आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त
बातमीपत्र
११ ऑगस्ट २०२२
सकाळी ११.०० वाजता
****
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या दरहाल परिसरात लष्कराच्या छावणीत घुसण्याचा प्रयत्न करणारे दोन दहशतवादी मारले गेले.
आज सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये ही चकमक झाली. मात्र यात लष्कराचे तीन सैनिक हुतात्मा
झाल्याचं वृत्त आहे.
****
देशाचे
१४वे उपराष्ट्रपती म्हणून जगदीप धनखड आज शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती
द्रौपदी मुर्मू त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ देतील.
****
रक्षाबंधन अर्थात राखी पौर्णिमा, बहीण भावाच्या नात्यात प्रेमबंध अधिक दृढ करण्याचा दिवस आज साजरा होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. बहीण
भावाच्या नात्यावरचा विश्वास दृढ करणारा हा सण समाजात शांति,
सलोखा आणि महिलांप्रति सन्मान वृद्धिंगत करणारा ठरावा, असं त्यांनी
शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन सणांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा
दिल्या आहेत. या सणांच्या माध्यमातून आपण निसर्ग, मानवी
नातेसंबंध आणखी दृढ व्हावेत, त्यातून आपण सर्व समृद्धीकडे वाटचाल
करूया, असं मुख्यमंत्री म्हणाले.
****
जालना इथल्या स्टील कारखानदारांच्या कारखान्यांवर,
घरं, कार्यालयांवर आयकर विभागानं छापेमारी केली. या छाप्यांमध्ये सुमारे ३९० कोटींची
बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आली असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. एक ऑगस्टपासून
आयकर विभागाची ही कारवाई सुरु होती.
****
पाळीव प्राण्यांमधे आढळणाऱ्या लंपी स्किन रोगावरच्या लसीचं उद्घाटन काल केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री
नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते झालं. हरियाणात हिस्सार इथल्या
राष्ट्रीय केंद्रात ही लस विकसित करण्यात आली आहे.
****
प्रसारमाध्यमांनी तत्व आणि ध्येय न बदलता जनतेपर्यंत सत्य पोहोचवावं, असं आवाहन, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं
आहे. दैनिक लोकमतच्या ठाणे इथल्या नूतन कार्यालयाचं उद्घाटन केल्यानंतर
ते काल बोलत होते. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक,
डिजिटल अशा विविध प्रकारची माध्यमं संक्रमणावस्थेतून जात असून,
त्यांनी या बदलाशी जुळवून घेतानाच, समाजाच्या विचाराला
दिशा देण्याचं काम केलं पाहिजे, असं फडणवीस यांनी सांगितलं.
//*********//
No comments:
Post a Comment