Saturday, 7 March 2026

Text-आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 07.03.2026 रोजीचे सकाळी 07.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar

Date – 07 March 2026

Time 7.10 AM to 7.20 AM

Language Marathi

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर

प्रादेशिक बातम्या

दिनांक मार्च २०२ सकाळी ७.१० मि.

****

·      राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा तूटीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर

·      मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाचं नियोजन

·      शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना तर स्टार्टअपसाठी महाफंड स्थापन

·      आकांक्षित जिल्हा योजनेचा विस्तार-बीड, जालना, परभणी तसंच हिंगोलीचा समावेश

·      विरोधकांकडून अर्थसंकल्पावर टीका-उद्योग क्षेत्राकडून मात्र स्वागत

आणि

·      इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा लक्ष्य सेन उपांत्य फेरीत दाखल

****

प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभावर आधारित राज्याचा आगामी वर्षाचा अर्थसंकल्प काल सादर झाला. मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधान परिषदेसमोर अर्थसंकल्प मांडला. आगामी आर्थिक वर्षात राज्याचं महसुली उत्पन्न सहा लाख १६ हजार ९९ कोटी रुपये तर महसुली खर्च, सहा लाख ५६ हजार ६५१ कोटी रुपये असेल. राज्याची अंदाजे तूट ४० हजार ५५२ कोटी रुपये राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सदर राजकोषीय तूट, नियमानुसार स्थूल राज्य उत्पन्नाच्या तीन टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्यात राज्यसरकार यशस्वी ठरल्याचं सांगत, जीएसटी संकलनात राज्य देशात प्रथम क्रमांकावर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं.

जिल्हा वार्षिक योजनेत २१ हजार ८६७ कोटी रुपये भरीव तरतुदीच्या घोषणेसोबतच, विकसित महाराष्ट्र २०४७ चं व्हिजन डॉक्युमेंट यावेळी जाहीर करण्यात आलं, एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे राज्याची वेगाने वाटचाल सुरू असून, २०४७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दीष्ट निर्धारित करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

इलेक्ट्रिक किंवा पर्यावरणस्नेही वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा वाहनांना रस्ते करात भरघोस सूट तर इतर वाहनांवरच्या करात मोठी वाढ मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावित केली. पात्र निकषांपेक्षा कमी मुद्रांकावर दस्त मंजुरीच्या दंडात मोठी वाढ करण्याचंही मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पात प्रस्तावित केलं आहे.

आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामं, आग्रा तसंच हरियाणात पानिपत इथं मराठा साम्राज्य स्मारक उभारणी, छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणी, लोकसेवा आयोगासह इतर माध्यमातून ७५ हजार पदांची भरती, प्रशासकीय कामकाजाचं डिजिटायझेशन, कृत्रीम बुद्धिमत्तेचा वापर, नदीजोड प्रकल्प, स्वच्छ ऊर्जा, पेयजल पुरवठा, पूर नियंत्रण, सांडपाणी पुनर्वापर, आरोग्य सेवा, आदी कामांसाठीच्या नियोजनाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक, मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेची घोषणाही त्यांनी या अर्थसंकल्पात केली. गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजनेत शेतमजुरांचा समावेश करायचा निर्णयही सरकारनं घेतला आहे.

बालकांसाठी पोषणक्षम आणि सुरक्षित वातावरण, महिला उद्योजकांना प्रोत्साहन, ज्येष्ठांना आरोग्यदायी सन्मानजनक जीवनाची हमी, एकल महिलांच्या कल्याणासाठी सुयोग्य धोरण, शाश्वत आणि वैविध्यपूर्ण उपजीविका निर्माण करण्यात येणार असून, येत्या वर्षात उमेद अंतर्गत आणखी २५ लाख महिलांना लखपती दिदी करण्याचं उद्दीष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना यापुढेही सुरू राहणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं.

कर्करोग, मधुमेह, हृदयविकाराची तपासणी करण्यासाठी ग्रामीण भागात दरवर्षी तपासणी शिबीर, प्रत्येक जिल्ह्यात MSME केंद्र तसंच MSME आणि सेवा क्षेत्रासाठी आयुक्तालयाची स्थापना, स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये आरोग्य सुविधांच्या समन्वयासाठी शहरी आरोग्य आयुक्तालयाची स्थापना, शाश्वत शहरी विकासासाठी सक्षम प्रादेशिक प्राधिकरणांची स्थापना, ५० पेक्षा अधिक सुनियोजित शहर समूह विकास, दिव्यांगासाठी ३६ कौशल्य आणि उद्योजकता विकास केंद्र, तसंच मालकी हक्कांचे वाद सोडवण्यासाठी महाराष्ट्र भूमी हक्क मालकी अधिनियम आणण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुंबई महानगराच्या धर्तीवर राज्यातल्या इतर शहरांच्या विकासाबाबत बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले…

बाईट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

 

बाईट-बजेट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मुख्यमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात जाहीर केली. त्यासोबतच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहन योजनेची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ते म्हणाले-

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (कर्जमाफी)

 

राज्यात एक हजार पेक्षा अधिक लोकसंख्येच्या गावांना काँक्रीट रस्त्याने जोडण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवजला जाईल. छत्रपती संभाजीनगर विमानतळ ते वाळुज औद्योगिक शहर या दरम्यान उन्नत मार्गाचं काम दोन टप्प्यात करण्यात येणार असून, छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गादरम्यान १९२ किलोमीटरच्या ग्रीनफील्ड महामार्गाचा अहवाल तयार करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कल्याण ते लातूर ग्रीनफील्ड द्रुतगती महामार्गाची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. राज्यातल्या एकूणच रस्ते विकासाबाबत मुख्यमंत्री म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (रस्ते विकास)

 

स्टार्टअप आणि इनोव्हेशनला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष धोरण मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. पुढील पाच वर्षात सव्वा लाख उद्योजक घडवणं, आणि ५० हजार स्टार्टअप्स ना बळ देण्याचं सरकारचं उद्दीष्ट आहे. नव उद्योजकांसाठी मुख्यमंत्री उद्योजकता महाफंड स्थापन करत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (स्टार्टअप)

 

पुनावळे ते वासोटा किल्ला रोप वे प्रकल्प, नागपूर जिल्ह्यात रामटेक इथं रामसृष्टी तसंच कालिदास सृष्टीची उभारणी, राज्यातल्या तिसऱ्या चित्रनगरीची रामटेक तालुक्यात उभारणी, पालघर जिल्ह्यात वाढवण इथं चौथी मुंबई विकसित करण्याचं नियोजन तसंच राज्यात दहा शैक्षणिक शहरं उभारण्यात येणार असल्याचं सांगत, नवी मुंबई विमानतळाजवळ देशातली पहिली एज्यु सिटी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. आकांक्षित जिल्हा तसंच आंकाक्षित तालुका विकास योजनेचा विस्तार करत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी अंदाजपत्रकीय भाषणात जाहीर केलं. ते म्हणाले -

बाईट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (आकांक्षित जिल्हा)

 

२०२६-२७ हे महात्मा फुले यांचं दोनशेवं जयंती वर्ष, संत गाडगेबाबा यांचं दीडशेवं जयंती वर्ष, तर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या चवदार तळे सत्याग्रहाचं शंभरावं वर्ष आहे. यामुळे हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलं.

 

हा अर्थसंकल्प सादर करतांना, दिवंगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांची आठवण म्हणून गुलाबी जाकीट परिधान केलेल्या मुख्यमंत्र्यांनी, हा अर्थसंकल्प अजित पवार यांना समर्पित करत असल्याचं सांगितलं. अजित पवार यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसं भव्य स्मारक तसंच त्यांच्या नावे गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केलं.’’

****

आगामी वर्षाचा अर्थसंकल्प व्हिजनरी तसंच विकसित महाराष्ट्र २०४७ कडे भक्कमपणे वाटचाल करणारा अर्थसंकल्प असल्याचं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तर हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करणारा अतिशय समर्पक आणि सर्वसमावेशक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.

पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी, हा अर्थसंकल्प म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने टाकलेलं ठोस पाऊल असल्याचं सांगितलं. तर राज्याच्या चौफेर विकासाची चतुसूत्री मांडणारा हा अर्थसंकल्प असल्याचं, माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, हा अर्थसंकल्प म्हणजे विकासाचं मृगजळ असून शेतकऱ्यासाठी फसवा अर्थसंकल्प असल्याची टीका केली, तर राज्याची दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हा अर्थसंकल्प फक्त मुंबई आणि औद्योगिक क्षेत्रापुरताच असल्याचं सांगत, शब्दांचा आणि आकड्यांचा मारा करून, जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली असल्याची टीका केली.

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. या अर्थसंकल्पातल्या तरतुदींमुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील समुद्राला वाहून जाणारे पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासह धाराशिव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांच्या विकास कार्यक्रमाला मोठी गती मिळणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

हा अर्थसंकल्प, सर्वसमावेशक विकासाचा स्पष्ट रोडमॅप मांडणारा असून राज्याच्या प्रगतीसाठी विविध क्षेत्रांना चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया मंत्री अतुल सावे यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर हे राज्यातील महत्त्वाचं ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय मराठवाड्याच्या विकासासाठी ऐतिहासिक ठरणार असल्याचं सावे म्हणाले.

छत्रपती संभाजीनगर इथले उद्योजक विवेक देशपांडे यांनी, पायाभूत सुविधांवर भर देणाऱ्या या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. ते म्हणाले…

बाईट – उद्योजक विवेक देशपांडे

****

राज्यात गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या एक कोटी आठ हजार ५३२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १५ हजार ६६१ कोटी रुपये जमा झाले आहेत. मंत्री मकरंद जाधव यांनी काल विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात ही माहिती दिली.

****

केंद्रीय लोकसेवा आयोगानं २०२५ मध्ये घेतलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल काल जाहीर झाला. या परीक्षेत देशभरातून एकूण ९५८ उमेदवार यशस्वी झाले आहेत. या निकालात पहिल्या शंभर उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातल्या पाच उमेदवारांचा समावेश असून साठ पेक्षा जास्त उमेदवार यशस्वी झाले आहेत.

यामध्ये परळी तालुक्यातील गोपीनाथगडाचे हर्षवर्धन तिडके दसंच कंधार तालुक्यातले ऋषीकेश पालिमकर यांचा समावेश आहे.

****

धाराशिव जिल्ह्यात पंचायत समित्यांच्या सभापती तसंच उपसभापती पदांच्या निवडणुका पार पडल्या, सर्व आठ ठिकाणी महायुतीने वर्चस्व कायम ठेवल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

****

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथला संत एकनाथ महाराज नाथषष्ठी यात्रोत्सव नऊ ते ११ मार्च या कालावधीत होणार आहे. या निमित्ताने प्रशासनातर्फे ‘सेवाभक्ती संगम’ हा उपक्रम पैठण तहसील कार्यालयात राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमात भक्ती गीत गायनासोबत, शासकीय योजना तसंच शासकीय सेवा, छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान तसंच समाधान शिबिराबद्दल सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. दरम्यान, नाथषष्ठीनिमित्त जिल्ह्यातील विविध बसस्थानकावरून ९० जादा बस सोडण्यात येणार आहेत.

****

धाराशिव इथं ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक तसंच राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत, या रुग्णालयाचं काम पुढील दोन दशकांच्या गरजा लक्षात घेऊन पूर्ण करण्याची सूचना करण्यात आली.

****

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते, माजी खासदार उन्मेश पाटील यांनी काल  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुंबईत झालेल्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

****

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे हिंगोली जिल्ह्यातल्या तेरा हजार २८८ पात्र मुलींना गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंधक एचपीव्ही लस मोफत दिली जाणार आहे. या लसीकरणाचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं पालकांना केलं आहे. परभणी इथंही उद्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी या मोफत लसीकरण मोहिमेचा शुभारंभ होणार आहे.

****

परभणी इथं जागतिक महिला दिनानिमित्त उद्या आठ मार्च रोजी खेलो इंडिया अंतर्गत मुली आणि महिलांसाठी ‘अस्मिता लिग’ या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुली आणि महिलांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन मिळावं, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात येत आहे.

****

ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. काल रात्री झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात लक्ष्यने चीनच्या ली शी फेंग याला २१-१३, २१-१६ असं पराभूत केलं. आज उपांत्य फेरीत लक्ष्यचा सामना कॅनडाच्या व्हिक्टर लाय याच्यासोबत होणार आहे.

****

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं पुरुषांच्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी वर्षातील सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी नामांकित खेळाडूंची यादी जाहीर केली. या यादीत संजू सॅमसन या एकमेव भारतीय क्रिकेटपटूचा समावेश करण्यात आला आहे.

****

नांदेड जिल्ह्यात सगरोळी इथं स्थापन केंद्र शासन पुरस्कृत तसंच राज्य शासनाच्या अखत्यारितील सैनिकी विद्यालयाची प्रवेश परीक्षा उद्या आठ मार्चला होणार आहे. मराठवाड्यात नांदेडसह विविध १४ केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.

****

नाशिक जिल्ह्यात काल एका अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला, तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाले. नाशिककडून मालेगावच्या दिशेने जात असलेल्या कारचालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला झाडावर आदळल्यानं हा अपघात झाला.

****

No comments:

Text - आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर - दिनांक 03.04.2026 रोजीचे सायंकाळी 06.10 वाजेचे मराठी बातमीपत्र

  Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 03 April 2026 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी छत्रप...