Thursday, 16 February 2017


Regional Marathi Text Bulletin, Aurangabad

Date - 16 February 2017

Time 17.25 to 17.30

Language Marathi

आकाशवाणी औरंगाबाद

प्रादेशिक बातम्या

दिनांक १६ फेब्रुवारी २०१७ सायंकाळी ५.२५ मि.

****

राज्यात पहिल्या टप्प्यातल्या १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. यात मराठवाड्यातल्या आठ जिल्हा परिषदा आणि शहात्तर पंचायत समित्यांचा समावेश आहे. दुपारी दीड वाजेपर्यंत लातूर इथं ३७ टक्के, नांदेड जिल्ह्यात ३७ टक्के, हिंगोली ३८ टक्के, औरंगाबाद ३४ टक्के, तर बीड जिल्ह्यात ५८ टक्के मतदान झालं. उस्मानाबाद इथं दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५३ टक्के तर परभणी इथं ५६ टक्के मतदान नोंदवलं गेलं.
जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात २१ फेब्रुवारीला मतदान होणार असून, मतमोजणी २३ फेब्रुवारीला होणार आहे.

****

उस्मानाबाद जिल्ह्यात चार गावातल्या नागरिकांनी आज मतदानावर बहिष्कार टाकला. यामध्ये कळंब तालुक्यातलं खोंदला, लोहारा तालुक्यातलं दक्षिणजेवळी, भूम तालुक्यातलं माळेवाडी आणि तुळजापूर तालुक्यातल्या धनेगावा समावेश आहे. या चारही गावात एकाही मतदारानं मतदान केलं नसल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

नांदेड जिल्ह्यातही सहा गावांनी मतदानावर बहिष्कार टाकला आहे. 

****

मुंबई महापालिका निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील, असं काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. मुंबईत पायाभूत सुविधा पूर्णपणे विस्कळीत झाल्या असल्याचं ते म्हणाले.

****

ई.के.पलानीस्वामी यांनी आज तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पक्षाच्या सरचिटणीस शशिकला यांची बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चार वर्षांसाठी तुरुंगात रवानगी करण्यात आली असून, काळजीवाहू मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे. त्यानंतर विधीमंडळ नेतेपदी निवड झालेल्या पलानिसामी यांनी आज राज्यपालांची भेट घेऊन, सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर, राज्यपालांनी त्यांना सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित केलं.

****

मध्यम तसंच अल्प उत्पन्न गटातल्या नागरिकांना कायदेविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सर्वोच्च न्यायालयानं विशेष योजना आखली आहे. या अंतर्गत मासिक साठ हजार किंवा वार्षिक साडे सात लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्यांना नाममात्र शुल्क भरून, कायदेविषयक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे गरीब नागरिकांनाही सर्वोच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे.

****

महाराष्ट्र सरकारला मुद्रांक शुल्काच्या स्वरुपात प्राप्त होणाऱ्या महसुलात सुमारे एक हजार कोटी रुपये घट झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिना अखेर सरकारला मुद्रांक शुल्काच्या माध्यमातून १७ हजार २४४ कोटी रुपये महसूल प्राप्त झाला होता, यंदा मात्र जानेवारीअखेर १६ हजार २५४ कोटी रुपये महसूल मिळाल्याचं, संबंधित विभागाकडून सांगण्यात आलं आहे. विमुद्रीकरणानंतर मालमत्ता खरेदी विक्री मंदावल्यानं, हा परिणाम झाला असून, आणखी काही काळ हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असल्याचं, या वृत्तात म्हटलं आहे.

****

आठव्या युवक विज्ञान काँग्रेसला आज मुंबईत सुरूवात झाली. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात झालेल्या उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ वैज्ञानिक अरविंद उंटवाले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय देशमुख आणि एस एन डी टी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.शशिकला वंजारी यावेळी उपस्थित होते. ‘मानवी प्रभावाच्या युगात सर्वांसाठी अन्न’ हा यंदाचा विषय आहे. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत तंत्रज्ञान विषयक शोधनिबंध सादर होणार आहेत.

****

युवकांनी शेती आधारित उद्योगांना प्राधान्य द्यावं, असं आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिलीप म्हैसेकर यांनी केलं आहे. विद्यापीठाच्या कृषीविज्ञान केंद्रामार्फत आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. असे उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांना तांत्रिक ज्ञान पुरवण्याची ग्वाही कुलगुरूंनी दिली.

****

मराठा आरक्षण मागणीसाठी आज बेळगाव इथं सकल मराठा समाजाच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. पाच लाखाहून अधिक मराठा बांधव या मोर्चात सहभागी झाले होते.

****

प्रवाशांच्या सोयीसाठी पश्चिम रेल्वेनं मुंबईहून जयपूर आणि अजमेरसाठी विशेष साप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बांद्रा ते जयपूर ही गाडी चार मे ते २९ जून दरम्यान दर गुरुवारी, तर बांद्रा ते अजमेर ही गाडी एक मे ते २६ जून दरम्यान दर सोमवारी सोडण्यात येणार आहे.  

****

No comments: