Saturday, 22 September 2018

AIR NEWS BULLETIN, AURANGABAD 22.09.2018 13.00


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date – 22  September 2018

Time 1.00 to 1.05pm

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक २२ सप्टेंबर २०१दुपारी १.०० वा.

****



 ओडिशातल्या तालचेर इथल्या नालचेर खत प्रकल्पाच्या पुनर्बांधणीचा राष्ट्रनिर्माणात उपयोग होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तालचेर इथं पुनर्बांधणीच्या उद्घाटन कार्यक्रमात ते आज बोलत होते. कोळशाच्या वायूवर आधारित खतनिर्मिती करणारा हा देशातला पहिलाच प्रकल्प आहे. खतांबरोबरच नैसर्गिक वायूची निर्मितीही या प्रकल्पातून होणार असल्यानं देशाच्या ऊर्जेची गरज काही अंशी भागू शकेल. देशात स्वच्छता मोहिम मोठ्या प्रमाणावर सुरु असून, ग्रामीण भागात ५५ टक्के स्वच्छता झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. ओडीशामध्ये सरकारनं राबवलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

****



वैद्यकक्षेत्रातल्या विज्ञानाचे फायदे देशातल्या प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याचे मार्ग आणि उपाय शोधण्याच्या आवश्यकतेवर उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी भर दिला आहे. ते काल नवी दिल्ली इथं राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या १९ व्या पदवीदान समारंभात बोलत होते. परवडणाऱ्या आरोग्य सुविधा निर्माण करण्याचं आणि स्वच्छतेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देश करत असलेल्या प्रयत्नांमध्ये डॉक्टरांनी योगदान द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

****



 वस्तू आणि सेवा कर नेटवर्कमधल्या तांत्रिक बाबींचा अभ्यास करण्यासाठी आज बंगळुरूमध्ये मंत्रीगटाची बैठक होणार आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या या बैठकीत नेटवर्कच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसंच आयकर विवरण भरण्यासाठी वापरण्यात येणा-या नव्या सॉफ्टवेअरबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे.

****



 न्युयॉर्कस्थित संयुक्त राष्टसंघाच्या इमारतीवर सौर उर्चेचे पॅनल बसवण्यासाठी भारतानं दहा लाख अमेरिकन डॉलरचं योगदान दिलं आहे. या पॅनलमुळे इमारतीवर कार्बनचा होणारा परिणाम कमी होऊन दीर्घकालिन ऊर्जानिर्मितीसाठी उपयोग होणार असल्याचं भारताचे अमेरिकेतले कायमस्वरुपी सदस्य सय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितलं. हवामान बदलाबाबत सहकार्य करण्यासाठी युनोचे महासचिव अन्टानियो गुटेरस यांनी आवाहन केल्यानंतर भारत त्यास प्रतिसाद देणारा पहिला देश असल्याचं अकबरुद्दीन यांनी सांगितलं.

****



 देशातल्या विमान उड्डाणादरम्यान फोन आणि इंटरनेट सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये ही सुविधा उपलब्ध असेल, अशी माहिती दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी दिली. केंद्र सरकार लवकरच याबाबतची अधिसूचना जारी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या सुविधेमुळे प्रवाशांना फोनही करता येईल आणि इंटरनेट तसंच वायफाय सेवेचाही वापर करता येईल, तसंच स्थानिक विमानसेवांना यामधून अतिरिक्त महसूल मिळू शकणार आहे.   

****



 जालंधर डायोसेसचे बिशप फ्रान्को मुलकल यांना केरळ पोलिसांनी कोचीमध्ये काल रात्री अटक केली. एका नर्सचा २०१४ ते २०१६ दरम्यान लैंगिक छळ केल्याच्या आरोपात मुलकल यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांच्या सततच्या तीन दिवसांच्या चौकशीनंतर ही अटक करण्यात आली. पंजाब पोलिसांनीही ऑगस्टमध्ये बिशप मुलकल यांची जालंधरमध्ये चौकशी केली होती. अटक केल्यानंतर मुलकल यांना कोट्टायामला नेण्यात आले असून, आज त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

****



 २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली आणि आठवीची पाठ्यपुस्तके पुनर्रचित करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये केलेल्या बदलांबाबत राज्यातल्या शिक्षकांना डिजीटलच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम शिक्षण विभागानं आयोजित केला असल्याची माहिती शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिली. हे प्रशिक्षण गुजरात सरकाराच्या वंदे गुजरात या वाहिनीमार्फत देण्यात येणार असून ते  विनाशुल्क असल्याचंही त्यांनी सांगितलं

****



 औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ऐतिहासिक वारसा जनजागृती मोहीमेत आज सकाळी सातारा परिसरातल्या टेकडीवर वृक्षारोपण करण्यात आलं. त्यानंतर सातारा परिसरातल्या शाळकरी मुलांनी खंडोबा मंदीराच्या प्रांगणात ऐतिहासिक वारसा जतन करण्याविषयी विविध जनजागृतीपर कार्यक्रम सादर केले. महापालिका आयुक्त निपुण विनायक यांच्यासह, शहरातले इतिहासप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते. या मोहीमेत शहरातल्या विविध ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळांवर महापालिकेतर्फे स्वच्छता अभियानही राबवण्यात आलं.

****



 नवी दिल्लीत काल सुरु झालेल्या पाचव्या आशिया चषक सायकलींग स्पर्धेत भारतानं पहिल्याच दिवशी तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक जिंकून जोरदार सुरुवात केली. महिला कनिष्ठ गटाच्या ५०० मीटरच्या शर्यतीत मयुरी लुटे हिनं भारताला पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळवून दिलं. पुरुष संघानं अडथळ्याच्या सायकल शर्यतीत कझाकीस्तान वर मात करत सुवर्ण पदक जिंकलं. भारतीय सायकलींग फेडरेशननं आयोजित केलेल्या या स्पर्धेत १२ देशांनी सहभाग घेतला आहे. 

*****

***

No comments: