आकाशवाणी
औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
०५ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
महागाईच्या
विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. नवी दिल्लीत काँग्रेस
नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरु असून, तत्पूर्वी वार्ताहरांशी बोलताना
राहुल गांधी यांनी, देशात हुकुमशाही सुरु झाली असून, लोकशाहीची हत्या होत असल्याचा
आरोप केला.
महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीनं आज मुबंईत महागाई विरोधात
राजभवनला घेराव, तसंच जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात राजभवन परिसरात मोर्चा
काढण्यात येणार आहे.
****
भारतीय संरक्षण संशोधन आणि विकास संस्था - डीआरडीओने विकसित
केलेल्या स्वदेशी बनावटीच्या रणगाडाभेदी क्षेपणास्त्राची काल अहमदनगर इथं यशस्वी चाचणी
घेण्यात आली. अहमदनगर इथल्या आर्म्ड कोअर सेंटर स्कूलच्या सहयोगाने ही चाचणी अर्जुन रणगाड्याच्या
मार्फत घेण्यात आली.
****
राज्यसभेत काल ‘कौटुंबिक न्यायालय
सुधारणा विधेयक, २०२२ ला मंजुरी देण्यात आली. सुधारित कायद्यानुसार
राज्य सरकारांना कौटुंबिक न्यायालयं स्थानिक पातळीवर स्थापन करण्याचा अधिकार यामुळे मिळणार आहे.
****
भारतातील डिजिटल रेडिओ प्रसारण संदर्भात माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा
यांनी काल एक अहवाल प्रसिद्ध केला. डिजिटल रेडिओच्या
माध्यमातून रेडिओच्या गुणवत्तेत सुधार होईल असं ते म्हणाले.
****
राज्यात १५ जिल्ह्यांतल्या २३८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी काल
झालेल्या मतदानाची आज मतमोजणी होत आहे. या ग्रामपंचायतींमध्ये काल सरासरी ७८ टक्के मतदान झालं.
****
मुंबई पोलिसांनी नालासोपाऱ्यातून १४०० कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थांचा साठा
काल जप्त केला. अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली. यात
७०१ किलो वजनाचे अंमल पदार्थ जप्त करण्यात आले असून, याप्रकरणी
आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
****
नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव सतत कोसळत असल्यानं मनमाड इथं स्वाभिमानी शेतकरी
संघटनेनं काल रस्ता रोको आंदोलन केलं. कांद्याला ३ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळावा
तसंच सातशे
रुपये अनुदान मिळावं अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.
//**********//
No comments:
Post a Comment