाचं प्रकाशन आज छत्रपती संभाजीनगर इथं झालं, त्यावेळी ते बोलत होते. संवाद ही परिवर्तन घडवून आणणारी गोष्ट असल्याचं निरीक्षण रसाळ यांनी नोंदवलं. ते म्हणाले

बाईट - डॉ सुधीर रसाळ, ज्येष्ठ समीक्षक

 

ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याहस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आपल्या भाषणात कुलकर्णी यांनी, श्याम मनोहरांची नाटकं चौकटीबाहेर विचार करायला प्रोत्साहित करतात, असं मत व्यक्त केलं. ज्येष्ठ साहित्यिक श्याम मनोहर, मौज प्रकाशनाचे श्रीकांत भागवत तसंच मोनिका गजेंद्रगडकर यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक, वाचक आणि अभ्यासक यावेळी उपस्थित होते.

****

केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं नाशिकमध्ये इगतपुरी इथं सुरु असलेलं एका बेकायदेशीर कॉल सेंटर उध्वस्त केलं. या प्रकरणी सीबीआयनं मुंबईतल्या सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यातल्या पाच जणांना अटक केली आहे. ॲमेझॉन या ई-कॉमर्स संकेतस्थळाचं ग्राहक मदत केंद्र असल्याचं भासवून या कॉल सेंटरवरुन ग्राहकांना फसवणूक करणारे फोन केले जात होते. गिफ्ट कार्ड तसंच क्रिप्टोकरन्सीच्या बाबतीतले फोनकॉल अमेरिका, कॅनडा आणि अन्य देशांच्या नागरिकांना करुन त्या माध्यमातून फसवणूक केली जात होती. आरोपींनी साठ जणांना या सेंटरवर कर्मचारी म्हणून नेमलं होतं. सीबीआयने तपासादरम्यान ४४ लॅपटॉप आणि ७१ मोबाईल फोन जप्त केले. तसंच महागड्या गाड्या, सोनं आणि मोठ्या प्रमाणात रोकडही जप्त केली.

****

हर घर तिरंगा अभियानांतर्गत नांदेड महापालिकेच्या वतीनं आज तिरंगा वाहन फेरी काढण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या फेरीला सुरुवात झाली. महापालिका विभाग प्रमुख, अग्निशमन दल कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले.

****

पनवेल महानगरपालिकेमार्फत हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत आयुक्त प्रशासक मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याअंतर्गत आज तिरंगा सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं होतं. सुमारे तीनशेहून अधिक सायकलस्वार यात सहभागी झाले होते. यावेळी उपस्थितांनी तिरंगा प्रतिज्ञा घेतली.

****

पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी बहुल जव्हार इथं दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नवीन इमारतीचं लोकार्पण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते झालं. यामुळे आदिवासी आणि दुर्गम भागातल्या न्यायालयीन प्रक्रियेच्या वेगवान पर्वाची सुरुवात झाली असल्याचं ते यावेळी म्हणाले. नवीन न्यायालयाच्या माध्यमातून ई- न्यायालय सेवा, ऑनलाईन खटला नोंदणी, तसचं दूरदृश्यप्रणालीद्वारे सुनावणी यांसारख्या सुविधा उपलब्ध होणार असून, यामुळे नागरिकांना डिजिटल न्यायव्यवस्थेचा लाभ घेता येणार असल्याचं न्यायमूर्ती कुलकर्णी यांनी सांगितलं.

****

सांगली जिल्ह्यातल्या अकरा नगरपरिषद आणि नगरपंचायत क्षेत्रांमध्ये जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या संकल्पनेतून आज एकाच दिवशी विशेष स्वच्छता आणि सुशोभीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेअंतर्गत एकूण ३५ ठिकाणी स्वच्छता, सुशोभिकरण, प्लास्टिक निर्मूलन, सौंदर्यीकरण तसंच जुन्या प्रकल्पांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. स्वच्छ आणि सुंदर शहर निर्मितीसाठी प्रशासन तसंच नागरिकांचा समन्वय साधणं हा त्यामागील मुख्य हेतू होता. या मोहिमेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.

****

No comments: